मराठी भाषेत म्हणी आणि वाक्प्रचारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणी आणि वाक्प्रचारांमधून माणसांचे स्वभाव, समाजातील चालीरीती, जगरहाटी यांवर समर्पकपणे भाष्य केलेले आढळते. एखाद्या शब्दाशी निगडीत अनेक म्हणी वा वाक्प्रचार मराठी भाषेत आहेत. त्याला घरही अपवाद नाही. घरया शब्दाभोवती गुंफलेल्या म्हणी आणि वाक्प्रचारांविषयीचा लेख..

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?

मी  देवभोळा नसलो तरी मला पूजा-अर्चा करायला खूप आवडते. त्यामुळेच मी नियमितपणे वास्तुपुरुषाचीदेखील पूजा करतो. आज माझा चिरंजीव, नचिकेत माझी पूजा बेडवर बसून न्याहाळत होता. वास्तुपुरुषाची प्रतिमा टाइलच्या आत पुरली असल्यामुळे नचिकेतला मी नक्की कोणाची पूजा करत आहे ते कळतच नव्हते. बालसुलभ वृत्तीमुळे त्याने मला प्रश्न विचारलाच. मीदेखील मग त्याला गृहसौख्य व वास्तुपुरुष यांच्याबद्दल सांगू लागलो. इतक्यात माझी मुलगी, नूपुरदेखील मला शोधत आली व म्हणाली, ‘‘बाबा, आज निबंधाचा विषय आहे ‘घराचे आत्मकथन’; मला जरा गाईड कर ना!’’

मी माझ्या दोन्ही मुलांना एकत्र बसवले व म्हणालो, ‘‘घर हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. स्वत:चे हक्काचे घर असणे याशिवाय या दुनियेमध्ये दुसरे सुख नाही. पण हे सुख सहजसाध्य नाही म्हणूनच आपल्याकडे म्हण आहे, ‘लग्न करावे पाहून अन् घर पाहावे बांधून.’

त्यावर नूपुर पटकन म्हणाली, ‘‘बाबा आम्हालाही एक म्हण आहे धडय़ात; ‘घरोघरी मातीच्या चुली’ याचा अर्थ काय रे?’’

मी म्हणालो, ‘‘पूर्वी खेडय़ामधील घरांमध्ये स्वयंपाक करायला चुली असायच्या. त्यावरून म्हण आली. याचा अर्थ होतो थोडय़ा फार फरकाने सर्व घरांमध्ये एकसारखीच परिस्थिती असते; म्हणजे तेच प्रश्न, तेच वाद!

नूपुरला निबंधासाठी खाद्य पुरविताना मला तिला सांगावेसे वाटले की, घर हे सुख व दु:ख, दोघांचे साक्षीदार असते. जेव्हा होत्याचे नव्हते होते तेव्हा ‘घराची राखरांगोळी होणे’ हा वाक्प्रचार वापरला जातो. तर कधी कधी इतरांकडून अनन्वित अत्याचार केला गेल्याने हसते-खेळते घर उजाड होते. ‘घरा-दारावरून नांगर फिरविणे’ हा वाक्प्रचार याच अत्याचाराकडे बोट दाखवितो. याउलट घराला आनंद देणारी माणसे घरी आली की घराचे नंदनवन होते म्हणूनच आपल्याकडे एक म्हण आहे ‘साधू-संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’. घराला घरपण प्राप्त करून देणारी गृहस्वामिनी घरात आली की ती सासरच्या माणसांच्या काळजात नकळतच घर करून राहते.

ज्या घरात अतिथीचे आदरातिथ्य हसतमुख चेहऱ्याने होते तिथे सज्जन लोकांनादेखील जावेसे वाटते; कारण अशा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. घर पै-पाहुण्यांनी भरलेले असले की घरात कसा उत्साहाचा संचार असतो. पण जेव्हा आपल्याला हवेहवेसे वाटणारे हेच पाहुणे किंवा नातेवाईक आपापल्या घरी परतू लागतात तेव्हा यजमानाला त्याचेच घर खायला उठते. विशेषत: उच्च शिक्षणासाठी घरटय़ातील चिमणी-पाखरे परदेशी उडाली की आई-वडिलांना घर खायला उठणे काय, ते खऱ्या अर्थाने समजते.

पण कधी कधी घरी आलेल्या पाहुण्यावर ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ अशीदेखील पाळी येऊ  शकते. उपाशी व पाहुणा यांचा कसा काय परस्परसंबंध असू शकतो? कारण पाहुणे येताना खाऊ  घेऊन येतात व आपली आईदेखील पाहुण्यांना गरमागरम खायला देते हे नचिकेत रोजच अनुभवायचा. नचिकेतचा हा संभाव्य प्रश्न मला आधीच कळल्याने मीच त्याला समजावले की, या वाक्प्रचाराचा अर्थ असा होतो की,एका वेळी एकाच गोष्टीला धरून राहणे कधीही श्रेयस्कर असते. दोन्ही गोष्टींवर एकाच वेळी विसंबून राहिलो तर काहीच साध्य होत नाही.

