भाजपने कालपर्यंत शिवसेनेचा वापर करून घेतला आणि खुर्ची मिळाल्यावर शिवसेनेला लाथ मारली, असा आरोप करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी तुळजापूरमधील जाहीर सभेत पुन्हा एकदा भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका केली. उद्धव ठाकरे सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आहेत. सोमवारी दुपारी त्यांनी तुळजापूरमध्ये जाहीर सभा घेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससह भाजपवरही हल्लाबोल केला.
ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्याचे स्वप्न आपण सर्वांनी पाहिले होते. ते प्रत्यक्षातही आले. कालपर्यंत त्यांनी शिवसेनेचा वापर करून घेतला. मात्र, खुर्ची मिळाल्यावर त्यांना आपली ताकद वाढल्याचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी शिवसेनेला लाथ मारली. आता महाराष्ट्र जिंकण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ म्हणजे अफझलखानाची फौजच उतरली असल्याची जळजळीत टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
भाजपला सत्ता दिल्यास महाराष्ट्राचे तुकडे होतील आणि किती तुकडे झाले हे मोजत बसण्याची वेळ सर्वसामान्यांवर येईल, असाही आरोप त्यांनी केला. गोपीनाथ मुंडे युती जोडून ठेवणारा दुवा होते. त्यामुळे मुंडे, महाजन कुटुंबीयांशी असलेले संबंध यापुढे आम्ही कायम ठेवू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.