वसई: वसई विरार शहरातील पाणी समस्या लक्षात घेता वाढीव पाण्याचे नियोजन करण्यासाठी खोलसापाडा १ व २ या धरणांची उभारणी केली जाणार आहे.त्यातील खोलसापाडा २ या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच शहराला आणखीन २२ दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होणार आहे.
मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे पाण्याची मागणी ही वाढू लागली आहे. सद्यस्थितीत शहराला सूर्या योजनेच्या धामणी व कवडास , उसगाव , पेल्हार या तीन धरणातून २३० दशलक्ष लीटर तर एमएमआरडीएच्या सुर्या प्रकल्पातून १८५ दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा मंजूर केला आहे त्यापैकी १७० दशलक्ष लीटर असा एकूण ४०० दशलक्ष लीटर पाण्याचा प्रतिदिन होतो. वाढती लोकसंख्या आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे पाण्याची गळती होत असल्याने पाण्याची तूटही मोठी आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागांत पाणी मिळत नाही.
वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी लक्षात घेऊन पालिकेने खोलसापाडाची दोन्ही धरणे विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात खोलसापाडा धरण-२ हे विकसित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पालिकेने या धरणाच्या कामाला सप्टेंबर २०१८ मध्ये मंजुरी दिली होती. मात्र वनखात्याच्या परवानगीसह अनेक अडथळे येत होते. शासनदरबारी पाठपुरावा केल्यानंतर धरणाच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले होते. त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. सद्यस्थितीत खोलसापाडा-२ धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. १३५ कोटीरुपयांच्या प्रकल्पातून पालिकेला २२ दशलक्षलीटर पाणी लवकरच उपलब्ध होणार आहे.असे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे. आता या धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
शहराला अतिरिक्त पाणी कसे उपलब्ध होईल याचा पालिका विचार करीत आहे. खोलसापाडा असेल किंवा देहर्जी असेल या प्रकल्पांच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेऊन कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – अनिलकुमार पवार, आयुक्त वसई विरार महापालिका
खोलसापाडा १ साठी प्रस्ताव
भविष्यात शहराची लोकसंख्या ही ५० लाखांच्या घरात जाणार आहे. त्याच अनुषंगाने पाण्याचे नियोजन करण्यावर पालिकेने भर दिला आहे. खोलसापाडा १ हा प्रकल्पाचे ही काम हाती घेतले जाणार आहे. प्रकल्प शासनाच्या निधीतून होणार असल्याचे २९० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला आहे. यातून ४८ दशलक्ष लीटर पाणी मिळणार आहे. त्याला मंजुरी मिळताच त्याचेही काम मार्गी लागेल असे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे.
देहर्जी धरणाचे काम ही प्रगतीपथावर
याशिवाय देहरजी धरणातील पाणी योजना प्रस्तावित असून त्यातून १९० दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे. ते काम २०३२ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. या धरणांमधून पाणी आणण्याचे काम पुढील काही वर्षात पुर्ण होणार आहे. त्यामुळे शहराला वाढीव पाणी उपलब्ध होऊन पाणी समस्या मिटेल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.