सुचित्रा साठे

आमटीला ‘घरातच’ ठेवलं जातं. घरातच तिचं कौतुक. घरी असल्यावर मात्र तिच्याशी जास्त जवळीक साधत ताव मारला जातो. पाची बोटांनी आमटीभात भुरकण्याचा आनंद हा ज्याचा त्याने घ्यायचाय.  हॉटेलात चार डोळे बघत असतात म्हणून नाइलाजास्तव चमच्यांनी ‘चमचेगिरी’ खपवून घ्यावी लागते. त्यामुळे घरात हिची ऐट असते. हिच्याशिवाय कोणाचे पान हलत नाही.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात वावरायला त्याला आवडतं. असं वावरताना ‘समान शीले व्यसनेषु सख्यम्’ या न्यायाने एकमेकांच्या भेटी होत असतात. कधी कधी  नावगाव माहिती नसतं. फक्त चेहऱ्याने ‘ओळखत’ असतो. त्यामुळे एक स्मायली उमटवून  पुढे जातो. काहीतरी कारण घडतं. तोच तोच चेहरा समोर येतो. शब्दांची देवाणघेवाण होते. नावानिशी ओळख होते. स्नेहाचे धागे गुंफले जातात. घरी जाणं-येणं होऊ लागलं. तोंडदेखल्या ओळखीचे रूपांतर घट्ट मैत्रीत होतं.

ऋणानुबंधाच्या गाठी पडतात. ‘या नं. चहा प्यायला’वरून ‘आमटी भात खायला घरी या हो,’ असं आग्रहाचं आमंत्रण दिलं जातं. अर्थात ‘आमटीभात’ म्हटलं म्हणून आमटीभातच केला जातो असं नाही. ती एक बोलायची पद्धत. ‘आमटीभात’ हे जेवणाचे प्रतिनिधित्व करतात. ‘पोळीभाजी खायला या’ असं आपण सांगत नाही. म्हणजे जेवण म्हटलं की आमटीभात आलाच. भात खाल्ला की पोट फार भरल्यासारखं वाटतं, सुस्ती येते, काम होत नाही या कारणास्तव किंवा मधुमेह झाल्यामुळे सकाळी काहीजण भाताला वज्र्य करतात. रात्री भाताला प्राधान्य दिलं जातं. भातात तसं म्हटलं तर करायचं काहीच नसतं, अर्थात तरीही तो मऊ मोकळा होणं गरजेचं असतं. प्रश्न आमटीचा असतो.

सर्वसाधारणपणे आमटी म्हटलं की ती तुरीच्या डाळीचीच असते. हिंग, हळद घालून डाळ शिजवून घ्यायची. मोहरी, हिंग, हळद, कढीलिंब घालून केलेल्या फोडणीत शिजलेली डाळ घोटून घालायची. मीठ, तिखट, गोडा मसाला, चिंच, गूळ, खोबरं कोथिंबिरीची लुडबुड की आमटी तयार. कधी कधी शेवग्याची शेंग, वांगं, लाल भोपळा, भेंडी, फरसबी, काहीच नाही तर कांदा घालून कौतुक करायचं. मग काय धावत पोटात जाते. आमटीच्या वाटीची आणि तोंडाची थेट भेट. तुरीची डाळ जरा पित्त वाढवणारी म्हणून बदल होण्यासाठी सात्त्विक, जरा मऊ स्वभावाची, जास्त घट्टपणे जोडून घेणारी मुगाची डाळ वापरली जाते. उडदाच्या डाळीचा चिकटपणा, उग्र वास त्यामुळे तिचा नंबर सहजासहजी लागत नाही. कधी भाजलेले मूग किंवा मसूर आयत्या वेळची संधी साधून गरज भागवतात. नियोजनपूर्वक मोड आलेल्या कडधान्याची वर्णी लागते.

