वसई: वसई विरार महापालिकेने नालासोपारा येथील निळेमोरे येथे धारणतलावासाठी जागा आरक्षित केली आहे. त्या आरक्षित जागेतील चार एकर जागेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहेत. तर उर्वरित जागेत २ मीटर खोलीकरण करून त्या ठिकाणी धारणतलाव विकसित केले जाणार आहे. मात्र धारणतलावासाठी आरक्षित जागेत सांडपाणी प्रकल्प उभारला जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मागील काही वर्षापासून वसई विरार शहराला पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे ही समस्या अधिकच बिकट होऊ लागली आहे. २०१८ मध्ये शहरात पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर पूरस्थितीची समस्या सुटावी व यापुढेही पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या सत्यशोधन समित्यांची नियुक्ती केली होती. त्यांनी धारण तलाव विकसित होणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद केले होते. त्यानुसार महापालिकेने नालासोपारा पश्चिमेतील निळेमोरे येथील सर्व्हे क्रमांक १७९, हिस्सा न १ /ड या भागात सुमारे १४१ एकर इतकी जागा धारणतलाव विकसित करण्यासाठी महापालिकेने आरक्षित केली आहे.
मात्र पाच वर्षे उलटून गेल्यानंतर ही त्या ठिकाणी धारणतलाव विकसित होऊ शकले नाही. ऑगस्ट २०२५ मध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीने ही शहरासाठी धारणतलाव महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित झाले होते. यासाठी निळेमोरे येथील प्रस्तावित असलेल्या धारणतलावासाठी २२२ कोटींचा आरखडा तयार केला आहे. मात्र धारणतलावासाठी आरक्षित असलेल्या जागेतच आता सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या जागेत सांडपाणी प्रकल्प उभारला जाणार असल्याने याबाबत वसईतील काही नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.
दरवर्षी वसई विरार शहरातील नागरिकांना पूरस्थितीच्या समस्येला तोंड द्यावे लागते त्यासाठी धारणतलाव महत्वाचे असताना त्यात बदल करून अन्य प्रकल्प राबवणे चुकीचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनी सांगितले आहे. पण सांडपाणी प्रकल्पासाठी १४१ एकर पैकी फक्त ४ एकर जागेवर सांडपाणी प्रकल्प उभारला जाणार असून उर्वरित १३७ एकर जागेवर धारणतलाव विकसित केले जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
२ मीटरने खोली वाढविणार
निळेमोरे येथील पाणथळ धारणतलावासाठी आरक्षित असली तरी त्यापैकी काही भागात सांडपाणी प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे उर्वरित जागेत तयार करण्यात येणाऱ्या धारणतलावांची २ मीटर ने खोली वाढविली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ही शहरासाठी महत्वाचा आहे असेही त्यांनी सांगितले.
पाणथळ जागांवरच प्रकल्पांचा घाला
वसईतील विकास आराखड्यात मैदान, बगीचे, सांस्कृतिक केंद्र, समाज केंद्र आदींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे प्रशासनाने पाणथळ जागा आणि धारण तलावांसाठी आरक्षित जागांवर प्रकल्पांचा भडिमार सुरू केला आहे. त्यामुळे २०२६ ते २०४६ चा वसईचा विकास आराखडा लोकाभिमुख असावा, अशी मागणी मॅकेन्झी डाबरे यांनी केली आहे.

