विरार : वसई विरार परिसरातील विविध मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद गेल्या महिनाभरापासून बंद आहेत. वेळोवेळी तक्रारी करूनही पालिका त्याची दखल घेत नाही.वसई विरार महानगर पालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. विरारमधील आर जे नगर येथील ९० फुटी रस्त्यावरील १० पथदिवे गेल्या महिनाभरापासून बंद आहेत. तर मनवेल पाडा परिसरातील चैतन्य रुग्णालयापासून प्रगती नगर परिसरातील १२पथदिवे बंद आहेत. या मार्गावर रुग्णालय आहे. येथे पथदिवे बंद असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. जीवदानी पाडा ते महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील १७ पथदिवे बंद आहेत. शहरात दाखल होण्यासाठी हा मुख्य मार्ग आहे.शहरातील प्रमुख रस्त्यावरील दिवे बंद असल्याने या रस्त्यावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे प्रकाशाअभावी चित्रीकरण करण्यास असमर्थ आहेत. यामुळे गुन्हेगारीला चालना मिळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पथदिवे बंद असल्याने वाहनचालकांसह रात्री कामावरून परतणाऱ्या पादचाऱ्यांना, कर्मचाऱ्यांनाही अंधारातून वाटचाल करावी लागते. अनेक ठिकाणी पदपथांवर गटारांची झाकणे उघडी असल्याने पादचारी गटारात पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर मार्गावरील असलेले गतिरोधकावर दिशादर्शक पट्टे नसल्याने वाहनचालकांना अपघातांना बळी पडावे लागत आहे. यामुळे पालिकेने हे पथदिवे लवकरात लवकर दुरुस्त करून सुरू करावे अशी मागणी केली जात आहे.