विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपने जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक म्हणजे १४ जागांवर विजय संपादीत केला. शिवसेना व काँग्रेसने प्रत्येकी सात तर राष्ट्रवादीने पाच जागांवर विजय मिळविला. मनसेचा नाशिकमधील बालेकिल्ला पुरता उध्वस्त झाला. एकही जागा त्यांना राखता आली नाही. माकपने एक, तर अपक्षांनी एक जागा मिळविली. १७ विद्यमान आमदारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला. माजीमंत्री ए. टी. पवार, पद्माकर वळवी, गुलाबराव देवकर यांच्यासह सुरेश जैन, वसंत गिते हे दिग्गज नेते पराभूत झाले.
मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास भाजपला १० जागांचा फायदा झाला आहे. गतवेळी त्यांचे संख्याबळ केवळ चार होते. युती तुटूनही शिवसेनेने आपले सातचे संख्याबळ कायम राखण्यात यश मिळवले. राष्ट्रवादीचे चार जागांचे नुकसान झाले. विरोधी वातावरणात काँग्रेसला एका जागेचा लाभ झाला. मनसेचे पानिपत झाले असून, त्यांचे नाशिकमधील अस्तित्व संपुष्टात आले आहे. ऐनवेळी हाती लागलेल्या प्रबळ उमेदवारांना घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपसह सर्वपक्षीयांना काही जागांवर आयात उमेदवारांचा लाभ झाला, तर काही जागांवर मात्र नुकसान सहन करावे लागले. नाशिक जिल्ह्य़ात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीला समान यश मिळाले. या पक्षांनी प्रत्येकी चार जागा मिळवल्या. lok02नाशिक शहरातील मनसेचा बालेकिल्ला भाजपने उध्वस्त केला. मनसेच्या तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत पराभवाचे धनी झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे येवला मतदारसंघातून विजयी झाले. याच पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. टी. पवार यांना माकपच्या जिवा पांडू गावित यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. शहरी भागात भाजपचे वर्चस्व राहिले असले तरी ग्रामीणमधील १२ पैकी केवळ चांदवड मतदारसंघात त्यांना विजय मिळवता आला. शिवसेनेने महायुती नसतानाही आपले संख्याबळ कायम राखण्यात यश मिळविले. भाजपच्या देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप आणि डॉ. राहुल आहेर यांनी, तर शिवसेनेचे योगेश घोलप, दादा भुसे, राजाभाऊ वाजे, अनिल कदम यांनी विजय संपादीत केला. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, पंकज भुजबळ, दीपिका चव्हाण व नरहरी झिरवाळ, काँग्रेसच्या निर्मला गावित व आसिफ शेख यांनी विजय मिळवला. नाशिक जिल्’ाातील सात विद्यमान आमदारांना मतदारांनी घरी पाठविले.
जळगाव जिल्ह्य़ात भाजप, शिवसेनेचे वर्चस्व असून, काँग्रेस-राष्ट्रवादीचा सफाया झाला. जिल्’ाातील ११ मतदारसंघांमध्ये भाजपला सहा, शिवसेनेला तीन, राष्ट्रवादी आणि अपक्ष प्रत्येकी एक याप्रमाणे जागा मिळाल्या आहेत. यावेळी सात विद्यमान आमदारांना घरी बसावे लागले आहे. भाजपचे सुरेश भोळे, एकनाथ खडसे, गिरीश महाजन, उन्मेष पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे तर, शिवसेनेचे गुलाबराव पाटील, चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील हे विजयी झाले. राष्ट्रवादीला एरंडोलमधून डॉ. सतीश पाटील यांच्या रूपाने एकमेव यश मिळाले. अफाट लक्ष्मीदर्शनाच्या चर्चेने गाजलेल्या अमळनेर मतदारसंघात शिरीष चौधरी या अपक्ष उमेदवाराने सर्वच पक्षांना धूळ चारली. तुरुंगातून निवडणूक लढविणारे सुरेश जैन आणि माजीमंत्री गुलाब देवकर यांना पराभूत व्हावे लागले.
धुळे जिल्ह्य़ातील पाचही विधानसभा मतदारसंघांत सर्वाधिक ४२ हजार १५८ एवढे मताधिक्य घेत भाजपचे जयकुमार रावल यांनी शिंदखेडय़ातून सलग तिसऱ्यांदा आमदारकी राखली. त्यांच्यासह अनिल गोटे, काँग्रेसचे काशिराम पावरा हे पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश करणारे लोकप्रतिनिधी ठरले. काँग्रेसचे डी. एस. अहिरे आणि कुणाल पाटील हे विजयी झाले.
नंदुरबार जिल्ह्य़ात भाजप व काँग्रेसला समान यश मिळाले तर राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. भाजपचे डॉ. विजयकुमार गावित व उदेसिंग पाडवी तसेच काँग्रेसचे के. सी. पाडवी व माजी मंत्री सुरूपसिंग नाईक हे विजयी झाले. शहाद्यातून पालकमंत्री तथा माजी क्रीडामंत्री पदमाकर वळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. डॉ. गावितांचे धाकटे बंधू असलेल्या शरद गावितांवरच जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीची संपूर्ण भिस्त होती. मात्र त्याच्या पराभवाने राष्ट्रवादीला जिल्ह्य़ात जोरदार हादरा बसला आहे.

