वसई-विरार महापालिकेचा दोन हजार ३४७ कोटींचा अर्थसंकल्प सादर; कल्याणकारी योजनांसाठी भरीव तरतूद

वसई : वसईकरांवर कोणतीही करवाढ न लादता उत्पन्नवाढीसाठी वेगळय़ा पर्यायांचा अवलंब करणारा २०२२-२३चा अर्थसंकल्प बुधवारी वसई-विरार महापालिका प्रशासकांना सादर करण्यात आला. निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही स्वरूपाची करवाढ न करता कल्याणकारी योजनांसाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
TDS on salary tax regime
पगारावरील टीडीएस वाचवण्यासाठी जुनी की नवी कोणती कर रचना निवडणार? जाणून घ्या
ST buses
एसटीच्या मार्गात आचारसंहितेचा अडथळा
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

 वसई-विरार महापालिकेचा सन २०२१-२२ या वर्षांचा सुधारित २ हजार २८२ कोटी आणि सन २०२२-२३ या वर्षांचा २ हजार ३४७ कोटी ६८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य लेखापरीक्षकांनी प्रशासक अनिलकुमार पवार यांच्याकडे सादर केला. सुमारे १६ कोटी ५७ लाख रुपयांच्या या शिलकी अर्थसंकल्पावर  विविधांगी चर्चा करून आठवडाभरात त्याला प्रशासकाकडून अंतिम मंजुरी देण्यात येईल. महापालिका आयुक्ताऐवजी प्रशासकामार्फत अर्थसंकल्प सादर होण्याची ही सलग दुसरी वेळ.  अंदाजपत्रक सादर करतेवेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अरुण कोल्हे, मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे, महानगरपालिकेच्या विविध विभागांचे विभाग प्रमुख व इतर अधिकारी तसेच लेखा विभागाचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उपस्थित होते.

वसई-विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवणुका होऊ घातल्या आहेत. त्या डोळय़ासमोर ठेवून कसल्याही प्रकारची करवाढ लादण्यात आलेली नाही. मालमत्ता कर हे पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे पालिकेने आगामी वर्षांत ३० कोटी रुपयांनी उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आहे. याशिवाय अग्निशमन, जाहिरात आणि पाणीपट्टी करातून उत्पन्न वाढविण्याचे नियोजन केले आहे. मागील दोन वर्षांत महसुली अनुदाने मिळविण्यात महापालिकेला अपेक्षित यश आले नव्हते. चालू वर्षांत पालिकेने महसुली अनुदानामार्फत ४५४ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे.

महत्त्वाच्या घोषणा,

योजना ४३ हजार नवीन नळजोडण्या आणि जलमापके

सन २०२२ -२३ च्या अर्थसंकल्पात पालिकेने ४७ हजार नव्या नळजोडण्या देण्याची तरतूद केली आहे. सध्या पालिकेच्या पाणीपुरवठय़ात वाढ झाली असून पालिका नव्या नळजोडण्यांना प्राधान्य देणार आहे. या जोडण्या टप्प्याटप्प्याने करणार असून त्याचबरोबर जलमापके (वॉटर मीटर) बसविणार आहे.

बायोगॅस प्रकल्प

घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेने भरीव तरतूद केली आहे. यात पालिकेने गटार सफाईसाठी ९ यांत्रिक सक्शन पंप खरेदी केले असून. त्याच जोडीला पालिका या वर्षी प्रथमच बायोगॅस आणि ग्रीन वेस्ट प्रकल्प राबविणार आहे.

नवीन परिवहन भवन

या वर्षी पालिकेचे नवीन परिवहन भवन तयार होणार असून तेथे पालिकेचे मुख्यालय स्थलांतरित केले जाणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी परिवहनच्या ताफ्यात ई-बसेसचा समावेश केला जाणार आहे.

रस्ते बांधणीची नवी प्रणाली

रस्ते बांधणी आणि दुरुस्तीसाठी पालिका या वर्षी ‘अल्ट्रा थिन व्हायर टॉिपग’ या प्रणालीचा वापर करणार आहे. सदरच्या प्रणालीत रस्ते हे सिमेंटचे असून त्याची जाडी कमी असणार आहे. कमी खर्च आणि लवकर हे रस्ते तयार केले जातात. यासाठी पॅनल पद्धतीचा वापर केला जात असून जेणेकरून एखादा भाग खराब झाल्यास केवळ तेवढाच भाग दुरुस्त करून नियमित रस्ता तयार केला जाऊ शकतो. तसेच यावर खड्डे पडण्याची शक्यतासुद्धा कमी असल्याने पालिकेचा खर्च वाचणार आहे.

