भ्रष्टाचाराचे आरोप असलेले बबनराव पाचपुते व डॉ. विजयकुमार गावित या माजी मंत्र्यांसाठी भारतीय जनता पक्षाने पायघडय़ा घातल्याची बोचरी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. जनता अशांना धडा शिकवील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘आदिवासी विकास खात्यामध्ये कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप डॉ. विजयकुमार गावित तसेच बबनराव पाचपुते यांच्यावर आहे. एकनाथ खडसे व विनोद तावडे यांनी दोन्ही मंत्र्यांवर त्या वेळी जोरदार टीकाही केली होती. अशा लोकांना एक पक्ष काढून टाकतो व दुसरा पक्ष त्यांच्यासाठी पायघडय़ा घातल्या जातात. ज्या लोकांवर आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यापैकी काही सिद्घही झाले, तरीही राजकीय पक्ष त्यातून धडा घेत नाहीत हे दुर्दैव आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.