दोन वर्षांपूर्वी ऐन पावसाळ्यात नवीन शाखेत बदली झाली. शहरीकरणाचा वास न लागलेलं ते मोठं गाव होतं. पंचक्रोशीतील लोक बाजारहाटासाठी इथे येत. चौकातल्या मोठय़ा जागेत एका पक्कय़ा इमारतीत आमची नवीन शाखा सुरू झाली होती. इथल्या स्थानिक लोकांना, ग्राहकांना बँकेची फारशी गरजही लागत नव्हती. केवळ विस्ताराच्या हेतूने आम्ही तिघेजण या नव्या शाखेसाठी मुंबईहून आलो. जिल्हा व कल्याण यांच्या सीमारेषेवरील गाव, सह्यद्रीच्या डोंगराच्या भव्य रांगा, त्यातून वाहणारे पांढरे निर्झर, लाल मातीतून उगवलेले हिरवे-लुसलुशीत गवत आमचं मन आकर्षून घेणार नाही तर नवलच! पहिल्या दिवसापासूनच या गावातल्या एका घराने आमचे लक्ष वेधून घेतले होते. बहरलेल्या निसर्गाच्या पाश्र्वभूमीवर हे घर आम्हाला आमच्या शाखेच्या खिडकीतून दिसत असे. दोन-तीन दिवसांनी मला जे घर भाडय़ाने मिळाले, त्या घराच्या दारातूनही हे ‘घर’ दिसत असे. त्या घराकडे पाहिल्यावर गावाकडच्या आठवणी जाग्या होत असत. गावाच्या सुरुवातीलाच उजव्या हाताला मजल्याचे हे घर कोणाचेही लक्ष वेधून घेई. आजूबाजूला भरपूर मोकळी जागा, त्यावर उगवलेले गवत नि चहुबाजूला लावलेली आंबा, काजू, शेवग्याची झाडे. घर इतकं ऐसपैस की बाहेरूनच त्याचा आवाका लक्षात येई. छत्र्यांचं प्लॅस्टर नि भिंतीच्या कडेला प्लेन नक्षी. उंच जोत्या- त्याला पायटिंग, शोभेलशा पायऱ्या, बाजूला कडप्पा टाकून बसायची व्यवस्था. समोरच्या दारात वेलीचा मंडप. मधून जाणारा रस्ता वाळूच्या मोठय़ा खड्डय़ांनी आच्छादलेली बाजूला लाल विटांची रांग- अगदी बागेसारखं. मधल्या जागेत नक्षीकाम केलेलं तुळशी वृंदावन.. मन मोहरून जाई, पण क्षणभरच.. हे सुंदर घर नेहमी बंद असे. त्याभोवती तारेचं कुंपण होतं. मधेच वाढलेली झाडे छाटलेली दिसायची. पण या घराच्या दाराचे कुलूप तसेच लावलेले असे. घराचा बदामी रंग नि त्याच छटा वापरून केलेले रंगकाम साधेपणाबरोबरच कलाप्रेमाची साक्ष देत होता. शाखेत मोकळ्या वेळात जेवताना आम्ही तिघे या घराकडे पाहत, घराविषयीच चर्चा करीत असू. आम्ही गावातली सारी घरे पाहिली होती. बऱ्याच जणांनी जुनी घरे पाडून दुपाकी पत्र्याची घरे बांधली होती. मोठय़ा घरांच्या जागेवर दोन-दोन छोटी घरे दाटीवाटीने बांधलेली होती. मधल्या गल्लय़ांतून कुत्रा-मांजरच जाऊ शकेल इतकी जागा. सरसकट कौले गायब झाली होती. पत्र्यांचे ते आयत पाहिल्यावर बांद्य्राच्या ‘झोपडपट्टी’चीआठवण यायची. अंगण तर सोडाच, सांडपाणी जायला जागा राहिली नव्हती. खरकटे पाणी टाकण्यावरून भांडणे होताना दिसायची. घराभोवती जागाच नसल्यामुळे काहींचे ‘शौचालय’दूर शेताकडे बांधलेले दिसे. एखादे शौचालय पांढऱ्या रंगाने रंगवलेले दिसे. अनोळखी माणसाला तो ‘डाकबंगला’चवाटे. भाऊ- भाऊ सवते निघाले की घरे वाटली जात. एकाची दोन घरे होताना न्हाणीघराचे पाणी रस्त्यावरच सोडले जाई. घरांचा आकार छोटा झाला होता, पण आतल्या रचना स्वच्छ, सुंदर, वापरयोग्य करण्यावर भर वाढला होता. स्वच्छ लाद्या, मोठय़ा खिडक्या, स्वयंपाकघर, फर्निचर, स्वंतत्र खोल्याही काही घरात दिसायच्या. अगदी टिपिकल गावाप्रमाणे.. या सगळ्या बदलत्या गावाच्या पाश्र्वभूमीवर या घराचे ‘अभिजनत्व’मनात उतरून राही. एक दिवस आमची चर्चा रंगात आली नि पैजेपर्यंत येऊन थांबली. या घराचा मालक- ज्याने हे घर बांधले, बांधण्याचा निर्णय घेतला ती व्यक्ती हयात असावी का नि त्यांची नेमकी