|| डॉ. मनमोहन वैद्य (लेखक रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह आहेत.)

‘देशात पुन्हा भाजपशासित सरकार आले तर भारत हा हिंदू पाकिस्तान बनेल’ यासारखी वादग्रस्त वक्तव्ये आज केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृती, हिंदू जीवनदृष्टी आणि आपला उदार व सहिष्णू वारसा यांची चर्चा करणारा लेख..

काँग्रेस हा राजकीय पक्ष चर्चसमर्थित आणि कम्युनिस्टांच्या अभारतीय विचारांनी प्रभावित झाला आहे. काही नेते जेव्हा क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी भारताच्या अस्मितेवर घाला घालणारी वक्तव्ये करतात तेव्हा त्याचे आश्चर्य वाटण्याऐवजी वेदनेचीच जाणीव जास्त होते. हे नेते उच्चविद्यविभूषित आहेत. त्यांची वक्तव्ये ऐकताना माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एस. राधाकृष्णन आयोगाने १९४९ साली भारतीय शिक्षणपद्धतीवर लिहिलेल्या टिप्पणीची हमखास आठवण येते. आधुनिक शिक्षणपद्धतीच्या अभारतीय चरित्राबाबत (The Un-indian character of Education) डॉ. राधाकृष्णन यांनी म्हटले आहे, ‘‘एका शतकाहून अधिक काळ या देशात सुरू असणाऱ्या शिक्षणप्रणालीने भारताच्या भूतकाळाकडे दुर्लक्ष केले आहे आणि भारतीय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक ज्ञानापासून वंचित ठेवले आहे अशी मोठी तक्रार आहे. त्यामुळे आपली सांस्कृतिक मुळे हरवली असल्याचा काही जणांचा आज समज झाला आहे. तसेच आपल्या या मुळांनी आपल्याला वर्तमानाशी फारकत घेत भूतकाळाशी जखडून ठेवले आहे असा आणखी एक वाईट समज तयार झाला आहे.’’

‘देशात पुन्हा भाजपशासित सरकार आले तर भारत हा हिंदू पाकिस्तान बनेल’ असे वक्तव्य नुकतेच काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने केले आहे. साम्यवादासारख्या अभारतीय विचारांचा आपल्यावरील पगडा आणि त्याच्या प्रभावामुळे हे अभारतीयीकरण अधिक दृढ झाले आहे. यामुळे फक्त विचारच नाही तर, आपली शब्दसंपदादेखील प्रभावित झाली आहे. हिंदू पाकिस्तान, हिंदू तालिबान, हिंदू दहशतवाद अशा संकल्पना या अभारतीय विचारांचीच अभिव्यक्ती आहेत. वास्तविक, हिंदू पाकिस्तान हा शब्दच पूर्णपणे विरोधाभासात्मक आहे.

या वक्तव्याची निर्थकता समजून घ्यायची असेल तर भारत आणि हिंदुत्व काय आहे हे समजून घ्यावे लागेल. नुकतेच नागपूर येथे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, ‘‘पश्चिमेतील राष्ट्र या संकल्पनेपेक्षा भारताची राष्ट्र म्हणून वेगळी संकल्पना आहे. पश्चिमेतील विकसित राष्ट्रांना एक विशिष्ट भूमी, एक विशिष्ट भाषा, एक विशिष्ट धर्म(रिलिजन) आणि समान शत्रू असा आधार आहे. उलटपक्षी, भारताचे राष्ट्रीयत्व हे वसुधैव कुटुंबकम् आणि सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामय याचे वैश्विक चिंतन आहे. भारताने संपूर्ण विश्वाला कायमच एका कुटुंबाच्या रूपात पाहिलेले आहे व भारत सर्वाच्या सुखाची आणि निरामयतेची कामना करीत आला आहे. मानव समूहांचा संगम, त्यांचे मीलन आणि सहअस्तित्वाच्या दीर्घ प्रक्रियेनंतर भारताची ही ओळख तयार झाली आहे.  आपल्याला सहिष्णुतेतून बळ मिळते, आपण व्यापकतेचे  स्वागत करतो आणि विविधतेचे गुणगान गातो. हे तिन्ही घटक अनेक शतकांपासून समाजमन आणि आपले मानवी मन याचा अविभाज्य भाग आहेत आणि तेच आपली राष्ट्रीय ओळख आहेत.’’

