रागावून घर सोडलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथे उघडकीस आली आहे. वसई पोलिसांनी याप्रकरणी कसलाही ठोस दुवा नसताना एका दुचाकीच्या वर्णनावरून अवघ्या १२ तासात आरोपीला शोधून अटक केली आहे. पीडित ११ वर्षांची मुलगी वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. रविवारी तिचे बहिणीसोबत भांडण झाले होते. त्यामुळे रागाने तिने घर सोडले आणि ट्रेन पकडून मुंबई गाठली. दिवसभर फिरल्यानंतर तिचा राग शांत झाला आणि तिने घरी परतायचा निर्णय घेतला. रात्री ती वसई रेल्वे स्थानकात उतरली. त्याचवेळी आरोपीने तिला पाहिलं. ही मुलगी एकटी असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने ओळख केली. त्यानंतर तिला आपल्या घरी नेऊन अत्याचार केला. या मुलीला त्याने रात्री १ वाजता रेल्वे स्थानकात सोडून पळ काढला. तिच्या कुटुंबियांनी याप्रकऱणी सकाळी ११ वाजता वसई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. काळी ॲक्टीव्हा आणि सीसीटीव्हीची मदतघटनेनंतर मुलगी प्रचंड मानसिक धक्क्यामध्ये होती. आरोपी अनोळखी असल्याने पोलिसांना कसलाच दुवा मिळत नव्हता. महिला पोलिसांच्या मदतीने मुलीचे समुपदेशन करून माहिती काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपी काळ्या ॲक्टीव्हा वरून आला होता आणि त्याच गाडीवरून नेले एवढेच तिने पोलिसांना सांगितले. त्या दुव्यावरून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले आणि अवघ्या १२ तासांच्या आत आरोपीला अटक केली. आरिफ अयुब शेख (३४) असे या आरोपीचे नाव असून तो वसईत चिकन विक्रीचे दुकान चालवतो. रात्रीच्या सुमारास तो स्थानक परिसरात वेश्यांकडे आला होता, अशी मााहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) ऋषिकेश पवळ यांनी दिली. परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे, पोलीस निरीक्षक ऋषिकेष पवळ, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार, साहाय्यक पोलीस निरीक्षक राम सुरवसे आदींच्या पथकाने ही कामगिरी करून आरोपीला गजाआड केले.