जिल्ह्य़ात भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी वाढीस लागली असून शह-काटशहचे राजकारण सुरू आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे एकमेकांच्या मतदारसंघात काय चालले आहे, ती ‘अंदर की बात’ आपणास माहीत आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांनी भाजपला हाणला आहे. बुधवारी चोपडा येथे राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या भाजपला सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा विसर पडला आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली. चार महिन्यांपासून देशाला स्वतंत्र संरक्षण मंत्री नाही. पाकिस्तानला जाब विचारू असे म्हणणारे मोदी चीनने सीमेवर गोळीबार केल्यावर गप्प का राहिले, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.