पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगात बुद्धाचा शांततेचा विचार मांडत आहेत. भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाशी बुद्ध काळापासून आमचे जुने नाते आहे. बौद्ध भिक्खूंच्या चिवराचा रंग भगव्याशी मिळताजुळता आहे, असे ‘सखोल चिंतन’ करीत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजप-रिपाइं युतीला मतदान करा, असे आवाहन केले आहे. विधानसभा निवडणुकीत रामदास आठवले यांनी भाजपशी युती केली आहे. त्याचे समर्थन करताना, मोदी हे जगात बुद्धाचा शांततेचा विचार मांडत आहेत व ते बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे काम करीत आहेत, असे आठवले यांनी म्हटले होते. आठवले यांचे सामाजिक व राजकीय संशोधन त्याही पुढे गेले आहे. घाटकोपरमधील भाजप-रिपाइंच्या प्रचार सभेत बोलताना आठवले म्हणाले की, भाजपचे चिन्ह असलेल्या कमळाशी बुद्ध काळापासून अडीच हजार वर्षांपासून आमचे नाते आहे. इतकेच नव्हे तर कमळ आमचेच आहे, असे त्यांनी सांगितले. आता बौद्ध भिक्खू परिधान करतात, त्या चिवराचा रंगही भगव्याशी मिळता-जुळता आहे, त्यामुळे आंबेडकरी जनतेने भाजप-रिपाइंला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.