विरार : दिवाळीच्या दिवसांत मोठय़ा प्रमाणात फटाक्यांचा वापर केला. यामुळे शहरातील हवा प्रदूषित होऊन शहराचे स्वास्थ्य बिघडले आहे. गुरुवारी मिळालेल्या नोंदीनुसार हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावत १५६ एक्यूआय नोंदविला गेलाय तर मागील २४ तासांत हा निर्देशांक ३६६ एक्यूआयपर्यंत पोहचला होता. यामुळे सध्या शहरातील हवा ही नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असल्याचे मत तज्ज्ञांनी दिले आहे. यावर्षी करोनाचे वातावरण निवळल्याने शासनाकडून सणांवरील सर्व निर्बंध हटविण्यात आले. यामुळे दिवाळी सणाचा उत्साह वाढला होता. त्यात मागील दोन वर्षांच्या तुलनने या वर्षी ४० ते ५० टक्के अधिक फटाक्यांची विक्री नोंदविण्यात आली. त्यात पर्यावरणपूरक फटाक्यांचा कुठेही वापर करण्यात आला नसल्याने पर्यावरणाला घातक असलेल्या परंपरागत फटाक्यांची मोठी विक्री झाली. त्यात अशा फटाक्यांना बंदी असतानाही पालिकेकडून अथवा पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात फटाके फोडत दिवाळीचा आनंद साजरा केला. त्यात मागील आठवडाभरापासून शहरात नागरिक मोठय़ा प्रमाणात वाहनांचा वापर करत आहेत. त्यात शहरात तासंतास वाहतूक कोंडी होत आहे, मोठय़ा प्रमाणात वाहनांचा धूर हवेत मिसळत आहे. यामुळे झपाटय़ाने हवेची गुणवत्ता खालावत आहे. यामुळे वातावरणात फटाक्यांचा धूर मिसळून हवेची गुणवत्ता ढासळली. एअर क्वालिटी इंडेक्स या संकेतस्थळावर मिळालेल्या माहितीनुसार वसईत हवेतील धूलिकण आणि इतर घातक पदार्थाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांना खसा खवखवणे, उच्च रक्तदाब आणि श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता आहे. फटाक्यांच्या धुरामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले असून रस्त्यांवर धुळीची चादर पसरली आहे. यामुळे वाहनचालकांना रात्रीच्या वेळेस रस्ता धूसर होत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील हवेतील घातक धूलिकणाचे प्रमाण चारपटीने वाढले आहे यामुळे शहरातील हवा धोकादायक असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना मुखपट्टय़ांचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. धूलिकण पीएम २.५ चे प्रमाण हे ६६ मायक्रो क्युबिक मीटर (हवेतील प्रदूषण मापणाचे एकक आहे.) असून हे चारपट वाढले आहे. तर पीएम २.५ पीएम १० चे प्रमाण हे १५६ नोंदविण्यात आले आहे. त्याचबरोबर कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाणही वाढले आहे. तर बुधवारी पहाटे २.०६ मिनिटाने ३६६ एक्यूआय नोंदविला गेला हा सर्वात घातक होता. यामुळे एकूणच फटाक्यांचा परिणाम शहरातील हवेच्या गुणवत्तेवर होऊन शहरातील हवा प्रदूषित झाली आहे. आणखी दोन दिवस फटाके फोडले जाणार असल्याने हवेची गुणवत्ता अधिक खालावली जाण्याचे शक्यता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्तवली आहे. यामुळे नागरिकांनी फटाक्याचा वापर टाळावा, असे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे. शहरात पालिकेच्या माहितीनुसार क्षयरोगाचे आणि उच्चरक्त दाबाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात शहरातील हवा खराब होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पीएम २.५ आणि पीएम १० काय असते? त्याचे आरोग्यावर परिणाम काय? पीएम २.५ आणि पीएम १० ही हवेतील प्रदूषित धूलिकणाचे प्रकार आहेत. यात पीएम २.५ हे अधिक घातक असून ते श्वसनक्रियेव्दारे शरीरात सहज जातात. याचे हवेतील सामान्य प्रमाण हे ३५ मायक्रो क्युबिक मीटर पेक्षा जास्त नसावे, हे कण पीएम १० च्या तुलनेने आधिक सूक्ष्म असून सहज शरीरात प्रवेश करतात. यामुळे श्वसनाचे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. तर पीएम १० हे कण तुलनेने पीएम २.५ पेक्षा मोठे असतात. याचे सामान्य हवेतील प्रमाण ५४ मायक्रो क्युबिक मीटरपेक्षा जास्त नसावे यामुळे हे कण शरीरात गेल्यास उच्च रक्तदाबाचा परिणाम होतो. एअर क्वॉलिटी इंडेक्स नुसार ५० एक्यूआयपर्यंतची हवा चांगली आहे. तर १०० ते २०० एक्यूआयपर्यंतची हवा सर्वसाधारण तर २०० ते ३०० एक्यूआयपर्यंतची हवा शरीरास घातक आणि ३०० ते ४०० एक्यूआयपर्यंतची हवा अतिशय घातक तर ४०० एक्यूआयपर्यंतची हवा अतिशच गंभीर मानली जात आहे. सध्या वसईतील हवेतील धूलिकणाचे प्रमाण वाढले आहे, यामुळे नागरिकांनी पर्यावरणाचा विचार करावा आणि फटाक्यांचा वापर टाळावा अथवा पर्यावरणपूरक फटाके वापरावे, हवेतील प्रदूषण पाहता नागरिकांनी आपली काळजी घ्यावी. - सतीश पडवळ, उपप्रादेशिक अधिकारी- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ फटाक्याचा परिणाम शहरातील हवेवर झाल्याने नागरिकांनी शक्य असल्यास घराच्या बाहेर कमी निघावे, नाहीतर मास्कचा वापर करावा. दमा आणि श्वासाचा त्रास असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. - डॉ. ज्ञानेश्वर टिपरे (चार दिवसांतील हवेची गुणवत्ता (एक्यूआय ) सोमवार : १५४ मंगळवार : १४४ बुधवार : १५० गुरुवार : १५७