विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर, मनसेचे माजी आमदार वसंत गीते यांनी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा देत पक्षाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. गिते यांच्यासह मनसेचे २० ते २५ नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेनेनेही आपल्या या जुन्या सहकाऱ्यास खेचण्यासाठी तयारी चालवली आहे. गीते हे पक्षातच राहणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले तरी त्यांच्या राजीनामा नाटय़ामुळे महापालिकेत पक्षात उभी फूट पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हाध्यक्षांसह मनसेच्या इतर काही स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत त्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला करण्यात गिते यांची महत्वपूर्ण भूमिका होती. राज ठाकरे सेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना सर्वप्रथम साथ देणाऱ्या बडय़ा नेत्यांमध्ये गिते यांचा समावेश होता. राज यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही जागा मनसेने खिशात टाकल्या. त्यानंतर सर्वाधिक ४० नगरसेवक निवडून आणले.
 महापालिकेत सत्ता संपादन केली. नाशिकमध्ये कोणताही निर्णय घेताना गितेंचा शब्द प्रमाण मानला जाऊ लागला. यामुळे गिते समर्थकांची सर्वत्र चलती झाली. परंतु महापालिकेत सत्ता मिळूनही कामे होत नसल्याची ओरड सुरू झाल्यावर राज व गिते यांच्यातील संबंधात फरक पडण्यास सुरूवात झाली. त्यातच मुंबईहून आलेल्या निरीक्षकांनी पक्षाच्या स्थानिक निर्णय प्रक्रियेत भाग घेणे सुरू केल्यावर गिते यांची नाराजी लपून राहिली नाही.
सरचिटणीसपदाचा राजीनामा देताना गिते यांनी वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव या जबाबदारीला न्याय देणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. गिते पक्षांतर करणार असल्याची जोरदार चर्चा असून भाजप व सेना यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत.
गीते यांनी राजीनामा दिल्यावर मनसेच्या नगरसेवकांची तातडीने बैठक झाली. या बैठकीस काही नगरसेवक अनुपस्थित राहिले. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते मनसेत राहणार आहेत. पण, शिवसेनाही गिते यांना पक्षात आणण्यासाठी सक्रिय झाली आहे. खुद्द गिते यांनी या घडामोडींबद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दरम्यान, काही नगरसेवकांनी गिते यांच्यासोबत पक्षांतर केले तरी मनसेची सत्ता कायम राहणार आहे. महापालिका निवडणुकीला दोन वर्षांचा कालावधी असून स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत केवळ त्याचा फटका बसेल अशी चर्चा मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत गीते यांच्या कार्यशैलीच्या तक्रारींचा पाढा पक्षातील दुखावलेल्या गटाने राज यांच्यासमोर मांडल्याचे सांगितले जाते. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज हे नाशिकला आले असतानाही पायदुखीचे कारण देत गिते हे त्यांच्या स्वागतास अनुपस्थित राहिले. या सर्व कारणांमुळे गिते पक्षांतर करतील अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, त्यांनी मनसेच्या तिकीटावर नाशिक मध्य मतदारसंघात निवडणूक लढविली. परंतु ते पराभूत झाले.

गीते यांच्यासह पक्षातील २० ते २५ नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत.
विजय साने
भाजपचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख