शिवसेनेचा विरोध मावळला, मात्र कार्यकर्ते अडकले वसई : व्हॅलेंटाइन डेला शिवसेनेचा विरोध मावळला असला तरी यापूर्वी केलेल्या आंदोलनाची झळ अद्यापही शिवसैनिकांना सहन करावी लागत आहे. २००६ मध्ये नालासोपारा येथे आयोजित एक व्हॅलेंटाइन पार्टी शिवसैनिकांनी उधळून लावली होते. या घटनेला १६ वर्षे उलटून गेली असली तरी अद्यापही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे या आंदोलनातील ३२ शिवसैनिक अद्यापही न्यायालयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. हे प्रकरण देशपातळीवर गाजले होते. याप्रकरणी खुद्द बाळासाहेब ठाकरे यांना ही जाहीर माफी मागावी लागली होती. तरुणींना मारहाण आणि विनयभंग केल्याप्रकरणी ३२ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवसेना तालुकाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी सांगितले की, न्यायालयामध्ये सतत तारखा पडत असल्यामुळे या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. पोलिसांना फिर्यादी सापडत नसल्यामुळे पुढील प्रक्रिया पूर्ण होत नाही. यामुळे अनेक शिवसैनिकांच्या कारकीर्दीला फटका बसला आहे. शिवसेनेचा व्हॅलेंटाइन डेला विरोध मावळला आहे, मात्र आम्ही अद्यापही कायद्याच्या कचाटय़ातून सुटला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची पुढील तारीख २४ फेब्रुवारी रोजी आहे