वसई : शहरातील पूर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आवश्यक असलेला धारण तलाव (होल्डिंग पॉण्ड) तयार करण्याची पालिकेची योजना बारगळली आहे. धारण तलाव तयार करण्याची तयारी दर्शविणाऱ्या कंपनीने धारण तलावाच्या जागेची माती महामार्गाच्या कामासाठी उपयुक्त नसल्याचे सांगून माघार घेतली आहे. त्यामुळे यावर्षीदेखील धारण तलाव तयार होणार नसून, वसई-विरार शहराला पुराचा धोका कायम आहे. शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या सत्यशोधन समित्यांची नेमणूक केली होती. समितीने अभ्यास करून पालिकेला अहवाल सादर केला होता. या अहवालात इतर सूचनांबरोबरच शहरातील पाण्याचा निचरा सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी व पावसाचे पडणारे पाणी जाण्यासाठी जागा मिळावी, यासाठी धारण तलाव विकसित करण्याची सूचना केली होती. त्यानंतर पालिकेने नालासोपारा पश्चिमेतील निळेमोरे भूमापन क्रमांक १७९ (हिस्सा नंबर १ ड) भूमापन क्रमांक १९५ ( हिस्सा नंबर १ आणि २) तसेच भूमापन क्रमांक २१८ (हिस्सा नंबर १) या जागेवर एकूण ३४,१९०१.२३ चौरस मीटर एवढय़ा जागेवर धारण तलावासाठी जागा आरक्षित केली होती. ही जागा पालिकेला हस्तांतरित झाली होती, मात्र, तलाव विकसित करण्यासाठी मोठा खर्च लागणार होता. तो टाळण्यासाठी पालिकेने १३ डिसेंबर २०२१ रोजी खासगी व्यक्ती संस्था विकासक किंवा ठेकेदार यांच्यामार्फत स्वखर्चाने खोदकाम करून घेण्यासाठी स्वारस्याची अभिरुची (ईओआय) मागविण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी पालिकेने चार वेळा जाहीर सूचना काढली होती, मात्र कुठलीही संस्था अथवा ठेकेदार धारण तलावासाठी पुढे आला नाही. २९ सप्टेंबर २०२२ रोजी पालिकेने पाचव्यांदा फेरसूचना काढली होती. वसईत सध्या मुंबई-बडोदा महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गासाठी मोठय़ा प्रमाणावर माती भरावाची आवश्यकता असते. त्यामुळे या महामार्गाचे काम करणारा मासवण एक्स्प्रेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने तयारी दर्शवली होती. कंपनी धारण तलाव तयार करून ती माती मुंबई-बडोदा एक्सप्रेसच्या कामासाठी वापरणार होती. त्यामुळे यावेळी धारण तलाव तयार करणारा सापडला म्हणून पालिकेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु कंपनीने मातीचे नमुने तपासणीसाठी घेऊन ते चाचणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून ती माती महामार्गासाठी योग्य नसल्याने या कंपनीने धारण तलावाला नकार दिला आहे. वसईत पुन्हा पुराचा धोका पाचव्यांदा जाहीर सूचना काढूनही धारण तलाव करण्यासाठी कुणी पुढे आलेले नाही, तसेच पालिका स्वत:देखील धारण तलाव तयार करण्यास उत्सुक नाही. त्यामुळे येत्या पावसात वसई-विरार शहरात पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, आम्ही पुन्हा फेरसूचना काढणार असल्याचे पालिकेच्या बांधकाम विभागाने जाहीर केले आहे.