वसई : विरार येथील महामार्गावर चालत्या वाहनातील महिलेच्या विनयभंग प्रकरणातील एकूण चार प्रवाशांची ओळख पटविण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. न्यायालयासमोर त्यांचे जबाब सादर करण्यात आले आहे. मात्र महिलेच्या तक्रारीत आणि या सहप्रवाशांच्या जबाबात विसंगती असल्याने नेमकी काय घटना घडली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. शनिवार १० डिसेंबर रोजी वाडा येथे राहणारी २० वर्षीय महिला सकाळी पेल्हार येथून वाडय़ाला घरी जाण्यासाठी निघाली होती. तिच्या सोबत तिची १० महिन्यांची मुलगी होती. तिने पेल्हार येथून खासगी इको गाडी पकडली होती. ती मुलीसह चालकाच्या शेजारील आसनावर बसली होती. या वाहनात चालक आणि अन्य पाच प्रवासीही होते. वाहन काही अंतर पुढे जाताच तिची मुलगी खिडकीतून खाली पडली आणि पाठोपाठ या महिलेनेही उडी घेतली. या प्रकारात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला होता. वाहनातील चालक आणि प्रवाशांनी माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून स्वत:ला वाचविताना ही घटना घडली असा खळबळजनक आरोप या महिलेने केला होता. तिच्या तक्रारीनुसार मांडवी पोलीस ठाण्यात चालक आणि तीन प्रवाशांविरोधात हत्या आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकऱणाचे गांभीर्य पाहून हा तपास गुन्हे शाखेकेड वर्ग करण्यात आला आहे, गुन्हे शाखेने वाहनातील चार प्रवाशांची ओळख पटवली आहे. मात्र त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल न करता त्यांचे जबाब न्यायालयात सादर केले आहेत. मात्र तक्रारदार महिला आणि सहप्रवाशांच्या जबाबात विसंगती असल्याचे आढळून आले आहे. नेमका काय प्रकार घडला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाहनात किती प्रवासी होते त्याबाबतही संभ्रम आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.