माधव ज. जोशी Madhav.Joshi@tatatel.co.in चार दशकांहून अधिक काळ दिल्लीत पत्रकारिता केलेले आणि अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षी राहिलेले ज्येष्ठ पत्रकार बापूराव लेले यांची जन्मशताब्दी नुकतीच पार पडली. त्यानिमित्ताने.. महाराष्ट्रातील ज्या पत्रकारांनी दिल्लीत जाऊन हिंदी भाषा आत्मसात करून आदरस्थान प्राप्त केले त्यात ना. बा. ऊर्फ बापूराव लेले यांचा फार वरचा क्रमांक लागतो. १९५०च्या दरम्यान दादासाहेब आपटे यांनी हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेची सहकारी सोसायटी म्हणून स्थापना केली व बापूराव त्यांच्याबरोबर खजिनदार होते, ते १९७६ साली इंदिरा गांधींनी सर्व वृत्तसंस्था बरखास्त करेपर्यंत. त्या वेळी वृत्तपत्र कागदाची फार टंचाई होती. काळा बाजार व्हायचा. इतरही अनेक समस्या होत्या. अशात संघ आणि हिंदुस्थान समाचार यांचा कोणी जबाबदार माणूस दिल्लीत नव्हता म्हणून बापूरावांना १९५६ साली दिल्लीत पाठविण्यात आले. तेव्हापासून २००१ पर्यंत अशी तब्बल ४५ वर्षे बापूरावांनी दिल्लीत लीलया वावर केला. खरा पत्रकार हा कुठल्याही पक्षाचा नसतो, तो सर्वाना प्रिय असतो, सर्वाचा त्याच्यावर विश्वास असतो- ही आदर्श पत्रकाराची व्याख्या बापूरावांना नजरेसमोर ठेवूनच केली गेली असली पाहिजे. ते सर्वानाच जवळचे वाटत. यशवंतराव आणि वेणूताई चव्हाण यांच्याकडे तर त्यांना मुक्तद्वार होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी हे भारतभर भ्रमण करीत असत. यशवंतराव त्यांना नियमित भेटत असत आणि त्यांची भेट बापूराव घडवून आणीत असत. इतर एक-दोन मंत्र्यांबरोबरही अशा भेटी होत असत. लालबहादूर शास्त्री हेसुद्धा बापूरावांना फार मान देत असत. भारत-पाकिस्तान १७ दिवसांचे युद्ध १९६५च्या सप्टेंबरमध्ये झाले होते. तेव्हा भारताने पाकिस्तानला सपाटून मार देऊन फार मोठा भूप्रदेश जिंकला होता आणि पाकिस्तानात घोडदौड चालू होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा गटाच्या दबावाखाली २२ सप्टेंबर १९६५ रोजी भारताला युद्धबंदी जाहीर करावी लागली होती; पण जिंकलेला भूप्रदेश भारताच्या ताब्यात होता. या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष कोसिजिन यांच्या दडपणामुळे भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री रशियात दाखल झाले होते. बापूराव ‘िहदुस्थान समाचार’तर्फे ताश्कंदला १० जानेवारी १९६६ रोजी त्यांच्याबरोबर गेले होते. करार केला नाही तर रशिया युद्धात पाकिस्तानच्या बाजूने उतरेल, अशी धमकी रशियाने दिली आणि शास्त्रीजींना दडपणाखाली पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्याबरोबर ताश्कंद करारावर सही करावी लागली, जिंकलेला प्रदेश परत करावा लागला. ‘हा करार करून मी देशाचा, जवानांचा, शहीद सनिकांच्या कुटुंबांचा विश्वासघात केला आहे; मी कोणत्या तोंडाने देशवासीयांसमोर जाऊ..’ हा एकच विचार त्या संवेदनशील पंतप्रधानांच्या मनात होता आणि त्या प्रचंड दडपणाखाली त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल अनेक अफवा उठल्या, पण बापूरावांनी सत्य परिस्थिती लिखाणातून देशासमोर आणली. बापूराव संघाचे कट्टर अनुयायी होते, हे त्यांनी कधी लपवून ठेवले नाही. त्यांनी कधीही तत्त्वांना मुरड घातली नाही. तरीही पंतप्रधान कार्यालयापासून राष्ट्रपती भवनापर्यंत त्यांचा मुक्त संचार असे. महाराष्ट्रातील काही घटनांवर प्रतिक्रिया द्यायची असेल तर इंदिरा गांधी यांचे प्रसिद्धीप्रमुख शारदा प्रसाद किंवा नरसिंह रावांच्या कार्यालयातील राम खांडेकर किंवा अटलबिहारी वाजपेयींना त्यांची आठवण व्हायची. अटलजींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पुणे येथे फार सुंदर भाषण पोवाडय़ासह केले होते, त्याचे संहिता लेखक बापूराव होते. बापूरावांना मनुष्यस्वभावाची दांडगी पारख होती. त्यामुळे राजकीय पक्षांची पुढील खेळी काय असेल, याचा ते अचूक अंदाज वर्तवीत. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेची मंगलवार्ता देणारे ते पहिले वार्ताहर! आणीबाणीच्या काळ्या पर्वात ‘इंदिराजी निवडणुका घेणार’ ही बातमी प्रथम झळकवली बापूरावांनी आणि नंतर इतर वृत्तपत्रांनी त्या बातमीचा हवाला देऊन ती छापली. पत्रसूचना कार्यालय, संसद पत्रकार कक्ष- कुठेही गेले तरी बापूरावांसाठी खास स्थान असे. मुंबई, अहमदाबाद, दिल्ली.. अनेक ठिकाणी त्यांचे चेले वृत्तपत्रसृष्टीत मानाने मिरविले. १९७० ते ७५ या कालावधीत त्यांची प्रेस कौन्सिलवर नियुक्ती झाली. पत्रकार या नात्याने राष्ट्रपती, पंतप्रधानांसमवेत त्यांनी अनेक देशांचे दौरे केले. लालकृष्ण अडवाणी, अटलजी हेही उमेदीच्या काळात बापूरावांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या मदतीची जाहीर कबुली द्यायचे. दिल्लीत खासदार म्हणून जाणाऱ्या मराठी आणि गुजराती मंडळींना बापूराव हे मार्गदर्शक होते. िहदी शिकण्यापासून- संसदेत कसे वागायचे, प्रश्न कसे विचारायचे, हे बापूराव शिकवीत. सुमित्रा महाजन, सुषमा स्वराज यांचे ते ‘बापूकाका’ होते. बापूराव कलाप्रेमी होते. त्यांचे बळीराम पेठेतील घर म्हणजे विष्णुपंत औंधकर, बालगंधर्व, गौहरबाई यांचे जळगावमधील हक्काचे ठिकाण. बापूराव लहानपणीच पेटी शिकले. दिल्लीतील सर्व मराठी कार्यक्रमांना त्यांची हजेरी असायचीच, पण रेल्वे तिकिटे उपलब्ध करून देणे, राहण्याची सोय करणे या प्रकारे सर्व मदतही ते अनेकांना करीत. अरुण जोगळेकर आणि सई परांजपे एनएसडीत प्रशिक्षण घ्यायला दिल्लीत गेल्यावर काही दिवस त्यांच्याकडेच राहात होते. १९६० साली यशवंतरावांच्या मागे लागून दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्र बापूरावांनी सुरू केले आणि ज्येष्ठ पत्रकार भा. कृ. केळकर यांच्या ताब्यात ते दिले. पुढे इतर राज्यांनीही महाराष्ट्राचा कित्ता गिरवला. महाराष्ट्रातील पत्रकारांशी त्यांचे फार जवळचे नाते होते. दिल्लीस्थित मो. ग. तपस्वी, भा. कृ. केळकर, रवींद्र दाणी, अशोक जैन हे त्यांच्या फार जवळचे. मुकुंदराव किर्लोस्कर यांच्यावरील स्नेहामुळे ते ‘किर्लोस्कर’मध्ये ‘नारायण’ या नावाने लिहायचे. आयुर्वेदाचाही त्यांचा दांडगा अभ्यास होता. अनेक जणांना बापूराव औषधांसाठी आठवत. १४ ऑक्टोबर २००१ला त्यांच्या सहस्रचंद्र दर्शनानिमित्ताने राम नाईक यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने बापूरावांचा तत्कालीन पंतप्रधान अटलजी यांच्या निवासस्थानी असलेल्या पंचवटी सभागृहात सत्कार केला. गृहमंत्री अडवाणी अध्यक्ष होते. अटलजींशी मतभेद असूनही दत्तोपंत ठेंगडी उपस्थित होते. अटलजी, ठेंगडी आणि अडवाणी यांनी सुंदर भाषणे केली. अटलजी मिश्कीलपणे म्हणाले की, ‘‘हे लेले (हिंदीत घे घे) नाहीत, तर दे दे (देणारे) आहेत.’.. आणि ते खरे आहे!