आमटी कोणत्याही डाळीची असूदे ती घरातल्या गॅसवर उकळायला लागली त्या घमघमाटानं ‘घर’ भरून जातं. पोटातला अग्नी प्रज्वलित होतो. तिची धावाधाव, अघळपघळपणे पसरण्याची वृत्ती, त्यामुळे जेवणाच्या ताटात तिचं स्थान उजव्या बाजूला असलेल्या वाटीतच. लंच टाइममध्ये खाल्ल्या जाणाऱ्या डब्यात तिचा शिरकाव नाही. डबेवाल्याकडचा उभा डबा असेल तर खालच्या डब्यात तिला जागा दिली जाते. किंबहुना ती जागा तिच्यासाठी राखीव असते. याला कारण तिचा चळवळा, पटकन सलगी करणारा भेटीसाठी धडपडणारा, ओलावा जपणारा स्वभाव. अर्थात असा भात, भाजी, आमटी, पोळीचा ‘डबा’ मागवणारे कमीच असतात. त्यामुळे आमटीला ‘घरातच’ ठेवलं जातं. घरातच तिचं कौतुक. घरी असल्यावर मात्र तिच्याशी जास्त जवळीक साधत ताव मारला जातो. पाची बोटांनी आमटीभात भुरकण्याचा आनंद हा ज्याचा त्याने घ्यायचाय.  हॉटेलात चार डोळे बघत असतात म्हणून नाइलाजास्तव चमच्यांनी ‘चमचेगिरी’ खपवून घ्यावी लागते. त्यामुळे घरात हिची ऐट असते. हिच्याशिवाय कोणाचे पान हलत नाही.

तर हीच आमटी कधी कधी अगदी खास असते. तिची गाठ बांधलेली असते पुरणपोळीशी. म्हणजे पुरणांचा बेत असेल तरच ‘ती’ करता येते. पुरणासाठी चण्याची डाळ शिजत ठेवली की ‘तिच्या’ अस्तित्वाची चाहूल लागते. डाळ पूर्ण शिजली की चाळणीत उपसून ठेवली जाते. तेव्हा डाळीशी ‘कट’ करत जो पाणीदार पदार्थ खाली ठेवलेल्या भांडय़ात जमतो, तो म्हणजे डाळीचा ‘कट’. डाळीशी फार लाडीगोडी करून पुरण सैल होऊ नये म्हणून याला आठवणीने बाजूला केले जाते. एरवी इतर कोणतीही आमटी करावीशी वाटली की ती डाळ घेऊन शिजवली की काम फत्ते होतं. दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत नाही. स्वतंत्र बाणा.  पण ‘कटाची आमटी’ खायची असेल तर पुरणाचा बेत हवाच. म्हणजे पुरणपोळीबरोबर कटाची आमटी फ्री, असं धोरण असतं. नव्हे, असा ‘कट’ करावा लागतो.

एकदा ‘कट’ निघाला की आमटी करायला फारशी कटकट नसते. मोहरी, हिंग, हळदीच्या फोडणीमध्ये वाळलेल्या लाल मिरच्यांचे तुकडे, कढिलिंब, लवंगा दालचिनीचे तुकडे घालायचे. मग कट घालायचा. आवडीप्रमाणे मीठ, लाल तिखट, गोडा मसाला, चिंच गूळ, घालून खोबरं कोथिंबिरीने मेकओव्हर केला की झालं. कटाची आमटी नि भात खायला मिळणं भाग्यात असावं लागतं. पुरणपोळी सहज मिळेल, पण कटाची आमटी त्यासाठी घरात ‘कट’ शिजवावा लागतो. पुरणपोळी आणि मसालेदार कटाची आमटी यांची अभंग युती आहे.

हिची इतक्या तीव्रतेने आठवण होण्याचं कारण म्हणजे होळीच्या आगमनाचे वाजणारे पडघम. होळीच्या रूपाशी, पुरणपोळी आणि काळसर कटाची आमटी या जोडगोळीचं जाणवणारं साधम्र्य. होळी पेटली की वरवर येणाऱ्या लसलसत्या पिवळ्या गुलाबी ज्वालांसारख्या रंगाची पुरणपोळी. होळीतून बाहेर उडणाऱ्या, आधी क्षणभर चमकून मग गडद रंगात बदलणाऱ्या ठिणग्या म्हणजे पुरणपोळीवरचे तपकिरी काळसर भाजके डाग. वरच्या बाजूला धुरामुळे जमलेला काळसर गडदपणा मिरवणारी कटाची आमटी. घराबाहेरील अवकाशात पेटलेली होळी तर घराच्या चार भिंतींमध्ये पुरणपोळी आणि कटाची आमटी जणू प्रतीकात्मक होळी. घराचं घरपण मिरवणारी उदरभरणाचा ‘यज्ञकर्म’ घडवून आणणारी. पुरणाशी गूळपीठ जमवत त्याला पुढं करून ‘घरातच’ जन्म घेणारी, ‘घर’ वासप्रिय असलेली ही कटाची आमटी. त्यामुळे घरातील मंडळींना खूश होऊन तिचा आस्वाद घेताना बघून ‘घर’ खरंच श्रीमंत होते.

suchitrasathe52@gmail.com