वसई: वसई विरार शहरातील बेकायदेशीर वाहतूक करणार्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई सुरूच आहे. या कारवाईत आता पर्यंत ८३ रिक्षा, १० मॅजिक गाड्या, २ इको वाहन आणि २ बसवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर वाहतूक करणार्या वाहनचालकांची पळापळ झाली असून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
वसई विरार शहरात बेकायदेशीरपणे वाहतूक करणार्या वाहनांचा प्रश्न चिघलला आहे. बेकायदेशीर रिक्षाप्रमाणे वाहने, बस, इको वाहने यातून प्रवाशांची वाहतूक होत असते. अशा खासगी वाहनांना प्रवासी वाहतूकींना परवागनी नसते. मात्र त्याची सर्रास वाहतूक सुरू आहे. यामुळे आता रिक्षाचालक आणि प्रवाशांची खासगी वाहतूक कऱणार्या वाहनचालकांमध्येच वाद होऊ लागले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे वसई वाहतूक विभागाने मागील आठवड्यापासून सर्वच प्रकारच्या बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांविरोधात मोहीम उघडली आहे. या कारवायात आता पर्यंत आता पर्यंत ८३ रिक्षा, १० मॅजिक गाड्या, २ इको वाहन आणि २ बसवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वसई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांघी यांनी दिली.
प्रवाशांना दिलासा, बेकायदेशीर वाहनचालकांची पळापळ
अनधिकृत वाहनांवर कारवाई सुरू असल्याने बेकायदेशीर रिक्षाचालक तसेच खासगी वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. कारवाईच्या भीतीपोटी वाहनचालकांनी पळ काढला आहे. बेकायदेशीर वाहनांची संख्या कमी झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या सुटली आहे. वसई पूर्वेला झालेल्या कारवाईमुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कारवाईच्या भीतीने रिक्षाचालक प्रवाशांची योग्य व्यवहार करत आहेत. वाहतूक पोलिसांनी अशीच कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.