बिबी का मकबरा या वास्तूला इतिहासाबरोबर भावनिक स्पर्शासह आपल्या साम्राज्यविस्तारातील ठळक पाऊलखुणाही उमटाव्यात हा उद्देशही जाणवतो. दख्खन प्रदेशावर आपला अंमल बसवण्याचा प्रयत्न करताना स्थानिकांवर प्रभाव टाकण्यासाठीही ही वास्तू उभारण्याचा मानस होता, हेसुद्धा एक कारण असू शकेल. ही वास्तू म्हणजे कबरस्थान तथा मकबरा आहे. शहेनशहा औरंगजेब याची चौथी राणी रबिया दुराणी म्हणजेच दिलराज बानू बेगम हिच्या थडग्यावर उभी असलेली ही भव्य वास्तू म्हणजे दगडी ताजमहाल म्हणूनही सर्वत्र ओळखली जाते..

एखाद्या शहराची ओळख सर्वत्र व्हायला जशी तेथील निसर्गसंपन्न धार्मिक स्थळं, ऐतिहासिक स्थळं कारणीभूत असतात, त्यात तेथील अजोड कलाकृतीच्या प्राचीन वास्तूंनीही त्या शहराला महत्त्व प्राप्त होऊन ती त्या शहरांची ओळखच होऊन जाते. मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया, राजाबाई टॉवर, पुण्याचा शनिवारवाडा, वाराणसीचा गंगाघाट, दिल्लीचे इंडिया गेट, हैदराबादचा चारमिनार या उत्तुंग वास्तूंच्या दर्शनातून हेच जाणवते. या नामावलीत महाराष्ट्राच्या औरंगाबाद शहरातील अनेक पुरातन वास्तूंमधील ‘बिबी का मकबरा’ ही देखणी शिल्पाकृतीची वास्तू म्हणजे या प्राचीन नगरीची ओळखच नव्हे, तर बोधचिन्ह बनले आहे.

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक

या भव्य वास्तूला इतिहासाबरोबर भावनिक स्पर्शासह आपल्या साम्राज्यविस्तारातील ठळक पाऊलखुणाही उमटव्यात हा अट्टहासही जाणवतो. भारताच्या दक्षिण प्रदेशावर आपला अंमल बसविण्याचा प्रयत्न करताना स्थानिकांवर प्रभाव टाकण्यासाठी ही वास्तू उभारण्याचा मानस या बांधकामापाठीमागे होता, हेसुद्धा एक कारण असू शकेल. ही प्रचंड वास्तू म्हणजे कबरस्थान तथा मकबरा आहे. दख्खन भूमीवर आक्रमण करून दीर्घकाळ महाराष्ट्रात वास्तव्य करणारा आक्रमक शहेनशहा औरंगजेबाची चौथी राणी रबिया दुराणी म्हणजेच दिलराज बानू बेगम हिच्या थडग्यावरच ही इमारत उभी आहे.

कमानदार देवडीवर उंच असा घुमट हे बांधकाम वैशिष्टय़ इराण भूमीतून भारतात आलं आणि त्यातून विकसित झालेल्या शैलीचा आविष्कार आग्य्राचा ताजमहाल आणि त्याची प्रतिमा ठरलेल्या औरंगाबादच्या बिबी का मकबऱ्यात आढळते.

इतर मोगल सम्राटांप्रमाणे कलात्मक इमारती उभारण्यात औरंगजेबाला स्वारस्य नव्हतेच. यासाठी होणारा खर्च अनाठायी आहे अशीच त्याची धारणा होती. पण औरंगजेबाचा मुलगा शहाजादा आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ इ.स. १६५०-६० या दशकात या कबरीवर हा भव्य मकबरा बांधला. हा मकबरा म्हणजे आग्य्राच्या ताजमहालाची प्रतिकृती असून दख्खनचा ताजमहाल म्हणूनही तो ओळखला जातोय. मात्र ताजमहाल संगमरवरी आहे तर बिबी का मकबरा दगडांचा आहे.

या मकबऱ्याच्या सभोवार दगडी बांधकामाची सुरक्षित तटबंदी आहे. तटावरील बांधकामावर घुमट आहेतच. या तटबंदीच्या दक्षिणेकडे सुमारे साडेचार मीटर उंच व आकर्षक प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर पितळी पत्र्यावर सुरेख नक्षीकामही आहे. तेथेच मकबरा उभारणाऱ्या कारागिरांची नावेही आहेत. मकबरा प्रांगणात प्रवेश करताच एक हौद असून त्यात कारंजेही आहेत. येथूनच प्रथमदर्शनी मकबऱ्याच्या भव्यतेची कल्पना येते. मकबऱ्यापर्यंत जाताना जी मार्गिका आहे त्याच्या दुतर्फा देखभाल केलेली हिरवाईची झाडंही आहेत.

