बिगरभाजप राज्यांवर करोना-फैलावाचा ठपका देशाचे आरोग्यमंत्री ठेवत असताना, देशातील चिंताजनक राज्ये कोणती आणि प्रमुख भाजपशासित राज्यांची स्थिती चांगली आहे काय, याचा शोध घेणारे हे संकलन.. देशात करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून गेले वर्षभर तरी त्यात काही अपवाद वगळता राजकारण आड येत नव्हते. पण गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार विरुद्ध बिगरभाजपशासित राज्ये अशी उघडउघड दरी निर्माण झालेली बघायला मिळते. महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड, दिल्ली आदी बिगरभाजपशासित राज्ये करोना हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका देशाच्या आरोग्याची काळजी एरवी वाहणारे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीच ठेवला. महाराष्ट्राने कोविड फैलावाबाबत अधिक काळजी घ्यावयास हवी हे उघडच आहे. मात्र करोनासारख्या गंभीर महासाथीशी लढा देतानाही केंद्रातील सत्ताधारी भाजप व भाजपची सत्ता असलेली राज्ये विरुद्ध बिगरभाजपशासित राज्ये अशी उघडउघड दरी निर्माण करण्यात आली. देशातील एकूण करोनाबाधितांमध्ये महाराष्ट्र, के रळनंतर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. दैनंदिन रुग्णसंख्यावाढीत पहिल्या पाच राज्यांच्या यादीत कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या भाजपशासित राज्यांचा क्र मांक लागतो. दर लाख लोकसंख्येमागे मृत्यूच्या प्रमाणात महाराष्ट्रापेक्षा भाजपशासित गोवा राज्यातील प्रमाण अधिक आहे. देशातील १२ राज्यांत बाधितांची संख्यावाढ अधिक आहे. यात उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, हरियाणा ही भाजपशासित राज्ये, तर तमिळनाडूत मित्रपक्षाचे सरकार आहे. करोना रुग्णसंख्या वाढणाऱ्या देशातील पहिल्या दहा राज्यांमध्ये मध्य प्रदेशचा समावेश होतो. प्रतिदिन चार हजारांपेक्षा नव्या रुग्णांचे निदान गेले काही दिवस झाले. वाढत्या रुग्णसंख्येमुळेच भोपाळ, इंदूरसह मुख्य शहरांत रात्रीची संचारबंदी लागू करावी लागली. याशिवाय मध्य प्रदेशच्या चार जिल्ह्यंत सोमवारपासून टाळेबंदी लागू केली जाईल. ३० तारखेपर्यंत प्रत्येक रविवारी राज्यभर टाळेबंदीची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी के ली आहे. करोनाचे संकट जावे म्हणून मध्य प्रदेश सरकारमधील महिला पर्यटनमंत्र्याने इंदूर विमानतळाबाहेर पूजा व होमहवन के ले, त्यात विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारीही सहभागी होते. तर मुख्यमंत्री चौहान यांनी भोपाळच्या मुख्य बाजारपेठेत जाऊन मुखपट्टी नसलेल्या दुकानदारांना मुखपट्टी लावली. करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून गुजरातमधील सर्वाधिक रुग्ण गेल्या आठवडय़ात आढळले. गुरुवारी चार हजारांपेक्षा अधिक तर शुक्र वारी ४५०० पेक्षा अधिक करोनाबाधित आढळले. मृतांचा आकडाही वाढला आहे. तो किती, याबाबत दुमत आहे. उदाहरणार्थ, सूरतमध्ये ‘गेले काही दिवस दररोज १००च्या आसपास करोनाबळी जातात’ असे स्थानिक, गुजराती वृत्तपत्रे म्हणतात; तर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील ३५ पैकी १४ मृत्यू सूरतचे आहेत. या राज्यात करोना परिस्थिती चिंताजनक होत चालल्याचे अन्य प्रकारेही दिसते आहे. रुग्णालयांमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांना जमिनीवर झोपविण्याची वेळ प्रशासनावर आली. अहमदाबाद, सूरत आदी शहरांमध्ये करोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सूरत आणि राजकोट शहरांत रुग्णालयांमध्ये खाटाच उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत गुजरातमध्ये रुग्णसंख्या वाढत असून, दैनंदिन रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली. यामुळेच शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी गुजरात सरकारने लागू केली. उत्तर प्रदेशातही करोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत ९६९५ नव्या रुग्णांचे निदान झाले. यापैकी राजधानी लखनऊ शहरात सुमारे तीन हजार रुग्णांचा समावेश होता. लखनऊत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वपक्षीय नेते, शहरांचे महापौर आणि धार्मिक नेते यांच्याबरोबर बैठकांचे सत्र सुरू के ले. रुग्णवाढीचा दर असाच राहिल्यास काही दिवसांत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त के ली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही रुग्णसंख्या वाढू लागल्याने रात्रीची संचारबंदी लादावी लागली. कर्नाटकात शुक्र वारी आठ हजारांच्या आसपास नवे रुग्ण आढळले व त्यापैकी साडेपाच हजार एकटय़ा बेंगळूरु शहरातील होते. करोना रुग्णांचा १० लाखांचा आकडा कर्नाटकात पार झाला आहे. बेंगळूरु शहरात करोना रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाला आता कठोर निर्बंध लागू करावे लागले आहेत. म्हैसूर, मंगलोर, गुलबर्गा, उडपी आदी शहरांमध्ये शनिवारपासूनच रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. परिस्थिती आटोक्यात आली नाही तर अधिक कठोर निर्बंध लागू करण्याचा इशारा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिला आहे. झपाटय़ाने वाढणाऱ्या करोना रुग्णसंख्येत देशातील पहिल्या दहामध्ये भाजपशासित पाच राज्ये आहेत. चाचण्या हा घटक करोनामध्ये महत्त्वाचा. महाराष्ट्रात प्रतिदिन १ लाख ८० हजारांपेक्षा अधिक करोना चाचण्या के ल्या जातात. यापैकी ७० टक्क्यांपेक्षा अधिक आर.टी.-पीसीआर या अचूक पद्धतीने महाराष्ट्रात के ल्या जातात तर उर्वरित २५ ते ३० टक्के चाचण्या या रॅपिड अँटिजेन पद्धतीने के ल्या जातात. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अचूक मानल्या जाणाऱ्या आर.टी.-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण हे ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. बिगरभाजपशासित राज्यांबाबत आरोग्यमंत्री जाहीरपणे बोलणार नसतील तरी, त्या राज्यांचीही चिंता देशाला असावयास हवी. (आधार : एक्स्प्रेस वृत्तसेवा)