विरार : नालासोपाऱ्यातील धोकादायक इमारतींच्या दुर्घटनेनंतर पालिकेने शहरातील धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्याचे काम सुरू केले. काही प्रमाणात इमारतीही रिकाम्या केल्या पण इमारतीतील दुकाने अजूनही तशीच सुरू आहेत. दुकानदार आणि ग्राहक दररोज मृत्यूच्या छायेखाली वावरत आहेत.वसई-विरार महापालिका क्षेत्रात ९९३ धोकादायक इमारती आहेत. यातील १७८ अतिधोकादायक इमारती आहेत. यातील काही इमारती पालिकेने रिकाम्या केल्या असल्या तरी आजही तेथे दुकाने थाटली जात आहेत. पालिकेने या दुकानांना अनेक वेळा नोटीस बजावल्या असूनही त्याचा काहीच उपयोग नाही.मागील आठवडय़ात नालासोपारा हनुमाननगर परिसरात एका धोकादायक इमारतीचा एक भाग कोसळला होता. यात पाच जण जखमी झाले होते. यानंतर पुन्हा धोकादायक इमारतीचा विषय ऐरणीवर आल्याने पालिकेने सावधगिरी बाळगत सर्व प्रभागांतील धोकादायक इमारतींना नोटिशी बजावण्याचा सपाटा लावला. पण तेथील रहिवासी आणि दुकानदारांनी कोठे स्थलांतर करावे, याबाबत कोणत्याही योजना पालिकेकडे नाहीत त्यामुळेच तेथील रहिवाशी आणि दुकानदार तेथील जागा रिकाम्या करत नाहीत.नालासोपारा पूर्व आचोळे रोड वरील आत्मबल्लभ सोसायटी, डॉनलेन, बोरी मस्जिद, स्टेशन परिसर येथील एका धोकादायक इमारतीत पालिकेने नोटीस बजावूनसुद्धा १० ते १५ दुकाने चालू आहेत. पण दुकानदार मात्र दुकाने रिकामी करण्यास तयार नाहीत. येथे ग्राहकांचीही वर्दळ असते त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. परंतु दुकानदारांचे म्हणणे आहे की, करोनोत्तर काळात सुरू झालेला व्यवसाय पुन्हा स्थलांतर करणे कठीण आहे.काही धोकादायक इमारतीतील दुकानदारांनी महापालिकेच्या नोटिशीला न्यायालयात आव्हान दिले आहे, तर काही दुकाने ही पर्याय नसल्याने स्थलांतरित होत नाही आहेत. आचोळे येथील अजय पंडय़ा हे दुकानमालक म्हणाले, करोनाकाळामुळे खुप मोठे नुकसान झाले आहे, त्यात नव्याने दुकानासाठी पैसे कुठून आणायचे, पालिका कोणतीही मदत करत नाही. यामुळे आम्हाला मृत्यूच्या छायेत जगावे लागत आहे. दुसरीकडे पुनर्निर्माणच्या नावाखाली अनेक इमारती अडकल्या आहेत यातील रहिवाशांना विकासक भाडे देत आहेत, पण दुकानदारांचा कोणताही विचार केला जात नाही. इतर ठिकाणी दुकानाच्या भाडय़ासाठी ४० ते ५० हजार भाडे मोजावे लागणार असल्याने आम्ही दुकाने रिकामे करत नाही, असे विविध दुकानदारांनी सांगितले.