भाईंदर, मीरा रोड रेल्वे स्थानकांचाही समावेश वसई: मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी३) अंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या १९ स्थानकांचा विकास केला जाणार आहे. त्यात पश्चिम रेल्वेच्या वसई, नालासोपारा, भाईदर आणि मीरा रोड या स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा खर्च ९४७ कोटी रुपये अपेक्षित आहे. मुंबईत मध्य आणि पश्चिम मिळूण एकूण ११९ स्थानके आहेत. यातील अनेक स्थानके ही ८० वर्षांहून अधिक जुनी आहेत. प्रवाशांची संख्या वाढत असून स्थानकांची जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे रेल्वेने पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या एकूण १९ स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. ३३ हजार कोटी रुपयांच्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प टप्पा ३ अंतर्गत हा विकास केला जाणार आहे. पश्चिम रेल्वेची ११ स्थानके पश्चिम रेल्वेच्या कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, मुंबई सेंट्रल, खार, नालासोपारा, वसई, सांताक्रूझ या ८ स्थानकांचा, तर मध्य रेल्वेच्या जीटीबी नगर, भांडुप, गोवंडी, मानखुर्द, डोंबिवली, नेरळ, कसारा, चेंबूर, मुलुंड, घाटकोपर, विक्रोळी या ११ स्थानकांचा समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. विकासाची योजना या रेल्वे स्थानकांमध्ये पादचारी पूल, सरकते जिने, एलिव्हेटेड डेक, स्थानकांना अंतर्गत जोडणारे पादचारी पूल बांधले जाणार आहेत. स्थानकाबाहेरील परिसर मोकळा केला जाणार आहे. त्यासाठी रेल्वेच्या वास्तू, कार्यालये, तसेच इतर आस्थापना अन्यत्र हलविण्यात येणार आहे. स्थानकात प्रवेशाचे आणि बाहेर जाण्याचे मार्ग वाढविले जाणार आहे. स्थानकाबाहेर ग्रीन कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे, जेणेकरून १२ तसेच १५ डब्यांच्या गाडय़ा स्थानकात वापर होऊ शकेल. पश्चिम रेल्वेसाठी पालघर जिल्ह्यातील वाणगाव येथे ३५ हेक्टर जागेवर अत्याधुनिक कारशेड, तर मध्य रेल्वेसाठी भिवपुरीजवळील कर्जत येथे ५५ हेक्टर जागेवर कारशेड बांधले जाणार आहे. एकूण ७ टप्प्यांमध्ये हा प्रकल्प २०२५ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. त्याचा खर्च ९४७ कोटी रुपये अपेक्षित आहे.