किशोर रिठे

निसर्गाला माणसाने हरप्रकारे ओरबाडले. गुंडपुंडांच्या भाषेत बोलायचे तर निसर्गाचा ‘गेम’ केला.. आणि दुसरीकडे, वन्य प्राण्यांचा बाजारही मांडला, तोही खाद्य म्हणून! यातील धोके आता स्पष्ट होत आहेत..

साधारण १९९० च्या दशकात विद्यार्थ्यांना निसर्गातील गवत, वनस्पती, कीटक, प्राणी व पक्षी या प्रत्येक घटकाचे महत्त्व समजावून सांगताना आम्ही एक ‘नेचर गेम’ खेळायचो! यामध्ये सूर्यापासून ऊर्जा घेणारे हे सर्व घटक निसर्गसाखळीत एकमेकांवर कसे अवलंबून आहेत हे त्यांना पटवून द्यायचो! निसर्गसाखळी घट्ट असली की त्यावर अवलंबून असणारे प्राणी, पक्षी, माणूस हे सर्व सुखाने नांदतात. पण माणसाच्या हव्यासामुळे या मूळच्या घट्ट निसर्ग साखळीवर हळूहळू दबाव वाढतो, काही घटकांना फटका बसतो. निसर्ग साखळीतील या घटकांची एक-एक कडी सल झाली की प्रत्येक घटकाच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या खिळखिळ्या निसर्ग साखळीस पुन्हा जाग्यावर आणणे कठीण जाते हा संदेश देणारा तो ‘नेचर गेम’ होता. पुढे हा विचार रुजलेल्या विद्यार्थ्यांना, माणूस या निसर्गाचा कसा ‘गेम’ करतोय हे आम्ही निसर्गाच्या विविध समस्यांचे दाखले देऊन पटवून सांगायचो. आज कोरोना विषाणूमुळे जगातील प्रत्येक माणसाच्या अस्तित्वापुढे जे आव्हान उभे केले आहे ते पाहून मला या ‘नेचर गेम’ची आठवण येते. आजच्या विदारक परिस्थितीमागे निसर्गाचा ऱ्हास असल्याचे सांगतांना प्रसिद्ध कवी गुलजार म्हणतात, ‘ये शहरों का सन्नाटा बता रहा है,  इन्सानों ने कुदरत को नाराज बहुत किया है।’

यापुढील काळात ‘निसर्गाचा गेम’ केल्यामुळे माणूस या पृथ्वीवरून कसा वेगाने नष्ट होऊ शकतो हे विद्यार्थ्यांना पटवून देणे आता सोपे होणार आहे.

चीन व साथीचे आजार यांचा फार पूर्वीपासून संबंध असल्याचे लक्षात येते. प्लेग किंवा ‘ब्लॅक डेथ’ रोगाची सुरुवात गॉटफ्रिड या संशोधकाने तेराव्या शतकाच्या शेवटी किंवा चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस चीन मधील गोबी वाळवंटात झाल्याचे लिहिले आहे. (विसाव्या शतकातील साथीच्या रोगांचा इतिहासकार स्टीकर लिहितो की प्लेगच्या साथीची लागण भारतात पहिल्यांदा १३३२ व दुसऱ्यांदा १३४४ साली झाली, पण हा अपवाद). करोनाच्या (कोविद-१९) विषाणूची लागण पुन्हा चीनमधूनच झाली. हा लेख लिहित असतानाच ‘हंता’ नावाच्या विषाणूमुळे चीन मध्ये पुन्हा एक बळी नोंदविला आहे. त्यामुळे या सर्व विषाणूंचा उगम प्रामुख्याने चीन सारख्या देशांमध्येच प्रामुख्याने का असतो या प्रश्नाच्याही खोलवर जाणे आवश्यक आहे.

सार्स या रोगाने २९ देशांमध्ये थमान घातल्यावर विविध देशांतील तज्ज्ञांनी एकत्र येऊन चीन मधील शेंझेन येथील जिवंत वन्यप्राण्यांना विक्रीसाठी ठेवलेल्या बाजारात नमुने गोळा केले होते. त्या संशोधनाअंती हॉर्स शू प्रजातीच्या वटवाघळामध्ये सार्सचे विषाणू आढळून आले होते. त्यातून त्यांचा संसर्ग उदमांजर (पाम सिवेट) तसेच मुंगुसारख्या बॅजर या वन्यप्राण्यांमध्ये व तेथून माणसांमध्ये झाल्याचे लक्षात आले (लीन फान वांग यांचा शोधनिबंध).

