सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे राजकीय पक्षांशी संलग्नित असलेल्या विद्यार्थी संघटनेतील तरुण नेते व कार्यकर्ते यांचे पक्षातील महत्त्व यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड वाढले आहे. व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, यू-टय़ूबचा वापर करण्यात हातखंडा असल्याने या तरुण कार्यकर्त्यांची त्यामुळे पूर्वीच्या प्रचारसाहित्य वाटणे, सभांकरिता आवश्यक असलेल्या परवानग्या मिळविणे, बॅनर लावण्यासारख्या कामातून सुटका झाली आहे. त्याऐवजी पक्षाला मदत होईल असे विनोद, जिंगल्स, व्हिडीओ, मजकूर तयार करून ते सोशल मीडियावर ‘व्हायरल’ करण्याची जबाबदारी अनेक पक्षांनी आपल्या विद्यार्थी संघटनांवर टाकली आहे. काही ठिकाणी तर अशी तरुण मुलेच आपापल्या उमेदवारांच्या कार्यालयात ‘सोशल मीडिया प्रचार प्रमुख’ म्हणून जबाबदारी भूषवित आहेत.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस..
पूर्वी प्रचारयात्रा, सभांना परवानगी घ्या, ध्वनिक्षेपक खुच्र्याची सोय करा, नेत्यांची भाषण ऐकायला मुले घेऊन या अशा जबाबदाऱ्या विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांवर टाकल्या जात असत. पण, सोशल मीडियाच्या प्रभावामुळे यंदाच्या निवडणुकीत आमच्या कामात मोठा बदल झाला असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांनी सांगितले.
मनविसे..
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेवरही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणातील मजकूर घेऊन ते यू-टय़ूबवर टाकणे, मनसेची हवा तयार करणारी गाणी, विनोद तयार करून ती सोशल मीडियावर टाकणे, अशा कामाला मनविसेचे कार्यकर्ते लागले आहेत. याशिवाय ध्वनिक्षेपक घेऊन छोटय़ा चौक सभा घेणे, मोटरसायकल फेरी यात्रा आयोजिणे, प्रचारसाहित्य वाटणे अशी कामे कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे मनविसेचे उपाध्यक्ष साईनाथ दुर्वे यांनी सांगितले.
युवा सेना..
शिवसेनेच्या युवा सेनेने १८ ते २५वर्षे वयोगटातील नव्याने नोंदणी झालेल्या तरुण मतदारांना लक्ष्य केले आहे. अशा मतदारांना शोधून त्यांच्यापर्यंत आदित्य ठाकरे यांचा संदेश पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम युवा सेनेचे कार्यकर्ते करत आहेत. त्यासाठी प्रभाग स्तरावर शाखा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उपशाखा अधिकारी आणि गट अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. एकेका मतदारसंघात आमचे जवळपास २५० कार्यकर्ते कामाला लावल्याचा दावा युवा सेनेचे नेते प्रदीप सावंत यांनी केला.
अभाविप..
 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई संघटनमंत्री यदुनाथ देशपांडे यांनी मात्र कुठलीही राजकीय भूमिका न घेता केवळ मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम आमचे विद्यार्थी कार्यकर्ते करीत असल्याचा दावा केला आहे.