लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई : वसई विरार मधील ४ शहरांना जोडणार्या रिंगरूट प्रकल्प मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) धूळखात पडला आहे. या प्रकल्पाला अडीच हजार कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. निधी मिळाला तरी भूसंपादन, अतिक्रमण आदी विविध अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी विविध प्रस्ताव तयार करण्यात आला आहेत. त्यात शहरातील ७ उड्डाणपूल, ४ रेल्वे उड्डाणपूल आदी नव्या प्रस्तावांबरोबर रिंगरुटच्या जुन्या प्रस्तावाचा समावेश आहे. वसई विरार मधील ४ शहरे आणि २२ गावांना एकाच रस्त्याने जोडणारा रिंगरूट हा प्रकल्प आहे. त्यासाठी ४० मीटरचा रुंदीचा आणि ३७ किलोमीटर लांबीचा रस्ता उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या आराखडा आणि जागां च्या सर्वेक्षणाचे काम २०१९ मध्येच पूर्ण झाले होते.
पालिकेने या प्रकल्पासाठी एमएमआरडीएकडे सव्वादोन हजार कोटींची मागणी केली होती. आता हा खर्च अडीच हजारांच्या घरात गेला आहे. निधी मंजूर होत नसल्याने प्रकल्पाला सुरवात झालेली नाही. माजी नगरसेविका जोस्पीन फरगोस यांनी हा प्रकल्प त्वरीत सुरू करण्याची मागणी केली आहे. या प्रकल्पाला मंजूरी मिळावी यासाठी आम्ही एमएमआरडीएकडे पाठपुरावा करत आहोत, असे वसई विरार महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी लेखी उत्तरात दिले आहे.
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पालिकेला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. रस्त्यासाठी मीठागर, शासकीय जागा, वन विभाग यांच्याही जागा घ्याव्या लागणार आहेत. रस्त्यासाठी अंदाजे ६० टक्के खासगी जागा पालिकेला संपादित कराव्या लागणार आहेत. रस्त्याच्या कामात ज्या जागा बाधीत होतील त्या जागा मालकांना विकास हस्तांतरण शुल्क (टीडीआर) लाभ देणे व या जागा ताब्यात घेणे असे काम करावे लागणा आहे. विरार पूर्वेला जीवदानी पाडा येथे रेल्वेची दगडखाण आहे. ती सध्या कार्यरत आहे ती रेल्वेकडून मिळवावी लागणार आहे.
भूसंपादन आणि अनधिकृत बांधकामांच्या अडचणी
या मार्गाच्या कामासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या जागेत अनेक विकासकांनी अनधिकृत बांधकामे उभारली आहे. या रिंग-रोड रस्त्याखाली बाधित होणार्या जमिनीची गावनिहाय यादी पालिकेत भूसंपादनासाठी सादर केली गेली आहे. त्यानुसार टिवरी, नारिंगी, गास, उमेळे, बरामपूर, सामेळपाडा, सोपारे, विरार, कोपरी, गोखिवरे, जूचंद्र, तुळींज, डोंगरी, बोळींज, आचोळे, मोरे, राजावली, माणिकपूर, बोळींज, करमाळे, निळेमोरे, दिवाणमान अशा गावातील जमीन पालिकेला संपादित करावी लागणार आहे. दरम्यान रिंगरोडमध्ये येणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे.
कसा आहे प्रस्तावित रिंगरूट
रिंग रूट म्हणजे बाह्य वळण रस्ता. २२ गावांमधून जाणारा रिंग-रोड ४० मीटर रूंदीचा असून त्याची एकूण लांबी ३८ किलो मीटर इतकी आहे.हा प्रस्तावित भव्य असा रिंग-रोड गास-कोपरी येथून सुरू होऊन चिखलडोंगरे-बोळींज-सोपारा शुर्पारक मैदानामार्गे- बरामपूर- उमेळे- जूचंद्र- माणिकपूर- आचोळे-तुळींज-विरार फुलपाडा-कोपरी-गासकोपरी असा आहे. हा रिंगरोड झाल्यास शहराच्या कोणत्याही भागात तात्काळ पोहोचणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी रस्त्याच्या भूसंपादनासाठी सर्वेक्षण करणे, बाधित जमीन मालकांची यादी तयार करणे, सात-बारा उतारे प्राप्त करून घेणे, जागेवर सिमांकन करणे, भूसंपादनाचा प्रस्ताव मोनार्च या कंपनीने पूर्ण केले आहे.