गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पुन्हा कसून चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे केली आहे.
वार्ताहर परिषदेत बोलतांना भाजपच्या धोरणावर टीका करतांना ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील मोदी लाट ओसरली असून भाजपच्या पायाखालची वाळू घसरत चालल्याने नरेंद्र मोदी महाराष्ट्रात कोणत्याही पंतप्रधानाने केल्या नसतील इतक्या सभा घेत आहेत. राज्यातील सत्ता त्यांना देशाच्या सीमा सुरक्षेपेक्षा जास्त महत्वाची वाटते. सीमेवर पाकिस्तान गोळीबार करत आहे आणि इकडे पंतप्रधान मोदी मात्र राज्याच्या सत्तेसाठी महाराष्ट्रात सभा घेत फिरत आहेत, हे दुर्देवी चित्र आहे. कांॅग्रेस पक्ष हाच एकमेव असा पक्ष आहे की, याने राज्यात कुठेही कोणत्याही मतदारसंघात आयात केलेला उमेदवार उभा केलेला नाही. राज्यात  कांॅग्रेसचीच सत्ता येईल.
‘घरच्या अहेराबाबक खंत’
आमच्याच पक्षाच्या धोरणाचा प्रचार करणारे एक वृत्तपत्र सातत्याने मलाच लक्ष्य करीत आहे, याबद्दल आपल्याला खंत आहे. प्रसार माध्यमांमध्ये अशा पध्दतीने निवडणूक काळात एकाच व्यक्तीला सातत्याने लक्ष्य करणे हीन पातळीचे द्योतक आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले की, पक्षात कोणाहीबद्दल तक्रार असेल तर ती माझ्याकडे येईल, पण मलाच तक्रार करायची वेळ आली.