दिवाळी जवळ आली की सासूबाईची लगबग चालू होते ती ठेवणीतील लोखंडी खलबत्ता, अंघोळीचे तांब्याचे घंगाळ आणि पाणी तापवण्याच्या तांब्याच्या बंबाला चिंच लावून, घासून-पुसून दिवाळी सणाला सज्ज राहण्यासाठी. वाळी म्हणजे झगमगाट, चमचमाट. प्रत्येक घरात नवीन रंग, आकाशकंदील, लाइटची तोरणे या बाह्यरोषणाईसोबत अंतर्गत सजावटीतही चमक आलेली असते. त्यात जास्त मेहनत केली जाते ती म्हणजे गृहिणीच्या लाडक्या स्वयंपाकघरावर. पूर्वी प्रत्येक स्वयंपाकघरात भिंतीलाच फळी ठोकलेली असायची व फळीवर तांब्या-पितळेची भांडी हौशेने रचलेली असायची. या तांब्या-पितळेच्या भांडय़ांवरून त्या घरच्या गरिबी वा श्रीमंतीचा दर्जा ठरला जायचा. पण आता बदल हा काळाचा नियम असल्याने चिंच लावून तांब्या-पितळेची भांडी घासणे हे वेळखाऊ काम असल्याने तांब्या-पितळेची भांडी ९०% घरातील किचनमधून निवृत्त झाली आहेत. परंतु अशाच काही आमच्या सासूबाईंच्या ठेवणीतल्या जुन्या वस्तू, भांडी अजूनही आमच्या घरी दिवाळीत तोऱ्यात मिरवतात. उरण येथील कुंभारवाडय़ात मी लग्न होऊन सासरी आले आणि येथील दिवाळी पारंपरिक वस्तूंसोबत साजरी करताना एक वेगळीच प्रसन्नता अनुभवायला येऊ लागली. दिवाळी जवळ आली की सासूबाईची लगबग चालू होते ती ठेवणीतील लोखंडी खलबत्ता, अंघोळीचे तांब्याचे घंगाळ आणि पाणी तापवण्याच्या तांब्याच्या बंबाला चिंच लावून, घासून-पुसून दिवाळी सणाला सज्ज राहण्यासाठी. नरक चतुर्दशी म्हणजेच पहिल्या अंघोळीच्या आदल्या दिवशी सासूबाई लोखंडी खलबत्त्यामध्ये गवळा-काचरी आणि खोबरं कुटतात. ही जिन्नसे कुटण्यात त्यांना दिवाळीच्या तयारीचा आनंद येत असल्याने हे कुटण्याचे काम ते आम्हा कोणाकडेच देत नाहीत. ही गवळा काचरी कुटत असताना खलबत्याच्या ठणक्यासोबत गवळा काचरीचा सुगंध घरभर पसरतो. त्यामुळे दिवाळीचे क्षण सुगंधी होऊ लागतात. आम्ही दोन सुना सासूबाईंच्या सूचनेनुसार कुटलेले खोबरे मिक्सरमध्ये अजून बारीक करतो. दुसऱ्या दिवशीच्या अभ्यंग स्नानासाठी वाटलेले खोबरे व गवळा काचरी रात्रीच पाण्यात भिजवून ठेवली जाते. अभ्यंगस्नानाच्या दिवशी सूर्य उजाडायच्या आत घरातील पुरुष मंडळी बंब पेटवून दिवाळी स्पेशल गरम पाणी तापवतात. अभ्यंग स्नानासाठी तांब्याचे लखलखते अंघोळीचे घंगाळ त्याच्या स्थानी मानात ठेवले जाते. घरातील प्रत्येकाने घंगाळ घेतले की नाही यावर सासूबाई जातीने लक्ष देतात. अभ्यंगस्नान उरकले की आम्ही याच घंगाळात पाणी ठेवून त्यात फुले ठेवून तरंगणाऱ्या पणत्या रात्री लावतो. वरीत प्रत्येक वस्तूंवर सासूबाई माया करतात. दर दिवाळीला खलबत्ता कुठून आणला होता, बंब किती पैशात मिळाला होता, घंघाळ आणताना धो धो पाऊस आणि विजा चमकत होत्या याचे वर्णन त्यांच्या तोंडून ऐकताना या वस्तू आम्हालाही प्रिय झाल्या आहेत. दिवाळीचा सण पार पडला, की हे ठेवणीतील ऐवज पुन्हा आपल्या ठेवणीच्या जागी ठेवण्यात येतात. prajaktaparag.mhatre@gmail.com