टोलप्रश्नी कॉंग्रेसला पंजा हलवून टाटा करणारे पनवेलचे माजी आमदार प्रशांत ठाकूर भाजप प्रवेशाच्या उंबरठय़ावर असतानाच त्यांनी पुन्हा एकदा टोलचा प्रश्न प्रतिष्ठेचा केला आहे. राज्यात महायुती सत्तेवर आल्यास खारघरचा टोलप्रश्न महायुतीने न सोडविल्यास स्वीकारलेल्या पदांचा त्याग करणार असल्याचा इशारा आज ठाकूर यांनी पनवेल येथील पत्रकार परिषदेत दिला. पक्ष प्रवेशापूर्वी भाजप श्रेष्ठींना अल्टिमेटम देण्याची ही पहिलीच वेळ आहे.शीव-पनवेल महामार्गावर खारघर येथे सुरू होणाऱ्या टोलवसुलीमधून स्थानिक वाहनांना सवलत मिळावी, यासाठी काँॅंग्रेसमध्ये राहून ठाकूर यांनी अनेक प्रयत्न केले. स्वपक्षीय सरकार असूनही ठाकूर हा प्रश्न सोडवू शकले नाहीत. अखेर ठाकूर यांनी भाजपची वाट धरली. भाजपकडून खारघरचा टोलप्रश्न माफ करू, असे आश्वासन मिळाल्यानंतर भाजप प्रवेश केल्याचे ठाकूर म्हणाले. महायुती सत्तेवर आल्यावर हा प्रश्न न सोडविल्यास सर्व पदांचा त्याग करू, मात्र वारंवार राजकीय पक्ष बदलणे चांगले नाही त्यामुळे भाजप सोडणार नाही, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. पनवेल नगर परिषदेच्या मैदानावर मंगळवारी साडेतीन वाजता नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ठाकुरांसह त्यांचे हजारो समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.