|| विनायक पाटील

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या सुहृदाने केलेले मुक्तचिंतन..

संत कबीर यांचा एक दोहा आहे, त्यात किंचितसा बदल करून म्हणावेसे वाटते-

‘‘मुख्यमंत्री की जाती न पूछिये,

पूछ लीजिये ग्यान।

मोल करो तलवार का, पडा रहेन दो म्यान॥’’

हा दोहा सर्वच मुख्यमंत्र्यांना लागू आहे, देवेंद्र फडणवीसांसह.

आपल्याकडे जाती आपल्या मनात एवढय़ा भिनवल्या गेल्या आहेत, की मुख्यमंत्रीच काय, आपण संतांनासुद्धा जातीच्या खुंटय़ांना बांधून त्यांच्या श्वानाचा, कर्तृत्वाचा परीघ लहान करीत असतो. यात भक्तही असतात. फक्त खुंटे वेगळे असतात. एक खुंटा हा माझाच आहे यांचा आणि दुसरा हा माझा नाहीच यांचा.

राजकारण हे कौशल्य, वात्सल्य, बुद्धिमत्ता, शौर्य, संघटन, क्षमता, समयसूचकता, लोकांचा विश्वास यांचा समुच्चय असलेल्या कर्तबगारांचे क्षेत्र आहे. यात जो तो आपल्या परीने आपले स्थान निर्माण करीत असतो. दर पाच वर्षांनी लक्षावधी मतदारांच्या निवड परीक्षेत पास व्हावं लागतं. एखाद्या निवडणुकीतलं यश हा योगायोग किंवा अपघात असतो. सतत लोकांत राहाणं आणि मतदारांचा विश्वास संपादन करणं हा रियाझ असतो. जेवढा रियाझ पक्का तेवढा राजकीय सूर चांगला लागतो. सत्तेची मफल रंगते, अविस्मरणीय होते. फडणवीसांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द अशीच रंगलेल्या आणि अविस्मरणीय असलेल्या मफलींमधली एक आहे. हे सर्व रियाझ पक्का आहे त्याचा परिपाक आहे.

मुळात शिकवणी घरातच. वडील गंगाधरराव हे विधान परिषद सदस्य, काकू शोभा फडणवीस मंत्री. जसे गायक- वादकाच्या घरात जन्मलेल्या मुलाला सूर समजण्याची सुरुवात बालपणातच होत जाते तसेच राजकीय सुरांचेही आहे. ही घराणेशाही उपयुक्त आणि पोषक असते. राजकारण आवडते, पण कमी कळते असा वर्ग याला नाके मुरडत असतो.

वयाच्या एकोणिसाव्या वर्षी देवेंद्र नागपूरला भा.ज.यु. मोर्चाचे अध्यक्ष होतात. व्हावेसे वाटणे आणि त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवाविशी वाटणे या दोन्ही जमेच्या बाजू आहेत. अध्यात्म, धर्मकारण, राजकारण, कला या तारुण्यात सुरू करण्याच्या गोष्टी आहेत. चला निवृत्त झालो, आता थोडे अध्यात्माकडे वळूयात किंवा राजकारणात लक्ष घालूयात या प्रेरणा अल्पजीवी असतात.

हाच तरुण वयाच्या विसाव्या वर्षी भाजपचा नागपूर पश्चिमचा पदाधिकारी होतो. बाविसाव्या वर्षी महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराचा अध्यक्ष होतो. एक-एक टप्प्याचा अनुभव घेत महाराष्ट्र राज्याचा भाजपचा अध्यक्ष होतो. वसंतदादा पाटील हे मंडल काँग्रेस, तालुका काँग्रेस, जिल्हा, मग महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांना पत्रकारांनी कसे वाटते, असे विचारले. ते म्हणाले होते, ‘‘एखादा कॉन्स्टेबल बढती मिळत मिळत राज्याचा आयजी होतो तसे वाटते.’’