“मतदार संघासह नंदुरबार जिल्ह्यात आजवर आपण जी विकास कामे केली, त्यांची पावती म्हणजे विधानसभा निवडणुकीत मिळालेले हे यश आहे. अपप्रचारास मतदारांनी चोख प्रत्युत्तर दिले. यापुढेही अशीच विकास कामे करण्यासाठी आपण कटीबध्द आहोत.”
– डॉ. विजयकुमार गावित (भाजप)

लक्षवेधी निकाल
lok03शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती तोडण्यास जबाबदार असलेल्या तिघांचा पराभव करा असे आवाहन केल्यामुळे एकनाथ खडसे यांच्या पराभवासाठी शिवसैनिकांनी कंबर कसली होती. मात्र त्यांनी ८५६५७ मते मिळवित शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांचा मुक्ताईनगर मतदारसंघात ९७०८ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे अरूण पाटील ६४९९ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

lok04महायुती आणि आघाडी तुटल्यानंतर नांदगाव मतदारसंघात छगन भुजबळांचे सुपुत्र पंकज यांचे भवितव्य टांगणीला लागले होते. त्यातच मागील निवडणुकीत पंकज यांची प्रचारधुरा वाहणारे सुहास कांदे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. ्यामुळे चुरस अधिकच वाढली. मात्र, पंकज छगन भुजबळ यांनी ६९२६३ मते मिळवत कांदे (५०८२७) यांचा १८४३६ मतांनी पराभव केला.

lok05नाशिक महापालिकेतील मनसेची सत्ता आणि २००९ मध्ये या पक्षावर नाशिककरांनी दाखवलेला विश्वास यामुळे येथे चुरस अपेक्षितच होती. नाशिक मध्य मतदारसंघात मनसेच्या गीते यांना विजय मिळेल असा कयास होता. मात्र प्रत्यक्षात भाजपच्या देवयानी फरांदे यांनी ६१५४८ मते मिळवित विजयश्री संपादन केली. वसंत गीते यांना ३३२७६ तर काँग्रेसच्या शाहू खैरे यांना २६३९३ मते मिळाली.

lok06येवला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ यांनी आपली सारी ताकद पणास लावली होती. लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे विधानसभेत काय होते याबाबत उत्सुकता होती. त्यांनी ११२७८७
मतांसह विजयश्री संपादन केली. निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संभाजी पवार (६६३४५ मते) यांचा त्यांनी पराभव केला. भाजपच्या
शिवाजी मानकर यांना ९३३९ मते मिळाली.

धुळे शहर मतदारसंघातील ही लढत अत्यंत चुरशीची होती. भारतीय जनता पक्षाचे अनिल गोटे आणि शिवसेनेचे सुभाष देवरे यांच्यातील ही लढत, गोटे यांनी ५७७८० मते मिळवून जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजवर्धन कदमबांडे  ४४८५२ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर
शिवसेनेचे देवरे  २७३७९ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. वरीलपैकी कोणीही नाही, अर्थात नोटा हा पर्याय ८७८ मतदारांनी निवडला. उत्तर महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात नोटाला तीन ते चार हजार मतांची पसंती मिळाल्याचे चित्र होते.