प्रत्येक घरात भिन्न स्वभावाची, प्रकृतीची माणसे राहत असतात. घरातील हीच भली-बुरी माणसे घराला घरपण प्राप्त करून देत असतात. गर्विष्ठ, अहंकारी, स्वार्थी माणसांमुळे घराचे खूप नुकसान होते. घरातील समाधान, शांतता, ऐश्वर्य नष्ट होते. त्यामुळेच की काय, घर नेहमी आपल्याला उपदेश करत असते की ‘गर्वाचे घर नेहमीच खाली’ असते.

‘घरात नाही तीळ आणि मिशांना देतो पीळ’ असा फुकाचा बडेजाव मिरवणारी माणसेदेखील गृहसौख्य नष्ट करतात. अशा लोकांनादेखील घराच्या भिंती वेळोवेळी हेच समजावत असतात की, ‘बडा घर पोकळ वासा’ असे होऊन द्यायचे नसेल तर कष्ट उपसण्याची तयारी ठेवा.

कधी कधी याच्या विपरीतदेखील पाहायला मिळते. घरातील लोकांनाच घरातील एखाद्या सदस्याच्या गुणवत्तेची कदर नसते, पण जगाला मात्र त्या माणसाची कदर असते. ‘घर की मुर्गी दाल बराबर’ या म्हणीतून त्या गुणवान सदस्याची कुचंबणाच डोळ्यांसमोर उभी राहते, नाही का? घराचे आत्मकथन लिहिताना नूपुरने घरातील प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीचे चित्रण, घराच्या दृष्टिकोनातून करावे हीच माझी अपेक्षा होती.

घरच्या कुलस्वामिनीचा धनी, तिला अध्र्यावरच सोडून या जगातून निघून जातो. अशा वेळी हिंमत न हरता ती माउली तिच्या कच्च्याबच्च्यांना वाढविते, त्यांना बापाची माया देऊन घराचा डोलारा सांभाळते. तिच्या या जिद्दीला जवळून पाहत असते ते घरच! तर कधी कधी घरचा भेदीच भक्कम भासणाऱ्या एकत्र कुटुंबाला अनेक शकलांमध्ये विखरून टाकतो.

कोसळणाऱ्या घराला सावरणारे व खाल्ल्या घराचे वासे मोजणारे, असे दोघेही जेव्हा एकाच छपराखाली नांदत असतात; तेव्हा घराच्या जिवाची काय घालमेल होत असेल नाही? घर हे मूक साक्षीदार असल्याने सगळे दिसत असूनही ते विवश असते.

माझे हे घरपुराण चालू असताना नचिकेत म्हणाला, ‘‘बाबा, परदेशात काचेची घरे जास्त पाहायला मिळतात, ती जर बोलायला लागली तर काय म्हणतील?’’ त्यावर हजरजबाबीपणा दाखवत नूपुर म्हणाली, ‘‘काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत.’’

घराचा विचार केला कीआजही बहुतेकांच्या डोळ्यासमोर उभे राहते ते टुमदार घर; ज्याच्या पुढे-मागे असते छानसे अंगण व सभोवती असते कुंपण. हे कुंपणच घर व जगाला विभागत असते. मागच्या परसात असणारा आडदेखील घराचा अविभाज्य भाग असतो. म्हणूनच मी नूपुरला, घराशी अप्रत्यक्षरीत्या जोडल्या गेलेल्या म्हणी सांगायचे ठरविले; जसे की ‘नाचता येईना अंगण वाकडे’, ‘कुंपणानेच शेत खाणे’, ‘आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?’ वगैरे वगैरे. घरातील ओसरीवरून, ‘भटाला दिली ओसरी, भट हात-पाय पसरी’ या म्हणीचा जन्म झाला अशी लास्ट मिनिट माहिती देऊन आमच्या गृहस्वामिनीने घरपुरणाला हातभार लावला.

खरे तर ‘flat’ संस्कृतीमुळे घरासोबत असणारे अंगण, परसदार, आड (विहीर), कुंपण, ओसरी सगळेच लुप्त झाले आहे. पण तरीदेखील गृहसौख्य म्हटले की मनाच्या कप्प्यात हे सर्व जण फेर धरू लागतातच; नाही का?

‘घरा-दारावरून नांगर फिरविणे’ हा वाक्प्रचार याच अत्याचाराकडे बोट दाखवितो. याउलट घराला आनंद देणारी माणसे घरी आली की घराचे नंदनवन होते म्हणूनच आपल्याकडे एक म्हण आहे ‘साधू-संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’. घराला घरपण प्राप्त करून देणारी गृहस्वामिनी घरात आली की ती सासरच्या माणसांच्या काळजात नकळतच घर करून राहते.

prashant.dandekar@panoramicworld.biz