काँग्रेसच्या कार्यकाळात गरिबांसाठी तयार केलेल्या योजना कमकुवत करण्याचा प्रयत्न सध्या केंद्र सरकारकडून होत असल्याची टीका शनिवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली. त्या गोंदिया येथील काँग्रेस पक्षाच्या प्रचारसभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपच्या योजना या गरिबांसाठी नसल्याचेही सांगितले. गेले काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी जन-धन योजनेचा मोठा गाजावाजा करत आहेत. मात्र, ही योजना मुळची काँग्रेसची असून, माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसने गरिबांपर्यंत बँकिंग सुविधा पोहचविण्यास सुरूवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १५ वर्षांत काँग्रेसने महाराष्ट्राची स्थिती सुधारण्यासाठी अविरत प्रयत्न केले. तेव्हा आगामी काळात महाराष्ट्रातील विकासाची हीच गती कायम राखायची की नाही, हे ठरविण्याची वेळ जनतेवर आल्याचे सोनिया गांधींनी सांगितले.