वसई:घोडबंदर मार्गावरील गायमुख रस्त्याचे दुरुस्तीचे काम लांबणीवर पडले आहे. त्यामुळे ठाण्याच्या दिशेने होणारी अवजड वाहनांची वाहतूक अजूनही बंद आहे. याचा मोठा परिणाम मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झाला.असल्याचे चित्र दिसून येत आहे.बुधवारी सकाळपासूनच चिंचोटी पासून वसई फाट्या दरम्यान वाहनांच्या लांबलांब रांगा लागून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांना दोन ते तीन तास कोंडीत अडकून राहावे लागत आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने या महामार्गावर वाहनांची वर्दळ असते.
सद्यस्थितीत घोडबंदर मार्गावरील गायमुख येथे रस्त्याची दुरावस्था झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम २६ एप्रिल पासून सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. हे काम २९ एप्रिल या दरम्यान पूर्ण होणार होते. यासाठी यामार्गावर होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करून ती चिंचोटी भिवंडी या पर्यायी मार्गाने वळविली होती. मात्र विहित वेळेत काम पूर्ण न झाल्याने आणखीन दोन दिवस ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी घातली आहे.


या प्रवेश बंदीचा परिणाम राष्ट्रीय महामार्गावर झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.


बुधवारी सकाळपासूनच महामार्गावर चिंचोटी पुलापासून ते वसई फाटा, विरार अशा दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. वाहनांच्या दहा ते बारा किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे. विशेषतः आज अक्षय तृतीया असल्याचे अनेक नागरिक विविध ठिकाणी देवदर्शन व अन्य ठिकाणी फिरण्यासाठी निघाले होते. मात्र या अवजड वाहनांच्या कोंडीत चारचाकी व अन्य हलक्या वाहनांची कोंडी झाली असल्याने प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले.
वाहने सुद्धा अगदी धीम्या गतीने पुढे सरकत आहेत त्यामुळे दोन ते तीन तास या कोंडीत अडकून राहावे लागले असल्याचे एका वाहनचालकाने सांगितले आहे.


ऐन सणासुदीला अशा प्रकारे कोंडी झाल्याने निश्चित स्थळी जाता आले नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
चिंचोटी महामार्ग पोलिसांकडून वाहतूक नियंत्रण करण्याचे काम सुरू आहे असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

पर्यायी मार्गाने प्रवास


विरार वरून मुंबई यासह विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी निघाले होते. सकाळी दहा वाजल्यापासूनच चिंचोटी पुलापासून वाहतूक कोंडी सुरू होऊन हळूहळू दहा ते बारा किलोमीटर पर्यंत रांगा पोहचल्या. या कोंडीमुळे अनेकांना नालासोपारा फाटा, भोयदापाडा, सातीवली फाटा येथून वळसा घेऊन नायगाव बापाणे मार्गाने प्रवास करावा लागला. त्यामुळे वेळ व इंधन ही वाया गेले असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.

लेनची शिस्त पाळली जात नसल्याचा फटका


राष्ट्रीय महामार्गावर एका वाहिनीवर तीन लेन आहेत, मात्र अवजड वाहन चालक हे लेनची शिस्त पाळत नसल्याने वाहतूक कोंडी अधिक होते. विशेषतः आता अवजड वाहनांना ठाण्याच्या दिशेने जाण्यास बंदी आहे. मात्र अवजड वाहनचालक लेन व्यवस्थित पाळत नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे. अन्य छोटी वाहने अडकून पडत आहेत.

मालवाहतूक दारांना फटका

घोडबंदर येथील काम चार दिवसात पूर्ण केले जाणार होते. म्हणून काही मालवाहतूकदारांनी आपली वाहने ढाबे, हॉटेल, खासगी पार्किंग अशा ठिकाणी उभी केली होती. आता आणखीन दोन दिवस वाढल्याने मालवाहतूक दारांची कोंडी झाली आहे. पर्यायी व्यवस्था जी आहे त्या ठिकाणचे रस्ते प्रचंड खराब आहेत. अशा रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे असे चालकांचे म्हणणे आहे.

वाहतूक पोलीस हतबल

घोडबंदर येथील कामाचा परिणाम राष्ट्रीय महामार्गावर दिसून येत आहे. वाहतूक पोलिसांकडून मालवाहतूक वाहने थांबविणे, पर्यायी मार्गाने वळविणे अशी कामे सुरूच आहे. मात्र अवजड न अन्य वाहनांची संख्या जास्त असल्याने कोंडी होत आहे. मध्येच काही वाहने बंद पडतात त्यामुळे कोंडी वाढत जाते. अशा वेळी वाहतूक नियंत्रण करताना अडचणी निर्माण होत आहेत असे चिंचोटी महामार्ग वाहतूक पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले आहे.