विरार : वसई-विरारमध्ये मार्च महिन्यातच उन्हाचा दाह वाढत असताना भाज्या टिकवून ठेवण्याची कोणतीही व्यवस्था महापालिकेच्या मंडईत नसल्याने भाजी विक्रेते संकटात सापडले आहेत. वाढत्या उन्हाने भाज्या खराब होत असल्याने या विक्रेत्यांना अर्ध्या किमतीत भाज्या विकून नुकसान सहन करावे लागत आहे. वसई-विरार महानगरपालिकेने २ वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात शीतगृह शीतपेटय़ा निर्माण करण्याचे सांगितले होते. परंतु दोन वर्षांपासून या शीतपेटय़ा कागदावरच आहेत.वसई-विरारमध्ये लोकसंख्या वाढीबरोबर भाज्यांची मागणी सुद्धा वाढली आहे. यामुळे पालिकेने ९ प्रभागात घावूक भाजी विक्रेत्यांसाठी भाजी मंडई उभारल्या आहेत. या भाजी मंडईतून पालिकेला दरवर्षी कोटय़वधी रुपयाचे उपन्न होत आहे. पण या मंडईत पालिकेने कोणत्याही सुविधा निर्माण केल्या नाहीत.पिण्याच्या पाण्यापासून ते शौचालयापर्यंत मुलभूत सुविधांचा अभाव या मंडईत आहे. यामुळे वर्षभर भाजी विक्रेतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वसई-विरारमध्ये नाशिक, नवी मुंबई, गुजरात या भागातून भाजीपाला येतो. पहाटे ५ वाजल्यापासून शहरातील विविध भागातील मंडईत हे बाजार भरले जातात. यातून किरकोळ विक्रेते आणि नागरिक भाजीपाला घेऊन जात असतात.पण मागील काही दिवसापासून वाढलेल्या तापमानामुळे या भाजी विक्रेत्यांचा माल मोठय़ा प्रमाणात खराब होत आहे. या मंडईत भाजी साठवणूक करण्यासाठी कोणत्याही यंत्रणा नसल्याने खराब झालेल्या भाज्या फेकून द्याव्या लागत आहेत. यामुळे या भाजी विक्रेत्याचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे अधिक जलद गतीने खराब होणाऱ्या भाज्यांचे दरसुद्धा वाढले आहेत. तर नियमित येणाऱ्या भाज्यांच्या साठवणुकीसाठी व्यवस्था नसल्याने त्यांना कमी किमतीत भाज्या विकाव्या लागत आहेत.नालासोपारा, संतोष भुवन येथील भाजी विक्रेते अरविंद ठेपाळे यांनी माहिती दिली की, नाशिकवरून भाजी घेऊन आल्याने तिची याच ठिकाणी विक्री करावी लागत आहे. उरलेला माल परत घेऊन जाताना उन्हामुळे खराब होऊन जातो.यामुळे कमी किमतीत माल विकावा लागतो, तर काही विक्रेते मलाच कमी घेऊन येतात यामुळे काही भाज्यांचा तुटवडा निर्माण होतो. आणि त्याचे भाजीच्या दरावर परिमाण होत आहेत. सध्या वाटाणे नियमित स्वरुपात मिळत असूनही २०० रुपयाच्या वर विकले जात आहेत. कारण उन्हामुळे लवकर खराब होतात. यामुळे पालिकेने शुल्क आकारून शीतपेटी अथवा शीतगृहाची निर्मिती करावी याची नितांत गरज आहे, असे त्यांनी सांगितले.वसई-विरार महानगर पालिकेने २ वर्षांपूर्वी सर्व भाजी मंडईत शीतपेटय़ा अथवा शीतगृह उभारण्याचे ठरविले होते. पण दोन वर्षे उलटूनही यावर पालिकेने काहीही केले नाही. यावर्षीच्या अर्थसंकल्पात या गोष्टीचा उल्लेखसुद्धा करण्यात आला नाही.