वसई:- वसई-विरार शहरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी प्रक्रिया न करताच खाडीत सोडल्या जाणाऱ्या मैल्यावर आता प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी प्रकल्प उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नवघर येथील सहा एकर जागेत हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी जवळपास ७ ते ८ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

​वसई-विरार शहरात सुमारे २२५ किलोमीटर लांबीची गटारे असून त्यावर १ लाखांहून अधिक झाकणे आहेत. मात्र, प्लास्टिक कचरा आणि साचलेल्या गाळामुळे पावसाळ्यात ही गटारे तुंबतात, ज्यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते. यापूर्वी आधुनिक यंत्रसामग्रीच्या अभावामुळे काढलेला गाळ रस्त्याच्या कडेला किंवा लोकवस्तीत टाकला जात असे, ज्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत होते.

तर दुसरीकडे खाडी पात्रात ही मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वसई विरार महापालिकेने आधुनिक यंत्राचा वापर करून स्वच्छता करण्यावर भर दिला आहे. यापूर्वी गटार किंवा शौचालयांच्या टाक्यांमधील गाळ थेट खाडीत सोडला जात असल्याच्या तक्रारी होत्या. आता मैला प्रक्रिया प्रकल्पाद्वारे (एफएसटीपी) त्यावर प्रक्रिया करूनच तो विसर्जित केला जाणार आहे.

असा आहे प्रकल्प

या प्रकल्पासाठी महापालिकेने नवघर येथे सहा एकर जागा शोधली असून त्यावर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यात’डिझाइन, बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर’ तत्त्वावर ‘मैला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ (एफएसटीपी) उभारला जाईल.या प्रकल्पाचे बांधकाम, कार्यान्वयन, तसेच त्याचे संचालन आणि देखभाल संपूर्ण ७ वर्षासाठी मे.आर एन बी इन्फ्रा यांना ठेका दिला आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण करून प्रकल्प कार्यान्वित करण्यात यावा अशा सूचना संबंधित ठेकेदाराला केल्या आहेत.

गटारातील निघणारा गाळ आहे त्यावर प्रक्रिया करण्यासाठी एफएसटीपी प्रकल्प उभारला जाणार आहे. नवघर येथे जागा शोधली आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू होईल. :– जितेंद्र नाईक, सहायक आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन )

खाडी पात्रातील प्रदूषण रोखण्यास मदत

वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात खाड्या आहेत. याच खाड्यामधून शहरातील सांडपाणी, व इतर कंपन्यामधून निघणारा दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहून जातो. अशा प्रकारच्या सांडपाण्यामुळे येथील खाड्या प्रदूषित होत आहेत. यामुळे यातील जैवविविधता ही धोक्यात येत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने या खाड्या अत्यंत महत्त्वाच्या असून जर अंतर्गत गटाराच्या मैल्यावर प्रक्रिया करून सोडल्यास खाड्या ही स्वच्छ राहण्यास मदत होईल.