वसई:रखडलेल्या विकास कामांबद्दल तसेच वाढीव पाणीपट्टी व घरपट्टीच्या विरोधात व पालिकेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सत्ताधारी पक्षाचे आमदार राजन नाईक यांनी ८ मे गुरुवारी पुकारलेले आंदोलन तात्पुरता स्थगित केले आहे.आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या लेखी आश्वासनानंतर हे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

वसई विरार परिसरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी तसेच वाढीव पाणीपट्टी व घरपट्टी बाबत व कार्यक्षेत्रातील रखडलेल्या विविध विकास कामांबाबत महानगरपालिका वेळ काढूपणा करत असल्याचा आरोप आमदार राजन नाईक यांनी केला होता. या समस्यांना घेऊन गुरुवारी ८ मे रोजी पालिकेच्या मुख्यालया समोर नाईक हे धरणे आंदोलन करणार होते.मात्र पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सर्व मागण्याचे सकारात्मक विचार करण्याचे लेखी आश्वासन आमदार राजन नाईक यांना दिल्यामुळे आमदार राजन नाईक यांनी गुरुवार दिनांक आठ मे रोजी पुकारलेलं धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केले। वसई विरार महापालिकेने दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे कार्यवाही न केल्यास आगामी काळात आंदोलन केले जाईल असा इशाराही राजन नाईक यांनी पालिकेला दिल्या आहे.

पालिकेचे आश्वासन

आयुक्त अनिलकुमार पवार यांनी आमदार राजन नाईक यांना दिलेल्या लेखी पत्रामध्ये मालमत्ता कर व पाणीपट्टी कर यामध्ये होणारी प्रस्तावित वाढ स्थगित केली आहे. त्या संदर्भात सर्वपक्षीय समिती गठीत करण्यात आली असून समितीच्या निर्णयानुसार पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल.ज्या लोकांनी वॉटर सोर्स डेव्हलपमेंट चार्ज यापूर्वी शंभर टक्के भरला असेल त्यांच्याकडून पुन्हा शुल्क आकारला जाणार नाही, निविदा स्वीकृती दरम्यान जे निविदाधारक माघार घेतात किंवा अनामत रक्कम भरत नाहीत अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यासाठी शासन निर्णय व परिपत्रकामध्ये सूचना आढळून येत नाहीत याकरिता याबाबत शासन स्तरावर मार्गदर्शन मागविण्यात येत आहे येणार आहे.

तसेच शहरातील विविध भागातील विकास कामे मालमत्ता कराच्या किमान ७५ टक्के महानगरपालिकेकडे जमा झाल्यानंतर मंजूर करण्यात येत होती परंतु पावसाळ्यापूर्वी कामे व आदिवासी पाड्यांवरील कामे प्राधान्याने करण्यात येतील.महापालिकेच्या बांधकाम विभागात एकत्रित साहित्य पुरविण्याकरिता काढण्यात येणाऱ्या विविध संदर्भात व्यापक अभ्यास करून महापालिकेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येईल असे विविध मागण्यांबाबत लेखी आश्वासन पालिकेने दिले आहे.

आंदोलन केवळ स्टंट बाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसई विरार शहरात सत्तेत असलेले आमदार राजन नाईक हे च स्वतः आंदोलनाला बसत असल्याने विविध राजकीय स्तरातून त्यांच्यावर टीका झाली होती. राजन नाईक यांनी सर्वसामान्य नागरिकांची कामे त्यांचे सरकार असल्याने हक्काने करवून घेणे अपेक्षित आहे. मात्र त्यांनाच आंदोलनाचा मार्ग निवडावा लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. आता आंदोलन स्थगित झाल्याने नाईक यांचे आंदोलन म्हणजे एकप्रकारची स्टंट बाजी होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.