भाईंदर: सलग दोन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मिरा भाईंदरमधील सखल परिसर पाण्याखाली गेले होते. त्यामुळे येत्या पावसाळ्यात उपाययोजना आखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
मिरा भाईंदर हे शहर भौगोलिकदृष्ट्या खाडी किनारी वसलेले असल्यामुळे मुसळधार पावसात येथे पाण्याचा विसर्ग होण्यास अडचण निर्माण होते. परिणामी, बहुतांश परिसर पाण्याखाली जातात. शहरात जवळपास ८० ठिकाणी पाणी साचत असल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे आहे. त्यानुसार प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यात पाणी उपसा करण्यास पंप बसवले जातात.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अचानक मुंबईसह उपनगरांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. सलग दोन दिवस पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. यावेळी शहरातील काशिनगर, कृष्ण स्थळ, बेकरी गल्ली आणि इतर काही भागांमध्ये पाणी साचले होते. इतकेच नव्हे तर यंदा शहराच्या मुख्य रस्त्यांवरदेखील पाणी साचल्याचे दिसून आले. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती दिसत असल्याने आगामी काळात काय परिस्थिती निर्माण होईल, याची चिंता नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
प्रामुख्याने शहरातील नाल्यांची योग्य प्रकारे सफाई झाल्यास पाणी साचण्याची समस्या बऱ्याच अंशी टाळता येऊ शकते. मात्र अद्यापही शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई न झाल्यामुळेच पाणी साचल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय
मिरा भाईंदर शहरात पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून महापालिका प्रशासनाकडून नुकताच आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सलग दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे हा कक्ष कार्यान्वित करण्याचा निर्णय आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी घेतला आहे. या कक्षामार्फत २४ तास सेवा पुरवण्यासाठी ‘वॉर रूम’ तयार करण्यात आली आहे. त्याअंतर्गत दूरध्वनीद्वारे संपर्क साधणे, स्वच्छता निरीक्षकांमार्फत सखल भागांवर लक्ष ठेवणे, विजेचे खांब तपासणे, अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करणे आणि इतर तक्रारींचे निवारण करणे हे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त सचिन बांगर यांनी दिली आहे.