भारताच्या या उदार, सर्वसमावेशक, सहिष्णू, वैश्विक चिंतनाचा आधार आहे भारताचे अध्यात्म आणि सर्वागीण जीवनदृष्टी. हे सर्व जगाला ज्ञात आहे. डॉ. राधाकृष्णन यांनी या जीवनदृष्टीला हिंदू जीवनदृष्टी (Hindu view of  Life) म्हटले आहे. या वैशिष्टय़ाबद्दल ते म्हणतात, ‘‘सुधारणेचे (Reform) हिंदू धर्माचे वैशिष्टय़ हेच आहे की, प्रत्येक समूह आपले जुने संबंध कायम ठेवतो आणि आपली ओळख तथा हितसंबंधांचे रक्षणही करू शकतो. विद्यार्थी जसे आपल्या महाविद्यालयीन गौरवाबद्दल विचार करतात तसाच विचार हे समूह आपल्या देवतांबद्दल करतात. आपल्याला एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयात घेऊन जायचे नसून प्रत्येक महाविद्यालयाचा स्तर उंचावत न्यायचा आहे, मानकांना उंच करायचे आहे आणि त्यांच्या आदर्शावर विचार करून त्यांचे अध्ययन-परिशीलन करायचे आहे. यामुळे प्रत्येक महाविद्यालयाद्वारे आपण एकच लक्ष्य साध्य करू शकू. हिंदू धर्म एका अंतिम तत्त्वाला, चैतन्याला मानतो, परंतु, त्याला विविध नावे दिली गेलेली असतात. या धर्मातील सामाजिक व्यवस्थेत अनेक जाती असूनही समाज एक आहे. यात अनेक वंश वा जनजाती असतील तरी एक समान तत्त्वाने सर्व बांधले गेले आहेत.’’

गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी आपल्या ‘स्वदेशी समाज’ या निबंधात हेच सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘अनेकतेत एकता पाहणे आणि विविधतेत एकता प्रस्थापित करणे हा भारताचा अंतर्निहित धर्म आहे.  भारताने कधीही वैविध्याला विरोध केला नाही आणि परक्यांना शत्रू मानले नाही. कशाचाही त्याग वा नाश न करता आपल्या विशाल व्यवस्थेत त्याला सामावून घेतो. त्यासाठी भारताने विविध मार्गाचा अवलंब केला आहे आणि आपापल्या परिघात सर्वाचेच महत्त्व स्वीकारले आहे. याच गुणामुळे आपण कोणत्याही समाजाला आपला विरोधक मानून घाबरलो नाही. प्रत्येकाची स्वतंत्र मते देशाला स्वत:चा विस्तार करण्याची संधी देतील. येथे हिंदू, बौद्ध, मुस्लीम आणि ख्रिश्चन परस्परांत लढून मरणार नाहीत. इथे त्यांच्यात सामंजस्यच प्रस्थापित होईल. हे सामंजस्य वेगळ्या संकल्पनेतून घडलेले हिंदुत्वच असेल. त्यांचा बाह्य़ांश परदेशी असला तरी अंतरात्मा भारतीय असेल.’’

भारताच्या या उदार, सर्वसमावेशक, एकात्म आणि सर्वागीण आध्यात्मिक परंपरा नाकारूनच पाकिस्तानची निर्मिती झाली हे काँग्रेसचे नेते विसरत आहेत. हे शिक्षणाद्वारे होणाऱ्या अभारतीयीकरणाचे आणि साम्यवादासारख्या अभारतीय विचारांमुळे प्रभावित होण्याचेच परिणाम आहेत. भारत हिंदू राहिला तरी कधीही त्याचा पाकिस्तान होणार नाही. वास्तविक, हिंदूंना नाकारल्यामुळेच पाकिस्तानचा जन्म झाला आहे. भारताची एकता, स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि अखंडत्व यातच भारताचे अस्तित्व सामावलेले आहे आणि ‘हिंदुत्व’ या नावाने ओळखला जाणारा अध्यात्मावर आधारित, सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा ही भारताची अस्मिता आहे. आधुनिक आणि उच्चशिक्षित असूनही(की असल्यामुळे?) काँग्रेसचे नेते आपल्या क्षुद्र राजकीय स्वार्थापोटी भारताची अस्मिता नाकारत आहेत हीच खरेतर आश्चर्याची बाब आहे. अस्मिता नाकारल्यामुळे भारताचे अस्तित्व संकटात येऊ शकते हे त्यांना लक्षात येत नसेल का? अस्मिता नाकारल्यामुळेच भारताचे विभाजन झाले होते.

वास्तविक, उदार, सहिष्णू, विविधतेचे गुणगान करणाऱ्या ज्या ५००० वर्षांहून अधिक जुन्या संस्कृतीचा उल्लेख प्रणबदांनी केला आणि ज्या वारशाला डॉ. राधाकृष्णन व रवींद्रनाथ ठाकुरांनी हिंदू जीवनदृष्टी म्हटले त्याचा वारस पाकिस्तानही आहे. त्या वारशाशी आपले नाते तोडून तो पाकिस्तान बनला आहे. स्वत:ला या वारशाशी जोडून आणि मुस्लीम उपासना पद्धती न सोडता तो हिंदू बनू शकतो. एम.सी. छागला, डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि पाकिस्तानात जन्मलेले कॅनडा निवासी  तारक फतेह यांच्यासारख्या मंडळींनी मुस्लीम असूनही स्वत:ला या वारशाशी जोडले आहे. मुस्लीम असणाऱ्या पाकिस्तानने जर हा उदार व सहिष्णू वारसा स्वीकारला तर तो स्वत:च ‘भारत’ अर्थात ‘हिंदू पाकिस्तान’च बनेल. राजकीय अस्तिव वेगळे ठेवूनही हे काम करता येणे शक्य आहे. ही भारतीय विचारसरणी आहे. नेपाळ वेगळे राष्ट्र असूनही भारताच्या या सांस्कृतिक वारशाशी स्वत:ला जोडतो. याच कारणामुळे शेजारी असूनही भारत आणि नेपाळमध्ये कोणतीही समस्या येत नाही.

