विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी छुपी युती केल्यामुळे भाजपने युती तोडल्याच्या आरोपांना शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणे अशक्य असल्याचे फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, याचवेळी विधानसभेत कामकाजाचे फिक्सिंग करण्यासाठी कोणती युती कार्यरत आहे, हे महाराष्ट्राला माहिती असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला. त्यामुळे येणाऱ्या काळात दोन्ही पक्षांत चांगलीच जुंपण्याची चिन्हे आहेत. आजपर्यंत भाजपने विधानसभेत राष्ट्रवादीच्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे, तेव्हा त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे फडणवीस स्पष्ट केले.  दरम्यान, फडणवीसांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी स्वत:चा उमेदवारी अर्ज दाखल केला. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला शंभर टक्के विजयाची खात्री असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.