माझी नक्कल करणारा नेता राज्याच्या जनतेला एकहाती सत्ता देऊन तर पाहा राज्याचं सोनं करतो असे आवाहन करतो, पण नाशिकचा कोळसा केला त्याचं काय? असा खोचक सवाल उपस्थित करत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकांचा समाचार घेतला. ते लोणावळ्यात पक्षाच्या जाहीर सभेत बोलत होते.
‘मेरी कोई भी मत करो नक्कल, नही तो मैं करुंगा तेरी टक्कल’ अशा आपल्या रोजच्या कविता शैलीत आठवले यांनी राज यांच्यावर निशाणा साधला. माझ्यावर टीका करणारा नेता राज्याची सत्ता माझ्या हाती देऊन पहा असे आवाहन जनतेला करताना दिसतो पण, नाशिकची सत्ता हाती असूनही तेथे कोणतीच विकास कामे झालेली नाहीत, असे आठवले म्हणाले. अशा नेत्याच्या हाती महाराष्ट्र गेल्यास राज्याचे वाटोळे होईल असेही ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आठवले यांनी स्तुतीसुमने उधळली. महाराष्ट्रातील लोक मोदींच्या नेतृत्वाला भुलणार आहे आणि लोणावळ्यात कमळ फुलणार आहे, असे आठवले म्हणाले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात देशातील दलितांचे भले होईल म्हणून बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपसोबत गेलो असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले.