वसई: मागील आठवडाभरापासून वसई-विरार शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीमुळे बुधवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा ही रद्द करण्यात आली आहे. महापौरांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

​वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव परिसर मागील तीन दिवसांपासून पूर्णपणे जलमय झाले आहेत. अनेक सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाला (मुख्यालय) देखील पावसाच्या पाण्याचा वेढा बसला आहे.

त्यामुळे बुधवारी ८ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली महासभा रद्द करण्यात आली आहे. सभेची पुढील तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल, अशी माहिती महानगरपालिका सचिव विश्वनाथ तळेकर यांनी दिली आहे.

​लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मदतकार्यात सक्रिय

​शहरातील या गंभीर आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता, नागरिकांची सुरक्षा आणि मदतकार्याला प्राधान्य देण्यात आले आहे. सध्या नगरसेवक, पदाधिकारी, तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पूरग्रस्त भागात नागरिकांच्या बचावकार्यासाठी आणि मदतीसाठी अहोरात्र कार्यरत आहेत.