फक्त चीन नव्हे तर जगात आफ्रिका, अमेरिकेसारख्या अनेक देशांमध्ये वन्यप्राण्यांचे बाजार भरतात. आफ्रिका व चीनमध्ये जवळपास सर्व वन्यप्राणी व पक्ष्यांचा खाण्यासाठी सर्रास वापर होतो व त्यामुळे असे विषाणू येथे जास्त निर्माण होतात. पश्चिम व मध्य आफ्रिकेतील शहरांमधील बाजारांमध्ये माकड, वटवाघूळ, उंदीर, पक्षी, अनेक सस्तन प्राणी व कीटक यांची खाद्य म्हणून सर्रास विक्री होते. वन्यप्राण्यांचे हे ‘बुशमीट’ म्हणजे गरीब जनतेसाठी अन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून त्यास येथे शासनमान्यता आहे. चीनमधील बाजारांत जगभरातील बहुतांश वन्यप्राण्यांचे मांस विकले जाते. येथील लोक व सरकार सातत्याने याचे का समर्थन करीत आले याची पार्श्वभूमी पाहूया. सन १९८० च्या दशकात चीनमध्ये भयंकर दुष्काळ पडून ३६ दशलक्ष लोक मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे चीन सरकारने ‘अन्नसुरक्षे’साठी व गरिबांना प्रोटीन मिळावे या हेतूने कोंबडीपालन, वराहपालन यांसारख्या खाजगी फार्मस्ना चालना दिली. मग काही लहान शेतकऱ्यांनी कासव, ससे इत्यादी वन्यप्राण्यांचीही पदास करणारे फार्म उभे केले. व त्यांची विक्री करण्यास सरकारने प्रोत्साहन दिले. यापुढे जाऊन चीन सरकारने १९८८ सालच्या ‘सुधारित वन्यप्राणी संरक्षण कायद्या’च्या नावाखाली वन्यप्राण्यांना चक्क ‘नैसर्गिक संसाधन’ म्हणून घोषित केले. कासव, ससा यांसोबतच आता अस्वलांचे फार्म उभारले गेले. भारतासह जगात असणारा प्रत्येक वन्यप्राणी अवैधरित्या चीनच्या बाजारपेठेत उपलब्ध होऊ लागला. लवकरच हा व्यापार चीनच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनला. या गोष्टीचा सन २००० च्या दशकात उद्रेक झाला. सार्स नावाचा विषाणू चीनमध्ये पसरून त्याचे येथे १४०० रुग्ण आढळून आले. सन २००३ मध्ये या विषाणूची लागण वटवाघूळ माग्रे उदमांजरामधून झाल्याचे लक्षात आल्याने काही काळ अशा बाजारांवर बंदी आली. ‘फार्म मध्ये पदास केलेले वन्यप्राणी खाण्यास सुरक्षित असतात’ असे कारण देऊन व्यापाऱ्यांनी हे बाजार पुन्हा सुरू ठेवणे सरकारला भाग पाडले. सन २००४ मध्ये वन्यप्राण्यांचे फार्म व हा वन्यप्राणी मटन उद्योग तब्बल १०० अब्ज डॉलरच्या घरात पोहोचला. आता तर चीन सरकारने वाघ व खवल्या मांजर यांसारख्या वन्यप्राण्यांचीही पदास करून त्यांचे मांस उपलब्ध करून देण्यास परवानगी दिली. त्यामुळे चीनच्या एकूण अर्थव्यवस्थेत वन्यप्राण्यांचे बाजार व मटन उद्योग याचा विक्रमी हिस्सा नोंदविला गेला. चिनी जनतेला वन्यप्राण्यांचे मांस हे ‘निरोगी आरोग्यासाठी, अधिक शक्तिशाली बनण्यासाठी व रोगांचा प्रतिकार करण्यासाठी’ आवश्यक वाटू लागले. चीनमधील प्राण्यांच्या व्यापाराचा अभ्यास असणारे प्रा. पीटर ली यांच्या मते सर्वसामान्य चिनी माणसापेक्षा येथील उच्चभ्रू वर्ग याचा अधिक वापर करतो. त्यांच्या मते अशा प्राण्यांचे मांस शिजविण्यापूर्वीच हे विषाणू एका प्राण्यामधून दुसऱ्या प्राण्यांमध्ये व माणसांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे अशा प्रकारचे वन्यप्राण्यांचे फार्म/कत्तलखाने/बाजार हे अशा संसर्गाचे उगमस्थान बनते.

सध्या कोरोना विषाणूने हाहाकार माजविला असताना चीन सरकारने आता हा उद्योग त्वरित बंद केला आहे. परंतु तो कायमचा बंद राहीलच याची अजूनही खात्री देता येणार नाही.  जेन गुडाल यांच्यासोबत संशोधन केलेल्या इमोरी विद्यापीठातील पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख थॉमस गेलीप्स त्यांच्या मते ‘अशा विषाणूंना वन्यप्राण्यांच्या प्रजातींसारख्या सीमा नसतात. शहरांमध्ये थाटलेले हे बाजार या विषाणूंचा व साथीच्या रोगांचा जगभर प्रसार करणारी ठिकाणे बनतात’.