पाश्र्वभूमी काय असावी.. मी एका फटक्यात बोलून गेलो. या घराचे मालक असणारच, त्याशिवाय हे घर इतकं जपलं गेलं नसतं. अंगणातील वेलींना, गुलाबांना अजून फुले येतात. तुळस सुकलेय तरी मंजिऱ्यांचा वास येतोच. ही व्यक्ती आर्थिकबाबतीत व्यवस्थापकीय असावी.. मी पैजेचा विडा उचलला होता, त्या बदल्यात ‘पार्टी’ठरली होती. कामाच्या रगाडय़ातून लोकांशी संपर्क वाढत होता. कोणीतरी माहिती दिली. घराचे मालक शहरात- डोंबिवलीत राहतात. एखाद्या रविवारी येतात. म्हणजे निम्मी पैज मी जिंकलोच होतो. ते शिक्षणविस्तार अधिकारी आहेत हे समजल्यावर मी पार्टीसाठी तगादाच लावला. आता उत्सुकता होती ते घर आतून पाहण्याची. एका रविवारी एक माणूस त्या घराच्या छपरावर चढून कौलं व्यवस्थित लावत होता. बारीक अंगयष्टीचा हा माणूस अलगद पावलाने घोणे लावत होता. मी घरापाशी पोहचलो. मागच्या बाजूला आलो. खालूनच आवाज दिला. घर पाहाचंय म्हणून सांगितले. ती वामनमूर्ती खाली उतरली. मला वाटले, कोणीतरी कामगार असावा. पण ते साक्षात घरमालक होते. त्यांच्यामागे मी चालत आत गेलो. दोन घरांच्या ओटीमध्ये सागाचे पाच खांब, कडय़ा नि रिपां मधोमध नक्षीची चौकट, भक्कम उंबरठा, पुढे माजघर. माजघराच्या भिंतीत फडताळ.. कोपऱ्यात कणगा.. स्वतंत्र खोलीचा दरवाजा. पुढे स्वयंपाकाची पडवी. पूर्वेकडे स्वयंपाकाचा ओटा.. खाली चूल, भिंतीला मांडणी आणि त्यात भांडी. पश्चिमेला अर्धवट भिंत, पलीकडे न्हाणीघर. पुढे बंबाची जागा, अर्ध्या भिंतीचा कठडा, त्यावर हंडय़ाच्या दुडी. भिंतीत खुंटी, खुंटीला टोपल्या, आणखी पुढे पडवी. कोपऱ्यात फाटय़ा. मोकळ्या जागेत कपडे वाळवायच्या दोऱ्या नि शेतीची अवजारे, शिडी, जाते, घमेले.. चौदा इंचाच्या जाडजूड भिंती नि त्यावर गुळगुळीत सिमेंटचा गिलावा. आधुनिक रंगाने घर प्रकाशून गेले होते. लाकडी फळ्यांच्या जिन्याने वर गेलो. खालच्याप्रमाणेच वरही तशीच रचना. सागाच्या फळ्यांचे आच्छादन.. चारही बाजूंना खिडक्या, जाळी- जाळीला ताजमहालच्या खिडक्यांच्या नक्षीसारखी. वर धुराने काळवंडलेल्या भिंती. सटरफटर वस्तू साठवलेल्या गोणी, दावी, डबे.. पारव्यांची पिसे. कोंदटलेला वास.. ‘आता फारसं इकडे येणं होत नाही, पण घरात जीव अडकला आहे. बारा रुपये पगारापासूनची नोकरी करून घर बांधले. घर बांधायचं स्वप्न पाहिलं होतं. लग्नाअगोदर घर बांधीन अशी प्रतिज्ञा घेतली होती मनात. ती पूर्ण केली. मनासारखं घर बांधलं. तेव्हाच नव्या नवरीला घरात घेऊन आलो. नोकरीही गावाकडेच होती. बावीस वर्ष राहिलो घरात, पण आता मुले शहरात रहाण्याचा हट्ट करतात. माझी बदली शहरात झाली. जावे लागले मला. पण माझा जीव उरतोच या घरात. इथल्या प्रत्येक दगडीला, विटांना, लाकडांना माझा स्पर्श झालाय. घर उभं राहताना मी पाहिलयं. मुले-बायको माझी चेष्टा करतात..मला हसतात. मला वाईट वाटतं.. क्षणभर वाटतं की आपण हे घर या सर्वाच्या कष्टाने मिळून बांधायला हवे होते. काहीतरी निमित्त काढून मी येतोच इकडे. भाऊबंद मदतीला येतात. पण घराची अशी दशा झालेली पाहून नि पुन्हा शहराकडे जाताना मन व्याकूळ होतं, पण घर अजूनही उभं आहे, हे नुसतं पाहिलं तरी नवी उभारी येते. सगळी नाराजी जाते.’ घरमालक बोलायचे थांबले. त्यांना धाप लागली होती. घरातून बाहेर पडता-पडता ते फक्त म्हणाले, ‘घर पाहावे बांधून.’ ते घर नि मालक अजूनही माझ्या डोळ्यासमोर येतात. यशवंत सुरोशे surosheyashavant@gmail.com