|| कल्पेश भोईर वाहने विक्रेत्यांचा व्यवसाय निम्म्यावर वसई: दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने नवीन वाहने खरेदीकरण्यासाठी ग्राहकांसाठी लगबग सुरू असते. मात्र यंदाच्या वर्षीही करोनाचे मळभ, टाळेबंदीचा झालेला परिणाम यामुळे वाहन खरेदीमध्ये निरुत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे वाहन विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा व्यवसाय निम्म्यावर आला आहे. दरवर्षी जी वाहनखरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते ती यंदा दिसून येत नसल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले आहे. दरवर्षी पंधरा दिवस आधीपासूनच दुकानात वाहनाबाबत चौकशी व पाहणी करण्यासाठी ग्राहक येतात. यंदा याचे प्रमाण फारच कमी आहे. तसेच करोनामुळे अनेकांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. त्यामुळे नवीन वाहन खरेदी करायचे झाल्यास त्याचे आगाऊ रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत अशी स्थिती आहे. तर काही जण करोनाची तिसरी लाट आली तर पुढील वाहनाचे हफ्ते कसे फेडायचे या विचाराने नवीन वाहने खरेदीकरण्यासाठी पुढे धजावत नाहीत. दरवर्षी दसऱ्याला आमच्या दुकानात ५० ते ६० वाहनांची विक्री होत असते मागील दोन वर्षांपासून वाहनांची विक्री ही जवळपास ५० टक्क्यांनी कमी झाली असल्याचे अमित ऑटोचे अनुप संघवी यांनी सांगितले आहे. वाहनखरेदीच्या बाजारात सध्या फारच मंदी असल्याने अशी परिस्थिती आहे. दिवाळीत थोड्या फार प्रमाणात का होईना स्थिती सुधारेल अशी आशा आहे, असे संघवी यांनी सांगितले आहे. दरवर्षी दसऱ्याला वाहने खरेदीकरण्यासाठी मोठ्या संख्येने ग्राहक येत असतात. यावर्षी त्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. ४० ते ५० टक्क्यांनी वाहनांची मागणी कमी झाली आहे. - दर्पण चौधरी, वाहन विक्रेते सणासुदीच्या काळातच विशेष करून वाहनांना मोठी मागणी असते. परंतु ती मागणी सध्या स्थितीत कमी झाली आहे. त्याचा परिणाम हा आमच्या व्यवसायावर झाला आहे. - मनदीप किणी, वाहन विक्रेते