मुंबई-ठाण्यातील घरांच्या वाढत्या किमतींमुळे गेल्या दशकात चाकरमान्यांनी आपला मोर्चा अंबरनाथ, बदलापूर आणि आसनगाव, शहापूरकडे वळवला होता. त्यातही आता या शहरांच्याही मर्यादा समोर आल्याने पर्यावरणीयदृष्टय़ा संपन्न नेरळ ते कर्जतचा परिसर हा चाकरमान्यांच्या पसंतीस पडतो आहे.

मुंबईची क्षमता संपल्याने गेल्या काही वर्षांत ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि अंबरनाथ बदलापूरकडे अनेकांनी घरांसाठी आपला मोर्चा वळवला. यात मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय चाकरमान्यांचा अधिक भरणा आहे. मात्र चौथ्या मुंबईच्या नावे विकसित होणाऱ्या बदलापूर आणि अंबरनाथ शहरांच्या मर्यादाही गेल्या काही काळात समोर आल्याने आता पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून जगाला परिचित असलेल्या माथेरानच्या पायथ्याशी असलेले नेरळ आणि कर्जत यांनी आघाडी घेतली असून सेकंड नाही तर आता फर्स्ट होम म्हणून नेरळला पसंती मिळते आहे.

मुंबई-ठाण्यातील घरांच्या वाढत्या किमतींमुळे गेल्या दशकात चाकरमान्यांनी आपला मोर्चा अंबरनाथ, बदलापूर आणि आसनगाव, शहापूरकडे वळवला होता. त्यातही आता या शहरांच्याही मर्यादा समोर आल्याने पर्यावरणीयदृष्टय़ा संपन्न नेरळ ते कर्जतचा परिसर हा चाकरमान्यांच्या पसंतीस पडतो आहे. बदलापूरनंतर सर्वात जलद वेगाने विकसित होणारे शहर म्हणजे नेरळ. माथ्यावर माथेरानचा डोंगर, पायथ्याशी उल्हासनदीचे पात्र तर दरम्यान मोठय़ा प्रमाणावर असलेली हिरवळ. हे सर्व घटक गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातीलच नाही तर देशी परदेशातील पर्यटकांनाही खुणावत होते. एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या प्रश्नावर स्थानिक गुजराती भाषिक गवळणींनी दिलेल्या ‘माथे रान छे’ उत्तरातून माथेरानचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. मात्र हेच माथेरान नंतरच्या काळात एक पर्यटनस्थळ म्हणून पुढे आले. आजही हजारो पर्यटक माथेरानला भेट देतात. यातूनच नंतर माथेरान सेकेंड होम म्हणून पुढे आले. फार्म हाऊस, हॉलीडे होम अशा माध्यमातून नेरळ एक नवा पर्याय म्हणून समोर आला. आपल्या हक्काचं घर असावं असं आणि तेही माथेरानच्या पायथ्याशी अशी संकल्पना सहसा अनेकांना रुचत नव्हती. त्यातही फार्म हाऊसच्या किमती पाहता सर्वसामान्यांना ते परवडण्यासारखे नाही, अशीच भावना अनेकांच्या मनात होती. मात्र गेल्या पाच वर्षांत नेरळ एक सेकंड होमचा नव्हे, तर फर्स्ट होम म्हणूनच समोर आला आहे.

निसर्गाचे वरदान नेरळ आणि कर्जत या पट्टय़ाला लाभले आहे. माथेरान आणि उल्हासनदीमुळे येथील निसर्गसंपन्नतेत अधिकच भर पडली आहे. गेल्या काही वर्षांत डोंबिवली आणि अंबरनाथ, बदलापूर शहरांतील पर्यावरणीय समस्यांनी डोके वर काढले आहे. डोंबिवलीचा हिरवा पाऊस आणि बदलापूर मधील दूषित हवेचा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेला अहवाल यामुळे येथे नवे घर घेणाऱ्यांच्या मनात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात शेजारीच असलेले मोठे औद्योगिक पट्टेही अनेकांना त्रासदायक वाटतात. त्याच वेळी पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील म्हणून नेरळने आघाडी घेतली आहे. माथेरानच्या निसर्गसंपन्नतेला टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याचा समावेश पर्यावरणीय संवेदनशील भागात केला आहे. त्यात त्याच्या विकासासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणची उपस्थिती ही आशादायी आहे. विविध आरक्षणांच्या माध्यमातून नेरळ ते कर्जत दरम्यानचा बहुतेक भाग संरक्षित करण्यात आला आहे. त्याचा फायदा निसर्गसंपन्नता टिकवण्यासाठी होणार आहे. त्यामुळे भविष्यात निसर्गाची संभाव्य धूप रोखली जाणार हे मात्र नक्की. त्यामुळे नेरळ हा एक आपल्या घरासाठीचा चांगला पर्याय तयार होतो आहे.

