निवडणूक आयोगाचे र्निबध डावलून एसएमएस, व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून प्रचारासाठी उमेदवारांनी कोटय़वधींची उधळण केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ही सुविधा पुरविणाऱ्या काही कंपन्यांशी केलेल्या चर्चेनंतर त्यांनी उमेदवारांच्या या ‘उधळणी’वर केलेले  वास्तव धक्कादायक आहे. लोकसभा निवडणुकीतील मोदीच्या या ‘प्रचारफंडय़ा’ची ‘री’ राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेनेसुद्धा ओढल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवारांच्या आवाजात मोबाइल रेकॉर्डिग केले जाते. प्रचारासाठी हे क्रमांक कुठून मिळवले जातात, याविषयी ही सुविधा पुरविणाऱ्या अमरावतीच्या एका कंपनीला विचारले असता उमेदवार ते क्रमांक देतात किंवा कंपनी हे क्रमांक मिळवून देतात. हे क्रमांक मिळवून देण्यासाठीसुद्धा कंपनी वेगळे दर आकारते. फेसबुकवरही आता प्रचाराचे फोटो, बातमी अपलोड करून त्याला लाईक आणि शेअरिंगसाठी पैसे आकारले जातात. व्हॉट्सअॅपवर सुद्धा ५०-५० लोकांचे ग्रुप बनविण्यात आले असून या माध्यमातून मतदारांपर्यंत प्रचाराचे आणि मतदान करण्याचे आवाहन असलेल्या व्हिडिओ क्लिपिंग्ज पोहोचवल्या जात आहेत. या सर्वासाठी वेगवेगळे दर आकारले जात आहेत.
विशेष म्हणजे, एकमेकांच्या विरोधात असलेले भाष्यदेखील मतदारांपर्यंत पोहोचवले जात आहे. अलिकडे अनेकजण नको असलेले एसएमएस आणि कॉलकरिता ‘डू नॉट डिस्टर्ब’ ची सुविधा वापरतात. मात्र, या कंपन्यांनी त्यावरही मात करून ही सुविधा वापरणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगळी पद्धत अवलंबली आहे. जेवढे दर अधिक तेवढे एसएमएस लवकर पोहोचण्याची शक्यता अधिक, असेही गणित यात आहे. प्रत्येकच उमेदवाराने अशा कंपन्या आणि पीआरओनार या कामासाठी नेमले आहे.