एप्रिल महिन्यात डोंबिवलीला आणि मे महिन्याच्या २१ तारखेला घाटकोपरला सवानी बििल्डगमध्ये, विजेच्या मीटर बॉक्सला आग लागली आणि दोन्ही ठिकाणी २-२ ज्येष्ठ नागरिक होरपळून मृत पावले. शिवाय, कित्येक जण भाजले आणि अजूनही रुग्णालयात आहेत. या दोन्ही बातम्या आपण सर्वानी वर्तमानपत्रांमध्ये वाचल्या आणि भ्रष्टाचाराच्या बातम्यांत अमुक अधिकाऱ्याला पकडले हे वाचून आपण वर्तमानपत्र ठेवून देतो, तसेच या वृत्तांबाबत झाले. भ्रष्टाचाराच्या बातम्यांत आपल्याला काही करता येण्यासारखे नसते, म्हणून आपण त्या हातावेगळ्या करतो. पण या घटनांचे तसे नाही आणि त्या गोष्टी इतक्या सहजी नजरेआड करून चालणार नाही.
मुंबईतील सर्व सोसायटय़ांत प्रवेशापाशीच तळमजल्यावर विजेचे मीटर बसवलेले असतात. त्या पेटीत प्रत्येक सदनिकेत जाणाऱ्या विजेचे मीटर आणि फ्यूज बसवलेले असतात. येथे आग लागली तर ती विजेच्या तारांमार्फत आपल्या घरातील फ्यूजपर्यंत येऊन पोहोचते व ती आपल्या घरापर्यंतही पोहचू शकते. शिवाय तळमजल्याला जिथे  जिना सुरू होतो तेथेच मीटरला आग लागल्यावर त्या आगीच्या ज्वाळा व धूर तेथे पसरतो. आणि तळमजल्यासकट वरच्या मजल्यावरील सर्व रहिवाशांना तेथून बाहेर पडणे अशक्य होऊन बसते, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना. शिवाय चोरांच्या भीतीपोटी आपण सर्वानी आपापल्या सदनिकांना चौफेर ग्रील-जाळ्या बसवून बाल्कनीतून शिडी लावून बाहेर पडण्याचे मार्ग बंद करून टाकले आहेत. अशा वेळी घरात बसून आगीत होरपळून जाणे, एवढा एकच पर्याय आपण आपल्यासाठी शिल्लक ठेवतो. त्यातून वाचण्यासाठी एक उपाय उरतो, तो असा-
सोसायटीतील प्रत्येक िवगच्या प्रवेशापाशी बसवलेले मीटर बॉक्स तेथून हलवून ते सोसायटीच्या कम्पाऊंड िभतीवर एकत्रितपणे बसवावेत व त्यांना पावसापासून जपण्यासाठी एखादी बिनदरवाजाची खोली बांधावी. बिनदरवाजाची अशासाठी, की  आगीच्या वेळी किल्ली कोणाकडे हे शोधायला नको. या मीटर बॉक्सेस िवगच्या प्रवेशद्वारातून हलवल्यामुळे आगीच्या वेळी तेथून बाहेर पडणे सुकर होईल, कारण ही आग घरात पसरण्याचा धोका असतोच. यासाठी मीटर बॉक्सला आग लागल्याबरोबर प्रत्येक सदनिकाधारकाने आपल्या घरातील मेन स्विच ताबडतोब बंद करायला हवा.
शिवाय, आज न दिसणारी एक खबरदारी प्रत्येक सोसायटीने घ्यायला हवी, ती अशी की या मीटर बॉक्सपाशी बारीक रेतीने (माती नव्हे) भरलेल्या दोन बादल्या ठेवाव्यात. ऐन आगीच्या वेळी ज्वालांवर ही रेती टाकल्यास आग विझेल. कार्बन-डाय-ऑक्साइडचे सिलेंडरही विजेच्या आगी विझवायला उपयोगी पडतात, पण दरवर्षी ही नळकांडी पुन: पुन्हा वायूने भरून घ्यावी लागतात, ते कोणी करत नसल्याने ऐन आगीच्या वेळी ती निरुपयोगीच ठरणार. शिवाय ती कशी वापरायची हेही शिकून घ्यावे लागते. ही आग कधीही पाणी टाकून विझवायची नसते. पाण्याने भरलेली बादली हातात घेऊन ती आगीवर ओतणाऱ्या माणसापर्यंत विजेचा प्रवाह पाण्यातून माघारी येऊन हा माणूस वीज प्रवाह अंगात गेल्याने जळून मरतो. १९८० साली घाटकोपरला माझ्या सोसायटीत  अशी आग लागली असताना एक माणूस पाण्याची बादली घेऊन आला होता. बरोबर त्याच क्षणी मी तेथे पोहोचल्याने मी मोठय़ाने ओरडून त्याला त्यापासून परावृत्त केले. पाणी गटारात टाकून द्यायला लावून रस्ता नुकताच दुरुस्त झाला होता, ती वाळू बादलीत भरून आणायला सांगितले आणि आग विझवली.
वाचकहो, दोन सोसायटय़ांत दोन-दोन माणसे मरण पावल्यानंतर आपल्याकडे तसे घडले नाही म्हणून वाट न पाहता ताबडतोब मीटर दुसऱ्या जागी हलवा.