नेरळ आणि कर्जत ही शहरे आता महानगरांकडे वाटचाल करत आहेत. या शहरांचा सपर्कही मोठय़ा प्रमाणावर विकसित झाला आहे. रेल्वे सेवेच्या माध्यमातून मुंबई, पुणे हे अंतर अगदी काही तासांवर आले आहे. त्यात कर्जत आणि नेरळच्या भौगोलिक स्थानामुळे दोन्ही महानगरे प्रवासाच्या आवाक्यात आली आहे. लोकल गाडय़ांमुळे चाकरमान्यांना नेरळ ते मुंबई अंतर कमी झाले आहे. त्यात पुण्याला जाण्यासाठीही बहुतेक एक्स्प्रेस गाडय़ांना कर्जतचा थांबा असल्याने हे अंतर गाठणे सोपे झाले आहे. प्रगती, इंद्रायणी, डेक्कन, पुणे-भुसावळ अशा पॅसेंजर गाडय़ांमुळेही पुण्यात नोकरी करणे शक्य झाले आहे. त्यामुळे रेल्वेने नेरळ आणि कर्जत चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे.

कर्जत आणि नेरळपासून अवघ्या ४० किलोमीटरवर येत्या काळात विमानतळ उपलब्ध होणार आहे. नवी मुंबईत प्रस्तावित असलेले विमानतळ नेरळ आणि कर्जतसारख्या शहरांना नवसंजीवनी देणार आहे. विमानतळाप्रमाणे मुंबई-पुणे महामार्गामुळे यापूर्वीच अंतर कमी करण्यात यश आले आहे. त्यानंतर जेएनपीटी – वडोदरा महामार्ग, खोपोली जव्हार महामार्ग असे महामार्ग येथून जात असल्याने मुंबई पुण्यासह इतर राज्यांनाही या शहरांशी संपर्क ठेवणे सोपे जाते आहे. त्यात सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण झाल्याने त्याचाही फायदा नेरळकरांना होणार आहे.

पर्यावरणीय संपन्नता, भविष्याची शाश्वती, प्रदूषणापासून मुक्तीचा विश्वास, रस्त्यांची उपलब्धता, नजीकता आणि दळणवळणाची नव्याने पुढे आलेले मार्ग यामुळे येथील गुंतवणूकही मोठय़ा प्रमाणावर वाढते आहे.  आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या चित्रपटांच्या स्टुडिओमुळे येथे बॉलीवूडकरांची हजेरी ही लक्षणीय बाब आहे. बॉलीवूडचे कलाकार फक्त हजेरीच लावत नाहीत तर येथे त्यांनी चांगलीच गुंतवणूकही केली आहे. त्यामुळेच मध्यमवर्गीयांना आकर्षक दरात अनेक गृहप्रकल्प आज येथे उभे राहताना दिसत आहेत. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून दोन ते अडीच लाखांची मिळणारी सूट येथे ग्राहक वाढवण्यासाठी फायदेशीर होत असल्याचे येथील अनेक बांधकाम व्यावसायिक सांगत आहेत. सध्या येथे सात लाखांपासून १५ लाखांपर्यंतची किफायतशीर किमतीतील घरे उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा सर्व गोष्टींमुळे आज नेरळ ते कर्जत सेकंड होमसाठी नाही तर फर्स्ट होमसाठीच अधिक फायदेशीर असल्याचे दिसते आहे.

फस्र्ट होमसाठीही नेरळला पसंती

गेल्या काही वर्षांत चाकरमानी आणि गुंतवणूकदारांनी नेरळमधील प्रकल्पांमध्ये दाखवलेला रस हा वाखाणण्याजोगा आहे. येथील पर्यावरण, विकासाची शाश्वती, दळणवळणाची साधने, गुंतवणूक आणि स्वस्त घरांमुळे नेरळ चाकरमान्यांचे हक्काचे ठिकाण बनते आहे. त्यामुळे तशा प्रकारच्या अनेक सुविधाही येथे घर घेणाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सेकंड होम म्हणून नावारूपाला आलेले नेरळ आता फर्स्ट होम म्हणून पसंतीस पडत आहे, यातच नेरळचे वैशिष्ट आहे.

राजेंद्र सावंत, निर्माण ग्रुप.