प्रत्येक राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या यादीत घराणेशाहीचे प्रतििबब उमटत असले तरी राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे सध्या उमेदवारीवरून निर्माण झालेले कुटुंबांतील वाद कसे मिटवावेत, असा पेच निर्माण झाला आहे. दोन मंत्र्यांनी आपापल्या मुलांसाठी रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला असला तरी हे मतदारसंघ कायम राखण्याकरिता या मंत्र्यांचे मत परिवर्तन करण्याची प्रयत्न सुरू झाले आहेत.
काही कुटुंबांतच उमेदवारीवरून वाद असल्याने पक्षाच्या नेतृत्वाला त्यातून मार्ग काढावा लागत आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक यांनी आपल्याऐवजी मुलाला उमेदवारी देण्याची मागणी केली होती. परिणामी पुतणे निलय हे विरोधात गेले होते. नाईक घराण्यातच लढत झाल्यास पक्षाला अवघड गेले असते. हे जाणूनच शरद पवार आणि अजित पवार यांनी मध्यस्थी केली. शेवटी इच्छा नसतानाही मनोहर नाईक यांनाच लढण्यास सांगण्यात आले. तसेच पुतणे निलय विरोधात जाणार नाहीत, अशी खबरदारी घेण्यात आली.
आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी आपले पुत्र वैभव यांना उमेदवारीसाठी आग्रही आहेत. अनेक वर्षे आमदारकी भूषविल्याने पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, असे पिचड यांनी जाहीर केले आहे. पण पिचड यांच्या मुलाला निवडणूक सोपी जाणार नाही, असा पक्षात मतप्रवाह आहे.
विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी निवडून आल्या. तेव्हाच पुतण्याने उमेदवारीसाठी  दावा केला होता. पण शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याने पुतण्याने बंडखोरी केली नव्हती.
विधानसभेच्या वेळी उमेदवारीचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन पुतण्याला देण्यात आले होते. कुपेकर यांची आमदार पत्नी आणि मुलीचा पुतण्याच्या उमेदवारीस विरोध आहे. ही जागा कायम राखण्यासाठी घरातील भांडणे मिटविण्याचे मोठे आव्हान  पक्षापुढे आहे. जुन्नरचे आमदार वल्लाभशेट बेनके यांनीही स्वतऐवजी मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरला आहे. पण पक्षातून त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसून वल्लभशेट यांनीच लढावे, असा संदेश गेल्याचे कळते.
भुजबळ पुत्र की पुतणे ?
छगन भुजबळ हे येवला मतदारसंघातून लढणार असून, पुत्र पंकज प्रतिनिधित्व करीत असलेल्या नांदगावमधून कोण लढणार याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. माजी खासदार समीर भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. यामुळेच नांदगावमधून समीर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. नांदगावचा निर्णय भुजबळ यांना घ्यावा, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.
मधुकरराव पिचड स्वत: रिंगणात असले तरच अकोल्याची जागा कायम राखणे सोपे जाईल, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. पिचड स्वत: तयार नसले तरी त्यांनी लढावे, असे प्रयत्न सुरू आहेत.
पुतण्याला उमेदवारी
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर निवड झाल्याने ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघात मुलगी की पुतण्या यांना उमेदवारी दिली जाईल, याबाबत उत्सुकता होती. आदिती या युवती काँग्रेसचे संघटनात्मक काम करतात, मतदारसंघात त्यांचा संपर्क असतो. पण तटकरे यांनी अवधूत यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली आहे.