ताजमहाल बांधायला २२ वर्षांचा काळ गेला तर ही मकबरा वास्तू १० वर्षांत पूर्ण झाली. उल्ला आणि हसपतराय या वास्तुविशारदांनी आपल्या कल्पनेनुसार या इमारतीचा आराखडा तयार केला. शहेनशहा औरंगजेबाचा विरोध, बांधकामासाठी आवश्यक ते साहित्य आणण्यातील अडथळे निर्माण झाल्याने शहाजादा आजम शहानी ही नियोजित वास्तू सुंदर होण्यासाठी त्यात अल्प प्रमाणात संगमरवरचा वापर करून टिकाऊ दगडांचाच जास्तीत जास्त वापर बांधकामात केला. आणि ज्या ठिकाणी संगमरवर वापरला गेला नाही तेथे पॉलिश करून संगमरवर सदृश्य बांधकाम करून आपला हेतू साध्य केलाय. या बांधकामाला रु. ६,६८,२०३ व ७ आणे इतका खर्च झाल्याची नोंद आहे.

या भव्य मकबऱ्याची प्रमुख इमारत एका विशाल चौथऱ्यावर उभारली आहे. हा चौथरा ८ चौ.मी. (७२ चौ. फूट) असून सहा मीटर उंचीचा आहे. जरी ही वास्तू दगडाची असली तरी इमारतीच्या पायाकडील २ मीटर उंचीचा भाग संगमरवरी दगडाचा आहे.

मकबऱ्याच्या मध्यभागी बिबीचे थडगे आहे. ते चौथऱ्याच्या पातळीखाली असून तेथे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. थडग्याची बैठक व सभोवतीचा कठडा संगमरवरी जाळीचा आहे. येथील दरवाजा मोठा असून त्यावर पक्षीकलाकृती दाखवली आहे. उत्तरेकडे एक उतरंडीसारखे भोक आहे, त्याद्वारे या मकबऱ्याच्या भिंतीच्या रुंदीची कल्पना येते. मकबऱ्याच्या चौफेर चार दिशांना जे चार झरोके आहेत त्याद्वारे दिवसातल्या कोणत्याही प्रहरी चंद्र-सूर्य किरण आतल्या बाजूस यावेत ही त्यामागची कल्पना आहे.

मकबऱ्याच्या पहिल्या मजल्यावर जो सुरक्षित सज्जा आहे येथून खालील थडग्याचे दर्शन घडते व घुमटाचा अंतर्गत भागही स्पष्ट दिसतो. इमारतीच्या आतील भागातील कलात्मक कोनाडे आहेत. तर नक्षीकामाच्या खिडक्याही वास्तूला साजेशा आहेत. इमारतीच्या बाह्य़ भागावर चितारलेली फुलझाडे म्हणजे वास्तुविशारदकांचे निसर्ग प्रेम दाखवते. प्रमुख इमारतीचा घुमट म्हणजे मुघल वास्तुशिल्पाकृतीचे दर्शन आहे. त्याच्या चौफेरचे लहान असे चार घुमटही संगमरवरी दगडाचे आहेत. मकबऱ्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक-एक मिनार उभारून त्यावर दगडी छत्र्या आहेत.

मकबरा प्रांगणातील चार कोपऱ्यावर अष्टकोनी दोन मजली मिनार असून जे मिनार आहेत त्यातून वपर्यंत जाण्यासाठी गोलाकार जीने आहेत. या वास्तूची उंची ४५.७२ मी. (१५० फूट) इतकी आहे. मकबऱ्याच्या हद्दीतच एक छोटी मशीद असून, परिसरातील हिरवळ म्हणजे पर्यटकांच्या विसाव्याचे ठिकाण आहे.

त्या काळी मकबऱ्याला पाणीपुरवठा पुरेसा नव्हता. त्यासाठी परिसरात एकूण पाच विहिरी बांधल्या गेल्या. या विहिरींच्या तळाशी बोगदे होते. त्याद्वारे जवळच्या ‘खाम’नदीचे पाणी येथे आणून त्याचा साठा करण्याची योजना होती. मकबऱ्याच्या पूर्व व पश्चिमेस जे मोठे हौद आहेत त्या हौदांना जोडणाऱ्या भूमिगत कालव्याचीही व्यवस्था केली गेली. यावरून त्यावेळचे स्थापत्य विशारद बांधकामाबरोबर जलसंवर्धनाच्या बाबतीत कसे जाणकार व द्रष्टे होते हेही जाणवते.

vasturang@expressindia.com