सन १९६० ते २००४ दरम्यान विषाणूंच्या अशा संसर्गामुळे झालेल्या सर्व रोगांचा एकत्रित अभ्यास २००८ साली लंडनच्या संशोधक केट जोन्स व त्यांच्या चमूने केला. त्यामध्ये विषाणूंमुळे एकंदर ३३५ संसर्गजन्य रोग निर्माण झाल्याचे लक्षात आले; त्यापैकी ६० टक्के आजारातील विषाणू हे वन्यप्राण्यांमधूनच आले होते. वन्यप्राण्यांमधील काही विशिष्ट प्रजाती या अशा विषाणूंचे वाहक ठरतात. परंतु वन्यजीव अरण्यांमध्ये मानवी हस्तक्षेप वाढून जंगलतोड, खाणकाम, रस्ते निर्मिती, झपाटय़ाने होणारे शहरीकरण आदी गोष्टींमुळे येथील वन्यप्राणी माणसांच्या सान्निध्यात अधिक येतात. जोन्स यांच्या मते माणूस व वन्यजीव यांच्यात वाढलेला हा संपर्क या रोगांच्या प्रसारास कारणीभूत आहे. काही देशांमध्ये त्यांची शिकार होऊन ते जिवंत वा मेलेल्या स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध होतात. या सर्व संशोधनांवरून एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे ‘वन्यप्राणी आपले मित्र आहेत, खाद्य नाही.’

आफ्रिका व चीनमध्ये असे एकापाठोपाठ विषाणू निर्माण होत असले तरी त्यांचा संसर्ग इतर देशांमध्ये इतक्या झपाटय़ाने का होतो याचे उत्तरही शोधणे गरजेचे आहे. पृथ्वीवरील जैवविविधतेने संपन्न अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यासारख्या जैविक परिसंस्थांना खरे तर अशा विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करणे तसेच नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी करणाऱ्या व्यवस्था असे म्हटले जाते. मानवी आरोग्य, पाळीव प्राण्यांचे व वन्यजीवांचे आरोग्य हे या जैविक परिसंस्थांच्या सुदृढतेवर अवलंबून आहे अशी ‘वन हेल्थ’ संकल्पना अमेरिकेतील अनेक विद्यापीठांत आज अभ्यासली जाते. परंतु या महत्त्वपूर्ण जैविक परिसंस्थांची परिस्थिती जगभर अत्यंत दयनीय आहे. चीन प्रमाणेच बहुतांश पाश्चात्त्य देशांनीही तेथील वने, वन्यजीव व जैविक विविधता सांभाळणाऱ्या या जैविक परिसंस्थांना (निसर्गाला) विकासाच्या गोंडस नावाखाली छळले आहे. थॉमस गेलीप्सच्या मते ‘बहुतांश भूप्रदेशांमध्ये माणसाच्या विकासाच्या कल्पनांमुळे वन्यप्राणी अधिवास नष्ट झालेत, मानवी वस्त्या वन्यजीव अधिवासांच्या अति जवळ गेल्या व माणूस वन्यप्राण्यांच्या जास्त संपर्कात आला. काही देशांमध्ये हे वन्यप्राणी खाद्य म्हणून थेट माणसाच्या जेवणाच्या टेबलवर पोहोचलेत’.

अशा वेळी सार्स, इबोला, स्वाइन फ्लू, कोरोना या सर्व विषाणूंच्या निर्मितीच्या कारणांच्या मुळाशी जाणे अत्यंत आवश्यक आहे. थॉमस गेलीप्सच्या मते आपणास फारच थोडे विषाणू ज्ञात आहेत. तर लिव्हरपूल विद्यापीठातील ‘प्रादुर्भाव होणारे पशुआजार’ विभागाचे प्रमुख एरिक फेरी यांच्या मते याहीपेक्षा भयंकर विषाणू येणाऱ्या काळात पृथ्वीवर हौदोस घालणार आहेत. माणसाने वटवाघूळ, उंदीर, पक्षी, पाळीव प्राणी व पाळीव पक्षी यांना खाद्य म्हणून स्वीकारल्याने त्याचा यांच्याशी संपर्क वाढला आहे. त्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव सहज शक्य झाला आहे. यापुढे वारंवार उद्भवणाऱ्या अशा परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी आता जगातील सर्वच देशांना अफिका, चीन सारख्या देशांवर कडक निर्बंध, बंधने लावण्याची गरज निर्माण झाली आहे. असे झाल्यास भविष्यात अशा विषाणूंपासून होणारे संभाव्य दुष्परिणाम टाळता येऊ शकतील.

लेखक ‘सातपुडा फउंडेशन’चे संस्थापक असून भारत सरकारच्या केंद्रीय वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य आहेत. ईमेल : satpuda2001@gmail.com