या गहिऱ्या सांस्कृतिक मुळांमुळेच भारताची ओळख तयार झाली आहे. या मुळांशी जोडलेले राहणे अर्थात आपल्या अस्मितेशी जोडलेले राहणे आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. या अस्मितेला डॉ. राधाकृष्णन आणि गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुरांनी जीवनदृष्टी म्हटले आहे. ज्याला हिंदू या शब्दावर आक्षेप असेल ते याला भारतीय, इंडिक असेही म्हणू शकतात. परंतु आपला हजारो वर्षांचा वारसा हाच त्याचा मूळ विषय आहे. सत्य एक असले तरी विभिन्न नामांनी ते ओळखले जाऊ शकते असे हिंदू चिंतन मानते.

आता याची दुसरी बाजू पाहू या. भारतीय सांस्कृतिक विचार परंपरेशी खोलवर जोडलेले असताना आपली विचार करण्याची पद्धत कशी असते याबाबत एक चांगले उदाहरण आचार्य महाप्रज्ञ यांच्या कथनात येते. तेरापंथ ही श्वेतांबर जैनांमधील एक आध्यात्मिक परंपरा आहे, ज्याचे आचार्य महाप्रज्ञ प्रमुख होते. राष्ट्रीय विचारांचे संत म्हणून त्यांना सर्वत्र मान्यता व प्रतिष्ठा होती. ते म्हणत, ‘‘मी तेरापंथी आहे कारण मी स्थानकवासी जैन आहे. मी स्थानकवासी आहे कारण मी श्वेतांबर जैन आहे. मी श्वेतांबर आहे कारण मी जैन आहे आणि मी जैन आहे कारण मी हिंदू आहे. हा भारतीय पद्धतीचा खूप सुंदर विचार आहे. मी एकाच वेळी तेरापंथी, स्थानकवासी, श्वेतांबर जैन आणि हिंदू असू शकतो. कारण भारतीय चिंतनात केव्हाही विविधतेत विरोधाभास दिसत नाही. विविधता ही एकाच संकल्पनेची भिन्न अभिव्यक्ती असते. ही भारताची परंपरा राहिली आहे. परंतु, मुळांची पकड ढिली होत गेली की ही व्याख्या बदलायला सुरुवात होते. मग हेच कथन अशा प्रकारे केले जाते, मी हिंदू आहे, पण मी जैन आहे. मी जैन आहे परंतु श्वेतांबर आहे. मी श्वेतांबर आहे परंतु, स्थानकवासी जैन आहे आणि मी श्वेतांबर आहे, पण मी तेरापंथी आहे.’’

मुळांशी असलेले नाते दुर्बल होत जाते तेव्हा अशी स्थिती येते की मी जैन, श्वेतांबर, स्थानकवासी आणि तेरापंथी असा कोणीही असेन, पण मी हिंदू राहत नाही. यावर मग राजकारण सुरू होते. हे नाते जेव्हा अधिकच दुर्बल होते तेव्हा  हिंदू पाकिस्तान, हिंदू तालिबान, हिंदू दहशतवाद असे विचार सुचतात. हा दुर्बलत्व पूर्णत्वास जाता जाता अभारतीयीकरणाची प्रक्रियाही पूर्ण करते. मग, ‘‘भारत तेरे टुकडे होंगे’’, ‘‘भारत की बरबादी तक जंग चलेगी, जंग चलेगी’’ अशा स्वरूपाच्या घोषणा सुरू होतात.अशिक्षित, मागासलेल्या नव्हे तर सर्वात प्रगतिशील मानल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या भारतीय प्रज्ञा असणाऱ्या आधुनिक युवा प्रतिनिधींच्या माध्यमातून याची सुरुवात होते. या पुढचे पाऊल म्हणजे याच भारतातील धनावर पालनपोषण झालेल्या प्राध्यापकांचे यांना समर्थन मिळते. अभारतीयीकरणाचे याहून स्पष्ट उदाहरण देण्याची आवश्यकता नाही.

प्रणबदांनी ५००० वर्षांपूर्वी तयार झालेल्या भारताच्या परिचयाचा केलेला उल्लेख खूप महत्त्वपूर्ण आहे. आपण आपल्या मुळांशी खोलवर जोडले गेलो तरच जगाच्या पाठीवर आपली ओळख तयार करून टिकू शकू. सुप्रसिद्ध कवी प्रसून जोशी यांनी एका कवितेत म्हटले आहे,

उखडे उखडे क्यों हो वृक्ष,

सूख जाओगे।

जितनी गहरी जडें तुम्हारी,

उतने ही तुम हरियाओगे।