पदे मिळतात, अनुभव घ्यावा लागतो. फडणवीस अनुभवसिद्ध अध्यक्ष होते. पक्ष संघटना तुम्हाला एकत्र कुटुंब पद्धतीत कसे राहायचे याचे शिक्षण देते. देवेंद्र तर एकत्र कुटुंबाचे कुटुंबप्रमुखच होते. अनेक नेते पक्ष संघटना उत्तम सांभाळतात; परंतु त्यांना लोक निवडून देतीलच असे नाही. मतदारांचे निकष वेगळे असतात, त्याला उपयुक्ततेचे बंध असतात. पक्ष, संघटना हे कार्य सुरू असतानाच ते नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक झाले. वय वष्रे अवघे एकवीस. नगरसेवक एकदाच नव्हे तर दोनदा झाले, लागोपाठ. सगळ्यात अवघड निवडणुका म्युनिसिपाल्टीच्या असतात. त्यापेक्षा विधानसभा बरी आणि लोकसभा सोपी, हे सर्व निवडणुका करणारे जाणतात. नागपूरसारख्या बहुरंगी महानगरीचे ते महापौर झाले, तेही दोनदा, लागोपाठ. नागपूरचे महापौरपद मिळविणे हे महाराष्ट्रातील सगळ्यात अवघड काम. ते किती अवघड असते हे ज्यांना ‘चकल्लस’ आणि ‘फोकनाड’ या शब्दांचे अर्थ माहीत आहेत त्यांना विचारा. या राजकीय डावपेचांची शिदोरी घेऊन ते पश्चिम नागपूर मतदारसंघातून विधानसभेसाठी भाजप उमेदवार म्हणून उभे ठाकले. १९९९ साली विजयी झाले. पुन्हा उभे. पुन्हा विजयी. पुन:पुन्हा असे चार वेळा सलग विजयी. एकोणीस वष्रे विधानसभेत (कार्यरत आमदार) विरोधी पक्षनेते. अनेक समित्यांचे चेअरमन. यामुळे प्रशासन समजते, शिवाय कायद्याचे पदवीधर आणि अनुभव. यामुळे काय करायचे आणि ते कसे करायचे (प्रोसीजर) तेही समजते. आपण काय करू शकतो याचे क्षितिज आणि किती करू शकतो याच्या सीमारेषा डोळ्यापुढे येतात. पक्षाध्यक्ष, समित्यांचे चेअरमनपद, विरोधी पक्षनेता यामुळे महाराष्ट्राचे प्रश्न माहीत होतात, माणसं कळतात, महाराष्ट्र फिरून होतो. यशवंतराव चव्हाण म्हणत, ‘‘मुख्यमंत्र्याला त्या राज्याचा इतिहास माहीत असावा लागतो, तसाच भूगोलही माहीत असावा लागतो.’’ फडणवीसांना दोन्ही पाठ आहेत. रा. स्व. संघ ही त्यांची विचारसरणी आणि भाजप हा पक्ष. विचारसरणी आणि पक्ष हे दोन बिंदू स्थिर असले की वैचारिक गोंधळ आणि ध्येयाची धरसोड होत नाही. माझी विचारसरणी भली, माझा पक्ष भला, माझा मतदारसंघ भला, माझे राज्य भले आणि वाटय़ाला आलेले कर्तव्य भले, असा व्यवहार असला की ही पद्धती असणारा माणूसही भला होतो. देवेंद्र हा भला माणूस आहे. म्हणूनच मुख्यमंत्री माझे जानी दोस्त आहेत, मी तुमचे काम सचिवालयातून करून आणतो, असा दावा करणारा माणूस कुणालाही चार वर्षांत भेटला नाही. हे त्या व्यक्तीचे बलस्थान आहे.

तुमच्या वर्तणुकीची शितं तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या भाताची परीक्षा देत असतात. फडणवीस मुख्यमंत्री झाले त्या वेळी ते मॅजेस्टिक या आमदार निवासात राहत होते. बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विचारले, ‘‘आपले भावी निवासस्थान ‘वर्षां’ या शासकीय बंगल्यात काही सुधारणा, बदल करून हवे आहेत काय?’’ त्यांचे उत्तर होते, ‘‘मॅजेस्टिकच्या रूमपेक्षा चांगले आहे ना, मग काही बदल करू नका.’’ अशा घटनांमधून तुमची वृत्ती कळते.

काही निकटवर्तीयांनी त्यांना विचारले, ‘‘मुंबईत तुमचे घर आहे काय?’’ ते उत्तरले, ‘‘मुंबईत घर कशाला? मी सत्तेत नसेल तेव्हा नागपूरला राहायला जाईन.’’ विचारातील केवढी स्पष्टता आणि त्याला अनुरूप कृती. नेता एक दिवसात घडत नाही, अनुभवाच्या ऐरणीवर त्याला पलू पडत जातात. फडणवीस पलू पडलेले नेते आहेत आणि एक लक्षात असू द्या, पलू पडायला मुळात हिरा असावा लागतो.

मला आठवते ब्रेबॉर्न स्टेडियमवर जेव्हा आंतरराष्ट्रीय कसोटी सामने होत त्या वेळी प्रेक्षकांची टाळी षटकार, चौकार, उत्तम झेल, सुंदर विकेट यांना मिळत असे; आता फक्त आपल्या टीमलाच मिळते. आपली टीम जिंकावी असे वाटणे स्वाभाविक आहे; परंतु आपण ज्या वेळी संपूर्ण खेळाचा विचार करतो आणि आपले त्या खेळावर प्रेम असते, त्यातील कौशल्ये समजत असतात, तेव्हा दाद कौशल्याला जाते.

तसेच देवेंद्रांची कार्यपद्धती, व्यक्तिमत्त्व आणि क्षमता यांना दाद दिलीच पाहिजे. खरे तर अशी व्यक्तिमत्त्वे देशाची अमानत असतात. कोणत्या विचारसरणीच्या हाती कारभार द्यायचा हे मतदार ठरवतील. सर्व पक्षांतील अशी व्यक्तिमत्त्वे राष्ट्रीय संपत्ती असते. जनता जेव्हा सत्तेचे दान पदरात टाकते तेव्हा ते दान स्वीकारण्यासाठी पदरही भक्कम असावे लागतात. सत्तेचा गाडा ओढण्यासाठी खांदे दणकट लागतात. फडणवीसांचा पदर भक्कम आणि खांदा दणकट आहे.

केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचं कर्तृत्व नाकारणं आणि ब्राह्मण आहेत म्हणूनच त्यांच्या धोरणांवर, निर्णयांवर टीका होते असा समज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यातून बाहेर पडूयात. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देऊयात.

vinayakpatilnsk@gmail.com