वैद्यकीय आरोग्य सेवेसाठी ११० कोटी

करोनाच्या महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थापन करण्यात  उडालेली तारांबळ लक्षात घेता वसई-विरार महापालिकेने आरोग्य सेवा सक्षमीकरण करण्यावर भर दिला आहे. आरोग्य सेवेसाठी ११० कोटी २४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ४९.८९ कोटींची वाढ करण्यात आली आहे.

सर्व घटकांना न्याय देणारा सर्वसमावेषक असा अर्थसंकल्प तयार करण्यावर आम्ही भर दिला आहे. करोनाच्या संकटानंतर आरोग्य विभाग अधिक बळकट केली जाणार आहे. मजबूत रस्त्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. उत्पन्न वाढविताना सर्वसामान्य नागरिकांवर बोजा पडू नये यासाठी नवीन करवाढ किंवा दरवाढ करण्यात आलेली नाही.

अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका

अर्थसंकल्पातील जमा

* अनुदाने : २३ %

* करापासून जमा : १८%

* किरकोळ जमा : २%

* विशेष अधिनियमाअंतर्गत जमा : १३%

* फीपासून जमा : ३%

* इतर असाधारण जमा : १०%

अर्थसंकल्पातील खर्च

* आस्थापना व प्रशासकीय खर्च : १५ %

* अपंग, महिला बालकल्याण, मागासवर्ग, क्रीडा- ८ %

* सेवांचा खर्च- २५ %

* इतर खर्च- ५ %

* विकासकामे खर्च- ३८ %

* इतर असाधारण खर्च- ९ %

वसई-विरार पालिका अर्थसंकल्पातील तरतुदी

पथदिवे व विद्युत व्यवस्थेसाठी ९६ कोटी

शहरातील मुख्य रस्त्यावर आवश्यकतेनुसार पथदिवे लावण्यात येणार आहेत. अपारंपरिक ऊर्जास्रोत निर्मिती, एल. ई. डी. दिव्यांची व्यवस्था, विद्युतदेयक, विद्युत मंडळाचे चार्जेस, पोल स्थलांतर, नवीन पोल उभारणे, भूमिगत वाहिन्या, टायमर व्यवस्था, यासाठी पालिकेने ९६.१२ कोटींची तरतूद प्रास्तावित करण्यात आली आहे.

अग्नीसुरक्षेसाठी ९२ कोटी

अग्निशमन विभागाच्या निधीत  ६० कोटींहून अधिक रकमेची वाढ करण्यात आली आहे. यात आधुनिक यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी ९२ कोटी ४४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

परिवहन सेवेसाठी ५४ कोटी

परिवहन सेवेत ई बसेसचा समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय परिवहन उपक्रमासाठी यशवंत नगर येथे परिवहन भवनाचे बांधकाम चालू आहे. त्या अनुषंगाने बस खरेदी व परिवहन भवन बांधकाम यासाठी मुख्य निधी कडून परिवहन उपक्रमासाठी ५४ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

पूर नियंत्रणासाठी ९ कोटी ५० लाख

वसई विरार शहरात मागील काही काळात पूरस्थितीची समस्या निर्माण होत आहे. याचा मोठा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे. या समस्या सुटाव्यात यासाठी यांत्रिक नालेसफाई व इतर पूरप्रतिबंधक कामांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ९ कोटी ५० लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.

घनकचरा व्यवस्थापनासाठी २५२ कोटी

क्षेपणभूमीवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याकरिता घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत एम आर ई, सीएनडी वेस्ट, हिरवा कचरा, तसेच बायोगॅस प्रकल्प राबविण्यात येणार आहे. दैनंदिन साफसफाई, डास निर्मूलनसह सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन यासाठी २५२ कोटी ६३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

सूर्या योजनेतून ४०३ दशलक्ष लिटर

पाणीपुरवठा योजनेतून १८५ दशलक्ष लिटर पाणी डिसेंबर २०२२ अखेर उपलब्ध होणार असून सदर पाणी वितरित करण्याच्या दृष्टीने वितरण व्यवस्था विस्तारीकरण व बळकटीकरण करिता पालिकेने स्वतंत्र ५० कोटीची तरतूद केली आहे. याशिवाय पाणीपुरवठा व देखभाल दुरुस्ती यासाठी २६३ कोटी १७ लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

महिला बालकल्याणासाठी १७ कोटी ८६ लाख

महिला बालकल्याण विभागाकडून वसई विरार शहरात विविध योजना राबविल्या जात आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात पालिकेने भरीव अशी तरतूद केली आहे. २०२१-२२ मध्ये ९ कोटी ६१ लाख इतकी तरतूद केली होती. यात पालिकेने वाढ करून यावर्षी १७ कोटी ८६ लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.