अत्यावश्यक सेवेची बनावट कागदपत्रे बनवणारी टोळी सक्रिय

मयूर ठाकूर

भाईंदर : एकीकडे लसीची कमतरता भासत असल्यामुळे सामान्य नागरिकांना लशींच्या प्रतीक्षेत बसावे लागत आहे, तर दुसरीकडे अत्यावश्यक सेवेची बनावट ओळखपत्रे तयार करून लसीकरण करून घेत असलेल्यांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही कागदपत्रे तयार करून देणारी टोळी सक्रिय झाली असून यांना खासगी रुग्णालय सहकार्य करत आहेत.

मीरा-भाईंदर शहरात करोना आजाराचा संसर्ग झपाटय़ाने होत असल्यामुळे यावर उपाय म्हणून लसीकरण मोहिमेला पालिका प्रशासनाकडून अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. यात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार टप्प्याटप्प्याने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नागरिकांना लसीकरण करण्याचे आयोजन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून देशात लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे १८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तसेच लस प्राप्त करण्याकरिता जागतिक पातळीवर निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून अधिकाधिक लस उपलब्ध करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. मात्र अशा परिस्थितीत गैरपद्धतीने लसीकरण होत असल्याचेदेखील समोर येत आहे.

मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या साधारण चौदा लाखांच्या घरात आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याकरिता प्रशासनाकडून विविध स्वरूपाच्या उपाययोजना आखण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण २ लाख ४४ हजार ६२९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यात आरोग्य कर्मचारी १८ हजार ६५, शासकीय कर्मचारी ११ हजार ९१६, ज्येष्ठ नागरिक २ लाख ७ हजार ८६४ आणि १८ ते ४५ वयोगटांतील ६ हजार ७८४ नागरिकांचा समावेश आहे.

मात्र दररोज वाढत चाललेल्या करोनाच्या संसर्गामुळे लस प्राप्त करण्याकरिता नागरिकांची धावपळ सुरू आहे. अशा परिस्थिती लसीकरण केंद्रावर केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचे लसीकरण होत असल्यामुळे बनावट पद्धतीने कागदपत्रे तयार करणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात अपेक्षेपेक्षा बारा हजारांहून आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली असल्याचे पालिकेच्या लसीकरण अहवालात दिसून आले आहे. तर यावर गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अपेक्षेपेक्षा अधिक लसीकरण

मीरा-भाईंदर शहरात लसीकरण सुलभ पद्धतीने व्हावे या हेतूने प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली होती. यात आरोग्य सेवेत ६ हजार ५७३ व शासकीय सेवेत ५१४३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत तब्बल आरोग्य सेवेतील १८ हजार ६५ आणि शासकीय सेवेतील ११ हजार ९१६ जणांना लस देण्यात आली असल्याचे उघडकीस आले आली आहे. यात बनावट कागदपत्रांच्या द्वारे लस उपलब्ध करून दिली जात असून त्याकरिता तीन ते चार हजार रुपयांपर्यंत मागणी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. विशेष बाब म्हणजे लसीकरणाकरिता आवश्यक कागदपत्रे खासगी रुग्णालयाच्या सहकार्याने तयार होत आहेत.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत लसीकरण केंद्रावर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांच्या कागदपत्राची तपासणी करून लस दिली जाते. यात गेल्या वेळच्या तुलनेत आता घाबरलेले कर्मचारी लस घेण्यास पुढे येत आहेत. यात त्या कर्मचाऱ्यांकडे रुग्णालयाचे पत्र व ओळखपत्रदेखील असते. मात्र त्यात बनावट कागदपत्रे वापरून जर लस घेत असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अंजली पाटील, लसीकरण प्रमुख (मीरा-भाईंदर महानगरपालिका)