वसई: पालघऱ जिल्ह्यासाठी असलेल्या नवीन परिवहन कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीच्या कामाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. वसई पूर्वेच्या गोखिवरे येथे १४ कोटी रुपये खर्चून ही इमारत तयार करण्यात येत आहे. या नवीन इमारतीचा आराखडा तयार झाला असून दीड ते दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पालघर जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय २०११ पासून विरार पूर्वेच्या चंदनसार येथे अपुऱ्या जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले होते. वसईसह पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा कारभार या केंद्रातून चालवला जातो. मात्र हे कार्यालय शहरापासून लांब असल्याने वाहनधारकांची आणि नागरिकांची गैरसोय होत असते. त्यामुळे वसई विरार शहरात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे केंद्र असावे यासाठी शासनातर्फे डिसेंबर २०१६ मध्ये गोखिवरे येथे जागा मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच फेब्रुवारी २०१७ मध्ये गोखिवरे येथील जागा परिवहन विभागाच्या नावे करण्यात आली होती. या जागेबाबत न्यायालयात दावा दाखल केल्याने या जागेत नवीन कार्यालय तयार करण्याचे काम चार ते पाच वर्षे रखडले होते. त्यानंतर न्यायालयाने ही या जागेच्या संदर्भात हिरवा कंदील दाखविल्याने हे कार्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला होता. कार्यालयाचा आराखडा तयार केला असून याची तांत्रिक मंजुरी घेऊन या बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू करून येत्या दीड ते दोन वर्षांत याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत ठाकरे यांनी सांगितले आहे. नवीन कार्यालय असे असेलवसई पूर्वेच्या गोखिवरे येथील भूमापन क्रमांक २३३/१ येथील ३.३ हेक्टर या जागेत कार्यालयीन इमारत व अद्ययावत वाहने पासिंग व तपासणी प्रमाणपत्र केंद्र तयार केले जाणार आहे. यासाठी सुमारे १३.७८ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यात इमारतीचा खर्च १० कोटी याशिवाय विद्युत उपकरणे व इतर यासाठी उर्वरित निधी खर्च केला जाणार आहे. २२०० चौरस मीटर क्षेत्रात ग्राउंड अधिक २ असे कार्यालय आहे. यात परिवहनच्या विविध कामांच्या अनुषंगाने ३० सेवा खिडक्या तयार केल्या जाणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. जुने कार्यालय धोकादायक२०११ पासून विरार पूर्वेच्या चंदनसार येथे अपुऱ्या जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा कारभार या केंद्रातून चालवला जातो. दररोज ३५० ते ४०० नागरिक हे वाहने नोंदणी, परवाना, बॅच, पासिंग यासह विविध कामांसाठी येतात. कार्यालयाची गेल्या चार ते पाच वर्षांपासून अवस्था खूपच बिकट झाली आहे. पावसाळय़ात पाणी गळती, भिंतींना तडे, वीज समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत कर्मचारी व नागरिक यांचा वावर सुरू असतो. त्यामुळे अजूनही जोपर्यंत नवीन कार्यालय होत नाही तोपर्यंत धोकादायक स्थितीतच कामे उरकावी लागणार आहेत. नवीन परिवहन कार्यालय उभारण्यासाठी आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ाला तांत्रिक मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया पूर्ण करून आम्ही काम सुरू करणार आहोत. - प्रशांत ठाकरे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वसई