जवखेड गावात झालेल्या दलित कुटुंबीयांच्या हत्याकांडाप्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माम सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. साखरेला प्रति क्विंटल तीन हजार रुपये दर द्यावा तसेच नाशिक महानगरपालिकेतील रिक्त आयुक्तांचे पद भरावे याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले, असेही ठाकरे यांनी सांगितले. हत्याकांडाबाबत चौकशी सुरू आहे. सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.  
जातीय हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्याची आवश्यकताही आपण मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.   भाजप सरकारवरील विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर आपण पर्यटनाबाबत मुख्यमंत्र्यांना सादरीकरण करणार आहोत.  त्यामुळे मोठय़ा प्रमाणात रोजगार आणि महसूल निर्माण होणार आहे.याबाबत बैठकीचे आश्वासनही दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.