गेली पंधरा वष्रे सत्तेत असताना जी कामे केली नाहीत ती करण्याची आश्वासने आता देणारे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे जाहीरनामे म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका करत या दोन्ही पक्षांच्या खोटारडेपणाचे पुरावे म्हणून हे जाहीरनामे लोकांसमोर नेऊ व त्यांचा जाहीर पंचनामा करू, असे भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी सांगितले.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली पंधरा वष्रे राज्यात सत्तेवर आहेत. त्यांनी यापूर्वी २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी जाहीरनाम्यातून लोकांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र गेल्या १५ वर्षांत त्याची पूर्तता केली नाही. उलट आता पुन्हा तीच आश्वासने दिली जात आहेत. ‘नव्या बाटतील जुनीच दारू’ असा हा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली. एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी देत आहे. मग इतकी वष्रे व्यापाऱ्यांची आंदोलने चालू होती त्यावेळी हा पक्ष गप्प का बसला असा सवालही त्यांनी केला.